Total Pageviews

Thursday, 13 April 2023

महान भारतीय क्रांतीकारक धाडसी योद्धाभीमाबाई होळकर

 


महान भारतीय क्रांतीकारक
धाडसी योद्धाभीमाबाई होळकर
-----------------------------------------
" वीर,शेरनी लडणेवाली, रण से हुई सगाई थी ! खुब लडी मर्दानी रन मे, वह तो भीमाबाई थी"
-----------------------------------------
स्वांतत्र्य संग्रामातील सोनेरी पान
वारसा असतांना राहीले उपेक्षीत
महाराजा यशवंतराव होळकर यांची शुरवीर कन्या भीमाबाई होळकर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सोनेरी पान आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चां वारसा जोपिसणारी महिला असुन पित्याच्या स्वप्नपुर्तीसाठी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यत लढत राहीली आणि रणांगनावर कामं आली
भीमाबाई चा विवाह बुळे सरकार यांच्यांशी झाला होता पंरतु काही दिवसातच त्यांना वैधव्य आल्याने त्या आपल्या माहेरी पित्याकडे येवुन राहिल्या याच काळात त्या शस्त्र चालवण्यात व घोडेस्वारीत निपुण झाल्या अंत्यत स्वाभीमानी शुर व धाडसी पराक्रमी पुरुषा सारख्या त्या युद्धकलेत पारगंत होत्या म्हणुन एक कवी त्यांच्याबद्दल लिहतो
" वीर,शेरनी लडणेवाली, रण से हुई सगाई थी ! खुब लडी मर्दानी रन मे, वह तो भीमाबाई थी"
पुरुषांसारखा सैनिकी वेश धारन करीत असल्याने रनचंडीका दिसायच्या इंदौर राज्यातील आणि स्वांतत्र्य संग्रामातील योध्द्यांना त्यांच्या विषयी मोठा आदर होता
त्यांचे भाऊ मल्हारराव होळकर अधिक कार्यक्षम होत्या तर भाऊ मल्हारराव त्यांच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करायचा दरबारात त्यांच्या शब्दाला मोठी किमत होती
याच काळात कंपनी सरकार कुटील नितीने हिंदुस्थानातील एक एक राज्य अंकीत करीत चालले होते सारा हिंदुस्थान आपल्या सत्तेखाली यावा अशी इंग्रजांची महत्वकांक्षा होती म्हनुन न्याय अन्याय निती अनिती चा विचार न करता हिंदुस्थातील एक एक राज्य ते हडप करीत चालले होते
आधीच गव्हर्नर जनरल लाँर्ड वेलस्लीने अनेक राजांना आपल्या राज्यात तैनाती फौज ठेवायला भाग पाडले होते व त्या प्रत्येक राज्यात आपला एक प्रतिनिधी (रेसिंडेट) कायमचा ठेवुन दिला होता तो रेसिंडेट राज्याच्या कामकाजात हस्तक्षेप करायचा व आपला दबाव त्या राजावर ठेवायचा असाच एक रेसिडेट इंदौर सरकार कडे ठेवण्याचा आग्रह इंग्रजाकडून झाल्याने त्यास महाराजा यशवंतराव होळकर यांनी विरोध केला पंरतु त्यांचा मुलगा मल्हारराव गादीवर बसताच रेसिंडेट ची लुडबूड वाढली होती तेव्हां मल्हाररावानी आपली बहीन भीमाबाईचा सल्ला घेतला यावर भीमाबाईनी त्यास स्पष्टपणे सांगीतले की "आपल्या राज्यकारभारात लुडबुड करण्याचा इंग्रजांना कुठलाही अधिकार नाही म्हणुन त्यांच्यासोबत आपन युध्द करुन त्यांच्या या कारवाया थांबवल्याच पाहीजे" मल्हाररावांना भीमाबाईचे हे विचार पटले आणि दोन्ही भावाबहिनीनी गुप्तपणे युध्दाची तयारी सुरु केलीसैन्यभरती करुन नव्या सैनिकांना राज्यात ठिकठिकाणी प्रशिक्षण दिले जावु लागले शस्त्रास्त्रांची खरेदी सुरु केली तयारी होताच मल्हाररावांनी युध्दाची घोषणा केली
मल्हाररावांच्या सैन्यात दहा हजार पायदळ ,पंधरा हजार घोडेस्वार होते ल शेकडो चांगल्या तोफा होत्या आपले सैन्य घेवुन मल्हाररावांनी भीमाबाईसह महिदपुरला तळ ठोकला
स्वत: भीमाबाईनी सैनिकी वेश धारन करुन सैन्याला प्रोत्साहीत होत्या
इंग्रज अधिकारी हिस्लॉप आणि हंट यांना हे समजताच ते महिदपुरला आपले सैन्य घेवून आले
त्यांच्या सैन्यात थोडे गोरे व देशी सैनिक होते हिस्लॉप व हंट हे दोघेही अनुभवी सेनाधिकारी होते त्यास रनकुशलतेचा गर्व होता
गुप्तहेरांनी हंटला सांगीतले की मल्हाररावांची बहीन भीमाबाई ही शुर व पराक्रमी असुन ती नेहमी पुरुष वेशात असते ती अत्यंत धाडसी आणि निडर आहे तिला कुणाचीही भीती वाटत नाही
ती युध्दकलेत तरबेज असुन पुरुषवेशात लढण्यासाठी आलेली आहे ते ऐकल्यावर हंट तिला बघण्यासाठी उत्सुक झाला व मल्हाररावांच्या सैन्याकडे त्याने दुर्बिन लावली तेवढ्यात भीमाबाई आपल्या घोडेस्वारांच्या तुकडीसह त्याच्यावर चालुन आली हंट चकीत होवुन तिच्याकडे बघतच राहिला तेंव्हा
भीमाबाई त्याच्यावर विजेसारखी कडाडली
' हे फिरंग्या,बघतोस काय? युध्दाला तयार हो ! हंट भानावर आला व त्याने आपल्या घोडेस्वाराच्या तुकडीस भीमाबाईवर चाल करण्याचा हुकुम दिला तुंबळ युध्द सुरु झाले रणभुमीवर रक्ताचा सडा पडु लागला हंट व भीमाबाई आपल्या तलवारीचे पाणी एकमेकांस दाखवु लागले हंट भीमाबाईच्या हातातील तलवार तीच्या हातातुन खाली कशी पडेल याचा प्रयत्न करीत होता तेवढ्यात भीमाबाईनी संधी साधुन हंटच्या खांद्यावर आपल्या समशेर ने वार केला त्याच्या खांद्यातून रक्ताच्या धारा वाहु लागल्या तो चांगलाच घायाळ झाला होता व आपल्या घोड्यावर पडता पडता वाचला
त्यास भीमाबाई म्हणाल्या ' हे फिरंगी ! जा आणि आपल्या जखमेवर उपचार घे! त्यानंतर ही हिस्लॉप आपल्या सैन्यासह मल्हाररावावर धावुन आला .मल्हारराव हत्तीवरुन लढत होते आणि पुढं पुढं जात होते
तेव्हां जखमी हंटला हिस्लॉप घेवुन गेला आणि युध्द थांबवले
आणि मल्हाररावांकडे तहाच्या अटी पाठवल्या पंरतु त्या अटी भीमाबाई आणि मल्हाररावांना मान्य नसल्याने त्यांनी इंग्रजाच्या अटी धुडकावुन लावत मी माझ्या मातृभुमीच्या रक्षणासाठी स्वांतत्र्यासाठी इंग्रजांशी मरेपर्यत लढेल' तिचे हे उत्तर ऐकुन हिस्लॉप चा दुत परत गेला
आणि पुन्हा युध्दाला सुरवात झाली
भीमाबाई आपल्या सैन्यासह रणमैदानात होती लगेच हंट आपल्या ही आपल्या घोडेस्वारासह भीमाबाई समोर आला त्याला पाहताच म्हणाल्या फिरंग्या घाव भरला का तुझा
आणि तलवार चालवायला सुरवात झाली हंट सावधगिरीने लढत होता पुन्हा एकदा हंट भीमाबाईसमोर आला आणि सपासप ऐकमेकावर तलवारीचे वार झाले हंटच्या तलवारीने भीमाबाईला घाव घालण्याचा प्रयत्न केला मात्र तो वार तलवारीवर झेलला गेला पंरतु तलवार हातातुन निसटली
त्यावेळेस तो हंट भीमाबाईना म्हणाला" राणीसाहेब ! आपण शुर आहात तुमच्या शौर्याने माझ्या मनात तुमच्याविषयी श्रध्दा निर्माण झाली आहे.तुम्ही निशस्त्र आहात व निशस्त्र शत्रुवर वार करणे मला योग्य वाटत नाही तुमची तलवार उचलुन तुम्हाला देवु का?
आभारी आहे, पंरतु शत्रुने दिलेल्या तलवारीने युध्द करणे हा मी माझा अपमान समजते " असे बाणेदारपणे राणीने त्यास उत्तर दिले
हंट म्हणाला कि मी फक्त ऐकत होतो की हिंदुस्थानी स्त्रिया रण मैदानात उतरुन शत्रुशी युध्द करतात आज मी ते प्रत्यक्ष बघतो आहे तुमच्या शौर्याने मी प्रभावित झालो आहे . मला सांगा मी आपली काय सेवा करु
भीमाबाईनी त्यास विचार करुन त्याला लगेच उत्तर दिले . ठिक आहे तुम्ही तर हिंदी राजांना एकमेकात लढवुन त्यांची राज्ये हडप करीत आहात तुम्ही कपटनितीने लोकांना गुलाम बनवित आहात म्हणुन तुम्ही काय आमची सेवा करणार? तेंव्हा हंट बोलला ते जावु द्या मी खरोखरच आपल्यासाठी काही तरी करायला उत्सुक आहे राणीसाहेब सांगुन तर बघा
यावर भीमाबाई म्हणाल्या ' चांगली गोष्ट आहे मला तुम्ही वचन द्या की इंग्रजी फौजेची छावणी इंदौरला इथुनपुढे पडणार नाही
हंटला हे वचन देणे अवघड होते कारण ते त्याच्या अधिकाराच्या कक्षेत येत नव्हते म्हणुन तो म्हणाला राणीसाहेब मी वचन तर देवु शकत नाही कारण ते माझ्या अधिकारात नाही पण त्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन
हंटने आपल्या वरिष्ठ सेनाधिकारी हिस्लॉपला भीमाबाईची मागणी सांगीतली पण ते त्याच्या अधिकार कक्षेत नव्हते पण त्याने हंटला आश्वासन दिले की मी याविषयी आपल्या पोलीटीकल एंजटला अवश्य विनंती करेन
हिस्लॉपच्या विनंतीला पोलीटीकल एंजटने मान दिला आणि इंग्रजानी आपली छावणी इंदौर ऐवजी महुला केली
भीमाबाई होळकर यांनी आपल्या परम पुज्य अहिल्यादेवी चा वारसा कृतितुन जपला होता तर युध्दातुन वडील महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कर्तृत्वाला जिवंत ठेवले होते राज्याला जपले होते
त्यांच्या या पराक्रमाला मुत्सदेगिरीला अभिवादन तर करतोच पण नतमस्तक ही होतोय
आज त्यांच्या जंयतीनिमीत्त सर्व बांधवास कोटी शुभेच्छा
- रामभाऊ लांडे अभ्यासक होळकर रियासत 9421349586
लेख संदर्भ - महान भारतीय क्रांतीकारक
1770 ते 1900
--------------------------------------------------------
टीप-हा लेख जशास तसा फाँरवर्ड करण्यास हरकत नाही कुणीही लेखकाचे नाव बदलुन अथवा नाव कट करुन निनावीपणे पाठवु नये

श्रीमंत तुळसाराणी साहिबा होळकर

 

आहे व २० डिसेंबर ला दुसरे मराठा-ब्रिटिश युद्धातील पहिली लढाई म्हणजेच महिंदपुर(जि.उज्जेन) येथील होळकर-ब्रिटिश लढाईला २०० वर्ष पूर्ण होत आहेत. श्रीमंत तुळसाराणी होळकर या श्रीमंत महाराजाधिराज यशवंतराव होळकर(१) यांच्या पत्नी आहेत. या युद्धामधील त्या शहिद स्त्रीरत्न आहेत. त्यांना महिंदपुरची वाघीण म्हणून ओळखलं जात व २ नं. चा फोटो हा त्यांच्या महिंदपुर येथील समाधीचा आहे. हे स्त्री रत्न आज पर्यंत इतिहासात दुर्लक्षितच आहे, ज्या प्रमाणे त्यांची समाधी आहे त्याचं प्रमाणे.....

श्रीमंत तुळसाराणी साहिबा होळकर यांच्याबद्दल.....
महाराजा यशवंतरावांना एकुण दोन अपत्ये झाली. लाडाबाईपासुन भीमाबाई तर मिनाबाईपासुन (काही इतिहासतद्न्यांच्या मते केशरबाईपासुन) मल्हारराव (तिसरे). तुळसाबाईंना अपत्यप्राप्ती झाली नाही. (तुळसाबाई या महानुभाव संप्रदायाच्या व मुळच्या जेजुरी येथील होत्या. हा त्या काळातील एक अतुलनीय असा आंतरजातीय प्रेमविवाह.) मल्हाररावाला (वय वर्ष ६) होळकरी गादीवर बसवुन त्याच्या तर्फे रिजंट म्हणून महाराणी तुळसाबाई राज्यकारभार पाहु लागल्या. यशवंतरावांच्या मृत्युपासून ते १८१७ पर्यंत यशवंतरावांची दृष्टी ठेवत इंग्रजांना होळकरी राज्यात पाय ठेवू न देण्याची त्यांनी दक्षता घेतली. खरे तर यशवंतरावांच्या मृत्युनंतर होळकरी राज्य आपण सहज गिळून टाकू असे इंग्रजांना वाटले होते. त्यांनी वेगवेगळ्या आमिषांचे प्रस्तावही पाठवले होते. तुळसाबाईंनी त्यांना भीक घातली नाही. इंग्रजांनी मग वेगळी आघाडी उघडली. पण तुळसाबाई कारभार पाहु लागल्यापासुन काही काळानंतर त्यांचा द्वेष करणा-यांची गर्दीही वाढु लागली, कारण माल्कमने त्यांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. काय वाट्टेल ते करुन इंग्रजांना होळकरी राज्य खालसा करणे महत्वाचे वाटत होते.
तुळसाबाईवर करण्यात येणारा पहिला आरोप म्हणजे त्या यशवंतरावांच्या विवाहित पत्नी नव्हत्या. या आरोपाची दखल आपण आधी घेऊयात. ही अन्याबा महानुभाव या जेजुरी येथील गृहस्थाची कन्या होती. ही सुद्धा औरस कि अनौरस यबाबत माल्कमने संशय व्यक्त करुन आपल्या मनोवृत्तीचा परिचय करुन दिला आहे. असो. तुळसाबाई व यशवंतरावांचा परिचय होण्यात शामराव महाडिकांचे अंग होते ही एक दंतकथा तुळसाबाईंबद्दल प्रचलित आहे. १७९९ ते १८०१ या काळात कधीतरी यशवंतराव व तुळसाबाई यांची भेट झाली असावी असा तर्क नरहर फाटक देतात. (श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर) ही भेट उत्तरेत झाली कि खुद्द जेजुरीत याबाबत मात्र माहिती मिळत नसली तरी एकंदरित यशवंतरावांच्या हालचाली पाहता यशवंतरावांच्या पुणे स्वारीच्या दरम्यानच १८०२ मधे ही भेट झाली असेल असे म्हणता येते.
यशवंतरावांची तुळसाबाईंना पाठवलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. मल्हाररावांच्या लग्नानिमित्त तुळसाबाईंच्या नावे पाठवलेल्या दोन कुंकुमपत्रिका प्रसिद्ध असून नरहर फाटक म्हणतात कि उपस्त्रीला (रखेली) विवाहकार्याला निमंत्रण तत्कालीन स्थितीत दिले गेले नसते. अनेक पत्रांतही यशवंतरावांनी तुळसाबाईला "सौभाग्यवती" असे संबोधलेले आहे, त्यामुळे तुळसाबाई या विधीवत यशवंतरावांशी विवाहबद्ध झाल्या होत्या असे स्पष्ट दिसते.
तुळसाबाई स्वभावाने करारी, धैर्यवान व बुद्धीमान होत्या. तसे नसते यशवंतरावांच्या मृत्युनंतर मल्हारावाला मांडीवर बसवून राज्यकारभार त्यांना हाती घेता आला नसता. इंग्रजांच्या संदर्भातील तुळसाबाईंचा पेशव्यांशीही पत्रव्यवहार उपलब्ध असून त्यात त्यांच्या धोरणी राजकारणाचे दर्शन घडते. भीमाबाई व मल्हाररावांची कसलीही त्यांनी आबाळ केली नाही. भीमाबाई आपल्या सावत्र आईच्या राजकारणाला व मुत्सद्देगिरीला साथच देत असे. भीमाबाई व मल्हारराव जातीने महिदपुरच्या युद्धात उपस्थित होते यावरुन संस्थानाचे हित आपल्या सावत्र आईच्या मार्गदर्शनाखाली जपण्यात ही भावंडे अघाडीवर होते असे दिसते. तुळसाबाई, माल्कम व त्याची री ओढणारे इतिहासकार म्हणतात तशी बदफैली व व्यभिचारी असती तर सलग सात वर्ष तुळसाबाईंना राज्य करता येणे, वर्चस्व टिकवता येणे अशक्य झाले असते.
खरे तर यशवंतरावांचा मृत्यू झाल्यानंतर होळकरी राज्य सहज ताब्यात घेता येईल असा माल्कमचा होरा होता. त्याने त्यासाठी सुरुवातीपासून जी कटकारस्थाने केली त्याला तोड नाही.
मल्हाररावांचा रिजंट म्हणून तुळसाबाईंनी काम पहायला सुरुवात केली तेंव्हा ब्रिटिशांनीही मल्हाररावाचा वारसा मान्य करत पित्याच्या सा-या पदव्या वापरण्याचा अधिकार मान्य केला होता. तुळसाबाईने तात्या जोग, गणपतराव, अमिरखान, गफुरखान आणि जालीमसिंग या जुन्या सेवक तसेच यशवंतरावांच्या राजकीय मित्रांशी चांगले संबंध निर्माण केले. परंतू आपण अमिरखानाने यशवंतरावांशीही कशी छुपी दगाबाजी केली होती हे आधीच्या प्रकरणात पाहिलेच आहे. त्याला टोंकची जहागिरी यशवंतरावांनीच दिली होती. गफुरखान हा त्याचा मेव्हणा व होळकर दरबारातील त्याचा प्रतिनिधी. हा गफुरखान अमिरखानाला होळकर दरबारातील वित्तंबातम्या कळवत असे.
बाळाराम सेठ हा अजुन एक अधिकारी होता. गंगधर येथे त्याने तुळसाबाईला मल्हाररावांसहित थांबण्याचा आग्रह केला. परंतू त्यातील काळेबेरे लक्षात येताच तुळसाबाईंनी त्याला देहदंडाची शिक्षा दिली. आपले बिंग फुटले आहे कि काय या शंकेने गफुरखान व अन्य सरदार अस्वस्थ झाले. याची जानीव होताच तुळसाबाई अलोट येथे मल्हाररावांसह निघून गेल्या. म्हणजे तुळसाबाईंच्या सुरुवातीच्याच काळात त्यंना विश्वासघातांना तोंड द्यावे लागले.
आक्टोबर १८१३ मध्ये लोर्ड हास्टिंग्ज भारतात दाखल झाला. भारतातील स्थितीचा त्याने आढावा घेतला. मराठा राजमंडळातील सरदार पुन्हा एकत्र यायच्या प्रयत्नात आहेत व तुळसाबाईही त्यात सामील आहे हे त्याच्या लक्षात आले. होळकरांचे सैन्य त्याही काळात सर्वांत अधिक प्रबळ होते. बाजीरावावर अन्य सरदारांचा विश्वास नसला तरी पेशवेपदाचा मान होताच. त्यामुळे १ फेब्रुवारी १८१४ च्या पत्रात त्याने लिहिले कि ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी मध्य भारतात तातडीने असंतोष चिरडून टाकला पाहिजे. होळकर तसेच अन्य संस्थानिकांच्या सैन्याचा मुख्य आधार म्हणजे पेंढारी. त्यामुळेच ही इंग्रजांनी त्यांच्याहीविरुद्ध कारवाया करण्याचे निर्णय घेतले. पण यात होळकर, शिंदे आणि अमिरखान मोडता घालून मोठ्या प्रमाणावर बंड करतील अशी भितीही त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी कटकारस्थानाचाच वापर करायचा निर्णय घेतला व त्यांना एतद्देशिय देशद्रोह्यांनी साथ कशी दिली हे पुढील घटनाक्रमावरुन लक्षात येते.
या घटनाक्रमात तुळसाबाईंनी मराठा राजमंडलात राहुन ब्रिटिशांना विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पेशव्यांच्या दरबारी वकील पाठवून आपल्या तयारीची माहितीही दिली होती. तुळसाबाईला हटवल्याखेरीज होळकरी राज्य इंग्रजांना ताब्यात घेता येणार नव्हते. होळकरांची फौज बलाढ्य होती आणि यशवंतरावांनी ती प्रशिक्षीतही केली होती. त्यामुळे तुळसाबाईविरुद्ध इंग्रजांनी हळूहळू कटकारस्थाने सुरु केली. बदनामी करुनही कोणी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तुळसाबाईंचा खून करायचे ठरवले.
धर्मा कुंवर हा यशवंतरावांच्या विश्वासातील कारभारी होता. आधी त्यालाच फितवायचा प्रयत्न झाला, पण धर्मा कुंवरने दाद दिली नाही. मग इंग्रजांनी आपले लक्ष गफुरखानकडे वळवले. गफुरखान हा आमिरखानाचा होळकरांच्या दरबारातील प्रतिनिधी व सक्खा मेव्हना होता. होता. माल्कमने त्याला जाव-याची जागिर देण्याच्या बदल्यात विकत घेतले (९ नोव्हेंबर १७१७) आणि तुळसाबाई, मल्हारराव व अन्य होळकरी परिवाराला ठार करण्याचे कारस्थान रचले गेले. तुळसाबाई व मल्हारराव (३) ठार झाल्यानंतर झपाट्याने हालचाल करून राज्य गिळंकृत करण्याचे त्यांचे धोरण होते.
त्यानुसार गफुरखानाने संधी साधून तुळसाबाई व मल्हाररावांना अटक केली व त्यांना घेवुन जाव-याकडे निघाला. हत्याकांड होळकरी सीमेच्या बाहेर करावे अशी त्याची योजना असावी. पण यशवंतरावांचा विश्वासु सेनानी धर्मा कुंवरला हे कळताच त्याने गफुरखानाचा पाठलाग सुरु केला. गफुरखान व अमिरखानाशी त्याची लढाईही झाली, पण त्यात धर्माचा पराभव झाला. धर्माला शिरच्छेद करुन ठार मारण्यात आले. पण बोभाटा झाल्याने चित्र असे उभे केले गेले कि जणु धर्मानेच तुळसाबाई व मल्हाररावाला अटक केली होती व गफुरखानानेच त्यांना सोडवले. हा बेत फसल्याने हत्याकांडाची योजना त्यांना थोडी पुढे ढकलावी लागली. माल्कमने होळकरांनी ब्रिटिशांशी शिंद्यांनी केला तसाच ब्रिटिश सार्वभौमत्वाचा करार करावा असा लकडा लावला. तुळसाबाईंनी त्याला भिक घातली नाही.
मेजर माल्कम २६ नोव्हेंबर १८१७ रोजी तालेन येथे आपले सैन्य घेऊन आला. युद्ध करायचे आधीच ठरलेले होते. खुनाचा एक प्रयत्न फसला होता. नवी योजना आखण्याची गरज होती. दरम्यान इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्याने तुळसाबाईंनीही ब्रिटिशांशी युद्धाचा निर्णय घेतला. तात्या जोग, जो ब्रिटिशांशी समझौता करावा या मताचा होता त्याला पदावरुन हाकलुन नजरकैदेत ठेवले. मल्हारराव, भीमाबाई व सर्व सेनानी महिदपुरकडे ससैन्य निघाले होते. गफूरखान तेवढा मागे राहिला होता. त्याचे सैन्य मात्र मल्हाररावांसोबत रवाना झाले होते. या वेळीस होळकरांकडे शंभर तोफा, पंधरा हजार घोडदळ व दहा हजारांचे प्रशिक्षित पायदळ होते.
यामुळे माल्कम पुन्हा तुळसाबाईंशी तह करण्याच्या मागे लागला. १५ डिसेंबर रोजी होळकरांच्या तीन वकिलांशी त्याने वाटाघाटी करायचा निष्फळ प्रयत्न केला. या वाटाघाटीतुन काहीही निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यावर नेमके १९ डिसेंबर रोजीच त्यांनी वकिलांची परत रवानगी केली. कारण तुळसाबाई आहे तोवर आपला निभाव लागत नाही हे माल्कमच्या लक्षात आले होतेच आता खात्री पटली. पण दुर्दैवी भाग म्हणजे अमिरखानाने या आधीच, ९ नोव्हेंबर रोजी, इंग्रजांशी तह करुन टाकला होता. माल्कमच्या दृष्टीने ती जमेची बाजु होती. अमिरखानाचा मेव्हणा गफुरखान तर आधीच इंग्रजांना आतून मदत करत होता.
महिदपुरच्या लढाईचा आद्ल्या दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १७१७ च्या रात्री गफुरखानने डाव साधला. सारे सैन्य, भिमाबाई-मल्हारराव राजधानीत नव्हते. त्याने ही संधी साधली. यासाठीच तो मागे राहिला होता. त्याने महालात अचानक आपली तुकडी घुसवली. तुळसाबाईंना त्यांच्या महालातुन बाहेर काढले, क्षिप्रा नदीच्या काठी नेले व त्यांचा शिरच्छेद करुन त्यांना ठार मारले. त्यांचे प्रेत नदीत फेकुन देण्यात आले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. हत्याकांड होताच गफुरखान तातडीने महिदपुरच्या दिशेने रवाना झाला.
ब्रिटिशांशी तुळसाबाईलाच तह करायचा होता म्हनून तिला ही गफुरखानाने शिक्षा देण्यात आली असे माल्कमने लिहिले. तो शत्रुच होता. तह करायचा असता तर महिदपुरला सैन्य कशाला पाठवले असते हा प्रश्न आमच्या इतिहासकारांना पडला नाही. सात वर्ष ब्रिटिशांच्या पापी नजरेतून राज्य वाचवले या योग्यतेचे स्मरण केले नाही. वरील घटनाक्रम पाहिला, तुळसाबाईला ठार मारण्याचे दोन अयशस्वी आणि एक यशस्वी प्रयत्न पाहिला तर तुळसाबाई इंग्रजांच्या डोळ्यांत केवढी सलत असेल याची कल्पना येते.
गफुरखानाचे पाप येथेच संपले नाही. तो तुलसाबाईंना ठार मारुन महिदपुरला गेला. २० डिसेंबर रोजी सुरु झालेल्या युद्धात दुपारपर्यंत होळकर जिंकतील असे चित्र असतांना दुपारीच तो अचानक आपले सैन्य घेऊन पळून गेला. त्यामुळे होळकरांचा तेथे पराभव झाला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
यशवंतरावांच्या दुर्दैवी निधनापासून तब्बल सात वर्ष इंग्रजांना होळकरी सीमांपासून दूर ठेवणारी ही मुत्सद्दी महिला. सात वर्ष होळकरी संस्थानाचा घास घ्यायला टपलेल्यांना दूर ठेवणे ही सामान्य बाब नव्हे. पण इतिहासाने महाराणी तुळसाबाईंची यथोचित दखल घेणे तर सोडाच, तिला रखेली, बदफैली ठरवण्याचा प्रयत्न केला. तसे करणे माल्कमच्या किंवा इंग्रजांच्या दृष्टीने स्वाभाविक असले तरी आम्हा पामरांना तरी तुळसाबाईचे महत्व समजायला हवे होते. "नाही चिरा नाही पणती" अशे अवस्था एका समर्थ महाराणीची झाली. विश्वासघातकी मृत्यू स्विकारावा लागला. इंग्रज मात्र खूष होते...उरलले सुरले होळकरी सामर्थ्य नष्ट करण्यात ते यशस्वी होत आले होते. पण सरळ मार्गाने त्यांना अजुनही विजय मिळवण्याची खात्री नव्हती. पण त्यांचे नशीब थोर एवढे कि गफुरखानासारखे घरभेदी त्यांना मिळतच चालले होते.
माहिती - श्री.संजय सोनवणी(जेष्ठ इतिहासकार).
फोटो साभार :-Rambhau Lande

परतुर आणि #पाणिपत रणसंग्राम रणनिती

 

14 मार्च 1760 मुक्काम

परतुर आणि #पाणिपत रणसंग्राम रणनिती
-------------------------------------------
14 जानेवारी 1761 रोजी पानिपत येथे अफगाणिस्तान च्या अहमदशहा अब्दालीसोबत मराठ्यांचे भयंकर युध्द झाले युध्द जिकुंनही अब्दाली सोबत काहीच नेऊ शकला नाही अशा या ऐतिहासिक रक्तरंजित युध्दाची युध्दपुर्व रणनिती पडदुर अर्थात परतुर जि जालना या ठिकाणी आखली होती त्यात शत्रु ला कसं पराजित करुन नामोहरम करायचे,पुढच्या हालचाली काय असणार कोण कोण काय जबाबदारी घेणार अशा सर्व बारीकसारीक चर्चा या वाड्यात झाल्या
दि 7 मार्च ते 20 मार्च 1760 पर्यत परतुरला मराठ्यांच्या छावण्या होत्या या खलबतीसाठी तिथं एक मजबुत दगडी वाडा बांधण्यात आला होता आज त्या इतिहासाची साक्ष देत तो वाडा उभा असुन
काळाच्या ओघात ऐतिहासिक वाडयाची पडझड झालेली आहे
मात्र तेथील भिंती शुरविरांच्या धाडसांचे कौतुक करीत उभ्या आहेत
त्या वाड्याच्या विटा,दगड,माती जरी वादळाने एकमेकापासुन बाजुला झाले असले तरी ते लढवय्या मराठ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत
त्या वाड्याच्या पवित्र मातीत सुभेदार मल्हारराव होळकर आणि भाऊंच्या स्मृती चा गंध आजही येतोय वर्षानुवर्षे लोटले तरी आजची 14 मार्च ही तारीख पानिपत रणसंग्रामाची आठवण करुन देत असते.परतुर च्या वाड्याने आठवणी जाग्या होतात पराक्रमाचे धडे मिळतात .
:-रामभाऊ लांडे अभ्यासक होळकर रियासत 9421349586

सुभेदार "मल्हारराव होळकर" : मराठा साम्राज्याच्या उत्तरेचा अजिंक्य बुरुज

 


सुभेदार "मल्हारराव होळकर" : मराठा साम्राज्याच्या उत्तरेचा अजिंक्य बुरुज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इंदोरचे होळकर राजघराणे हे मराठेशाहीतील एक सुविख्यात राजघराणे. होळकर हे नामाभिधान सुभेदार मल्हारबांपासून पडले असावे. अर्थात हे वंशनाम "होळ" या ग्रामनामावरून पडले असावे असे सांगितले जाते. होळ नावाची महाराष्ट्रात तीन गावे आहेत. एक पुणे जिल्ह्याच्या भीमथडी तालुक्यात, दुसरे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात, आणि तिसरे सातारा जिल्हातील फलटण तालुक्यात. यापैकी पुणे जिल्ह्याच्या निराकाठजवळ जेजुरी जवळील "होळ" (मुरूम) येथे मल्हारबांचा जन्म झाल्याने या वंशास "होळकर" असे नाव पडले गेलायचे सांगितले जाते.
मल्हारबांचा जन्म १६९३ मध्ये रामनवमीला झाला. खंडूजी होळकर हे मल्हारी मार्तंडाचे अनन्यसाधारण भक्त होते म्हणून पुत्राचे नाव मल्हारी ठेवण्यात आले हा पुत्र मल्हारी पुढे जाऊन मल्हारराव व आपल्या शौर्याने माळव्याचा सुभेदार बनला.
माळव्यात मराठ्यांचा अंमल बसविण्याकरिता आणि त्याहून म्हत्वाचे कारण म्हणजे चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याकरिता पेशवे बाजीराव यांनी मल्हारबांना ऑक्टोबर १७२८ च्या सुमारास रवाना केले. मल्हारबांसोबत बाजी भीमराव, पिलाजीराव जाधव, राणोजी शिंदे व आनंदराव पवार ही मात्तबर सरदार मंडळी होती. ६ ऑगस्ट १७२७ रोजी पेशव्यांनी मल्हारबांच्या सरंजामासाठी ४ गुजरातेत, ६ माळव्यात व १ खानदेश असे दहा जिल्ह्यांचे उत्पन्न लावून दिले. मल्हारबा सरंजामदार बनल्यानंतर जेजुरीच्या खंडोबाची कृपा झाली असे त्यांना वाटू लागले, जेजुरी येथील शंकरभट तानभट खाडे यांची १० जुलै १७२९ रोजी त्यांनी तीर्थोपाध्ये म्हणून नेमणूक केली. जेजुरी येथील मल्हारी मार्तंडाच्या किल्याच्या बांधकामाची सुरवात मल्हारबांनी लागलीच केली. पुढे जाऊन २२ जुलै १७३२ मध्ये मल्हारबांना माळव्यातील बराचसा मुलुख नेमून दिला गेला.
खाजगी "जहागीर" (जागीर) मल्हारबांना बाजीरावांकडून फौजेच्या खर्चासाठी सरंजाम म्हणून माळव्यातील महाल मिळाल्याबरोबर मल्हारबांनी , "माझी सेवा लक्षात घेऊन माझ्या पत्नीला गौतमाबाईंना खाजगी जहागीर (जागीर) देण्यात यावी अशी विनंती केली. छत्रपती शौ महाराजांच्या आज्ञेने २० जानेवारी १७३४ मध्ये बाजीरावांनी मल्हारबांना लिहून कळिवले की यानंतर "खाजगी" व "दौलत" वेगळे राहतील. "खाजगी व दौलत असे दोन्ही पृथक पथक कायम करून तुमचे कुटुंब सौ. गौतमाबाई नावे इनाम घेऊन सनद व वरचे पाठविली आहेत" असे त्या पात्रात नमूद आहे.
या सनदेवरून २० जानेवारी १७३४ मध्ये होळकर घराण्यात "खाजगी" अस्तित्वात आली. त्यावेळी खाजगीमध्ये जवळ-जवळ १० ते १५ गावांचा समावेश होता जायचे उत्पन्न २,९९,०१० इतके होते ....... मल्हारबांचा दूरदृष्टीपणा इथे लोकधात घेणे महत्वाचे आहे, नियमाने घराण्यातील जो कोणी पुरुष असेल त्याची मुख्य पत्नीच खाजगीच वारस होत असे. यामुळे कुटुंबास राज्यकारभारात प्रवेश मिळावा, राज्यकारभाराचे शिक्षण सहज मिळावे हा यामागील हेतू होता. याहून महत्वाची बाब म्हणजे जर का दौलतीस पैशाची आवश्यकता भासली तर पत्नीच्या संमतीने खाजगीतला पैसा दौलतीच्या कामास वापरला जाता येत होता. अर्थात मल्हारबांनी "खाजगी" जहागीर प्राप्त करून राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या बळकटी प्राप्त करून घेतली.
खाजगीच हा मान लाभला तो फक्त होळकरांना. यावरून बाजीराव पेशवे व शाहू महाराज हे मल्हारबांच्या कामगिरीवर बेहद खुश होते याची जाणीव होते. पुढे जाऊन निजामाविरुद्ध झालेल्या लढाईत मल्हारबांनी उत्तम कामगिरी केली व त्यांचा सरंजाम वाढवून त्यांचा गौरव करण्यात आला.
*****
मल्हारबा आणि प्रधान बाजीराव बल्लाळ :
===========================
होळकर उदयाला आले तो काळ अत्यंत अंधाधुंदीचा होता.परंतु काळाचा प्रभाव मोठा असूनसुद्धा त्या-त्या काळाला अनुरूप निर्णय घेऊन जे भविष्याची जडण-घडण करतात टाच असामान्य ठरतात.१६९७ च्या आसपास मल्हारबा आपल्या मामाकडे (भोजराज बारगळ) आले होते. बारगळ हे बंड्याचे सरदार होते आणि मल्हारबा बारगळांसोबत होते त्यामुळे वयाच्या १४-१५ वर्षापासूनच मल्हारबांचे सैनिकी जीवन सुरु झाले होते. बाजीरावांनी मल्हारबांना आपल्या सेवेत मागून घेतले ते बारगळांकडेच. मल्हारबांनीसुद्धा आपले शे-दीडशे स्वारांचे स्वतंत्र पथक बनवले होते. मल्हारबांच्या माळव्यावर १७१८ पूर्वीपासूनच स्वतंत्र स्वाऱ्या होत असत. बाजीरावांची भेट होण्याआधीपासून मल्हारबांचा डंका माळव्यात वाजत होता. मल्हारबांचा इंदोरच्या नंदलाल मंडलोई या जमीनदाराशी झालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे ज्यावरून मल्हारबांचा त्या भागातील दरारा स्पष्ट होतो. जर भविष्यात उत्तरेत बस्तान मांडायचे असेल तर मल्हारबांसारखा दूरदृष्टी असणारा मुत्सद्दी सेनानी बरोबर असणे हे फायद्याचेच होईल अन्यथा मल्हारबा स्वतहा उत्तरेत स्वतंत्र बस्तान मांडतील हा विचार बाजीरावांसारख्या मात्तबर पेशव्यांच्या मनात न येणे हे अस्वाभाविक आहे. अत्रेंनी बालाजी विशवनाथ यांच्या उत्तरेतील स्वारीमध्ये मल्हारबा स्वतंत्र पथके म्हणून सामील झाले होते हे जे मांडले आहे तो बरोबर आहे असे येथे दिसते.
१७२० ते १७२१ च्या दरम्यान मल्हारबा आपल्या फौजेच्या उदरनिर्वाहासाठी बढवणीच्या संस्थानिकाकडे गेले व त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. पेशव्यांनी बढवणीला वेढा घातला असता दीड हजार सेनेनीशी मल्हारबांनी पेशव्यांच्या सैन्यांचा धुव्वा उडवला. शेवटी बाजीरावांनी मल्हारबांना पत्र पाठवून उभयपक्षी तहाची मुख्यतारी मल्हारबांना दिली. मल्हारबांनी तसा तह करून घेतला व पेशव्यांच्या फौजेची रवानगी केली. परंतु रियासतीत जी माहिती मिळते ती वेगळी आहे :- "कदम बांडे व बाजीराव यांच्या फौजांची एकदा कलागत लागली असता, ती मल्हारबांनी मिटवली. त्यावरून बाजीरावांनी त्यांना बांड्यांपासून १७२१ मध्ये आपणाकडे मागवून घेतले.परंतु याचा एकही संदर्भ रियासतकारांनी दिलेला नाही. पण याला छेद देणारे पत्र दिले आहे जायची तारीख उपलब्द नाही यावरून ज्याववेली बढवणीच्या संस्थानाबरोबर तह करून दिल्यानंतर पेशव्यांनी मल्हारबांना स्वराज्याचे सरदार व्हावे हे सुचवल्यानंतरचे हे पत्र असावे असे म्हणता येते. उभयपक्षी करारानंतर सुद्धा मल्हारबा १७२५ पर्यंत माळव्यात स्वतंत्रपणे आपल्या सैन्यासह वावरत होते व माळव्यातील अनेक प्रांत जिंकत होते. मल्हारबांच्या या मुत्सद्दीपणामुळे व किर्तीमुळे बाजीरावांना मल्हारबांना स्वराज्यात घेणेच फायद्याचे आहे असे वाटणे स्वाभाविक होते कारण असे नसते झाले तर पुढचा उत्तरेतला धोका त्यांना दिसत होता.
मल्हारबांनी त्यांच्या हयातीत एकूण ५२ लढाया केल्या ज्यामध्ये डभईचा संग्राम जो दाभाडे आणि मराठ्यांच्यात झाला जायचे नेतृत्व बाजीराव पेशवे करत होते. या लढाईमध्ये दाभाड्यांना निजाम आणि बंगश मदत करणार होते. हे पाहता बाजीरावांनी निजाम आणि बंगश यांना रोखण्याची जबाबदारी मल्हारबांकडे दिली. मल्हारबांनी बंगश आणि निजामाला तीन महिने बेजार करून सोडले त्यामुळे त्यांना दाभाडेंच्या मदतीला जाता आले नाही. आणि यामुळे डभईचे यश बाजीराव पेशव्यांच्या पदरी पडले. दयाबहादूर वरील स्वारी व विजय ही मल्हारबांच्या जीवनातील महत्वाची घटना होय या युद्धामध्ये मल्हारबांनी केलेला पराक्रम आणि राजकीय डावपेच यामुळे त्यांनी दयाबहादूरचा संपूर्ण पराभव केला ज्यामध्ये तो मारला गेला. या विजयामुळे मराठे मावळात शिरले आणि बाजीरावांची आणि शाहूंची मल्हारबांवरील मर्जी अजून वाढली.
इतिहासातील प्रसिद्ध अशी लढाई म्हणजे बुंदेलखंड वाचवण्यासाठीची लढाई महंमदखान बंगश हा बुंदेलखंडवर स्वारी करणार हे समजताच राजा छत्रसाल यांनी शाहू महाराजांकडे शिवाजी महाराजननी केलेल्या वाचनाची आठवण करून देत मदत मागितली. मदतीच्या विनंतीचे पत्र पोहचताच शाहूमहाराजांनी बाजीरावांना बुंदेलखंडाच्या मदतीस जाण्याची आज्ञा केली. बाजीराव माळव्यात दाखल झाले जिथे त्यांची भेट मल्हारबांसोबत झाली आणि संयुक्त फौजा बुंदेलखंडाकडे चालून गेल्या. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला आणि बुंदेलखंड वाचले. मल्हारबा आणि बाजीराव यांच्यात खूप जिव्हाळ्याचा व आदरयुक्त मैत्रीचा संबंध होता. शिंदे-होळकर उत्तरेत धुमाकूळ घालून खंडणी मिळवत असता बाजीरावांनी त्यांना पत्र पाठवले व कळविले की छत्रपतींच्या आज्ञेवरून मी सिद्धीवर स्वारी करण्यास जात आहे. इकडे पैशाची फार अडचण आहे. तुम्ही उत्तरेत बादशाही मुलखात स्वाऱ्या करून खंडणी मिळवावी व आम्हास जरूर पैशाचा पुरवठा करावा. शिंदे-होळकरांच्या भीतीपोटी कित्येक वेळा अनेक बादशाही सरदारांनी तहाची बोलणी केली परंतु श्रीमंतांशी बोलणी केल्याविना ते कोणताही तह करत नसत जरी खाजगीतला फायदा कितीका असेना. लढाया चालू असताना मल्हारबा खंडणी गोळा करण्यात अजिबात आळस करत नव्हते व लुटीचा व खंडणीचा गडगंज ऐवज बाजीरावांकडे पाठवत असत.
मल्हारबांनी अनेक युद्धे पहिली. हजारोवेळा सेनेस इकडून तिकडे हालिवले आणि लाखोगणती रुपयांची दौलतीची व खाजगीची तिजोरी भरली आणि राजकारणाचे नाजूक धागेदोरे उकलीले. माल्कम त्यांच्याविषयी म्हणतो, "लौकिक मिळवून चाळीस वर्षे अधिक त्यांनी सैन्याच्या अधिपत्यात घालवली. ते आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस तर मराठ्यांच्या जुटीत अग्रगण्य संमेलनात होते यात संशय नाही. साध्या गृहस्थी चालीविषयी, धैर्याविषयी मराठे लोक त्याजहून दुसऱ्यास विशेष गणित नाही.
मल्हारबांच्या जीवनातील चढ-उतार, यश-अपयश पहिले तरी या सर्व गोष्टी खर्चाकडे टाकूनसुद्धा एक उत्तम शिपाई, युक्तीवान सेनापती, उत्कृष्ट राजसेवक व उदार प्रजापालक असेच शेवटी बेरजेत उत्तर येईल.
शेवटी मल्हारबांना मनाचा मुजरा !!!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कन्या श्रीमंत मुक्ताबाईचा धनगर सरदार फणसे यांचेसोबत विवाह

 





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कन्या श्रीमंत मुक्ताबाईचा धनगर सरदार फणसे यांचेसोबत विवाह
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कन्या श्रीमंत मुक्ताबाई यांचा विवाह होळकरांचे सरदार यशवंतराव फणसे यांचेशी लावुन देण्यात आला होता
सरदार फणसे घराणे हे धनगर असुन होळकरांशी पुर्व नातेसंबंध असलेले पराक्रमी सरदार घराणे होय.
सुभेदार मल्हारराव होळकर प्रथम माळव्यात दाखल झाल्यानंतर त्यांचेसोबतच्या जहागीरदार नारायणराव बारगळ, सरदार फणसे, सरदार बुळे, सरदार लांभाते, सरदार वाघ, सरदार वाघमारे, सरदार बहाड, तुकोजीराव होळकर यांना
विविध जबाबदारी देत माळव्यातच स्थिर केले होते
जाबं दरवाजा माळव्याचे प्रवेश द्वार म्हटले गेलेले असल्याने फणसे सरदार यांचेकडे जांब दरवाजा निर्मिती नंतर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली होती
यशवंतराव फणसे हे होळकर सैन्यात सरदारकीचे काम करीत असे त्यांच्या कडे भिल्ल सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व होते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राजधानी महेश्वर येथे आपल्या राज्याचा राज्यकारभार पाहत असतांना माळव्यातील जंगलातुन जाणाऱ्या वाटसरुची भिल्ल पेढांरी लुट करीत असल्याने वाटसरु आणि व्यापा-यात घबराट निर्माण झाली होती यामुळे
वाटसरु लुटणा-या लुटारुंचा कायम बंदोबस्त करण्यासाठी होळकर सैन्यातील सरदारांना अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दरबारात बोलावुन आवाहन केले की भिल्ल पेंढारी वाटसरुची लुटमार करुन त्यांना जायबंदी करीत असल्याने वाटसरुची संख्या कमी होत असुन याचा माळव्याच्या व्यापारावर मोठा वाईट परिणाम होत असल्यामुळे भिल्ल पेंढारी लुटारुंना शस्त्र टाकुन शरण यायला सांगा त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे काम देण्यात येतील
जर ते ऐकत नसतील तर त्यांना अटक करुन हजर करावे जो ही कामगिरी पुर्ण करील त्याचेंशी कन्या मुक्ता यांचा विवाह लावुन देण्यात येईल असे आवाहन अहिल्यादेवी यांनी करताच
सरदार यशवंतराव फणसे पुढे झाले आणि त्यांनी पैजेचा विडा उचलुन
लुटारु भिल्ल आणि पेढां-यांना अटक करून अहिल्यादेवी समोर हजर केले होते पुढे त्यांचा ठरल्याप्रमाणे मुक्तासमवेत विवाह लावुन देण्यात आला असल्याचा प्रसंग कांदबरीतुन वाचायला मिळतो
मात्र यशवंतराव फणसे यांचेशी आपली कन्या मुक्ताबाईचा विवाह लावुन देत त्यांना आदंन म्हणुन निफाड सह पाच गावे व पाटीलकी दिली होती हे सत्य असुन त्यासंबंधीची पत्र उपलब्ध आहेत
फणसे आणि होळकर दोन्हीही धनगर जमाती मधील घराणे असुन हा विवाह एका घटनेतुन नातेसंबंधात झालेला असतांना काही लोक यशवंतराव फणसे यांना भिल्ल सांगुन चुकीचा इतिहास पसरवण्याचे काम करीत आहेत
निफाड, हनुमंतगाव, इंदुर, मल्हारगड येथे आजही फणसे घराण्यातील लोक वास्तव्यास असुन हे सर्व होळकरांचे रक्तसंबधातील नातेवाईक आहेत
याच फणसे घराण्यातील केशवराव फणसे यांनी अमेडच्या लढाईत चंद्रावताचा सेनापती ठार केला होता
फणसे हे होळकर रियासतीमधील निष्ठावान सरदार घराणे आहे
फणसे हे आदीवासी भिल्लआहे असा चुकीचा इतिहास पसरुन होळकरांच्या इतिहासात खाडाखोड करण्याचा प्रकार सुरु आहे.एकीकडेअहिल्यादेवी होळकर यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच भुमिकेला विपर्यास्त दाखवुन त्यांचा अपमान करायचे काम काही लोक करीत असुन होळकर राजघराण्यांचा कागदोपत्री असलेल्या नोंदीवरुन अभ्यास न करता कुठल्यातरी बाजारुंच्या सांगण्यावरुन चुकीचा इतिहास सांगायचे काम करु नये इथुन पुढे होळकरांची बदनामी कदापी सहन केली जाणार नाही याची नोंद घ्यावी
ज्यांना कुणाला फणसे हे धनगर नाहीत असे वाटते किंवा गैरसमजातुन या परिवाराबद्दल चुकीची माहिती मिळाली असेल त्यांनी या घराण्यातील काही व्यक्ती समवेत चर्चा करावी
श्रीमती प्रमिला फणसे (अंबड)
यशवंतराव फणसे (हनुमंतगाव)
मुकुंद फणसे होळकर (निफाड)
मनोज फणसे (मल्हारगड)
मोहन फणसे (नंदुरबार)
- रामभाऊ लांडे

!! #होळकरांचे सेनापती🤺 #राजेवाघ घराणे !!

 










!! #होळकरांचे सेनापती🤺 #राजेवाघ घराणे !!
मराठा 🚩साम्राज्य अखंड हिंदुस्थानभर फैलावण्यासाठी होळकर घराण्याचे फार मोठे योगदान. याच घराण्याचे मूळ पुरुष मराठा साम्राज्य विस्ताराक "#श्रीमंत_सुभेदार_मल्हारराव_होळकर" यांचा अखंड हिंदुस्थानभर प्रचंड दरारा. याच होळकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र्रातील अनेक घराण्यांची तलवार तळपली. मराठासाम्राज्य आणि होळकरशाही वाढवण्यासाठी ज्यांनी सुरवातीला मदत केली त्यांना होळकरांनी सरदारकी-जहागीरदारी सोबत उत्पन्नाचा काही प्रदेशही देऊन योग्य तो सन्मान केला. ती घराणी म्हणजे "बारगळ, बुळे, वाघमारे, राजेवाघ, लांभाते, पिसे, फणसे, धायगुडे, भागवत, ढमढेरे, खटके, कोकरे, बहाड, गावडे, बोराडे, पिंगळे, महाडिक, कांबळे-पळशीकर, नलागे, राजोळे, इंगळे, मतकर, म्हस्के, शितोळे, खेमनोर" (अजून काही नावे असू शकतात) इ. पण यासर्व घराण्यातील प्रसिद्ध घराणी म्हणजे धनगर कुळातील राजेवाघ आणि बुळे सरकार. होळकरशाहीतील जहागिरीचा सर्वाधिक भाग राजेवाघ घराण्याला देण्यात आला होता. राजेवाघ घरण्याच्या जहागिरीतून येणारे उत्पन्न हे होळकरशाहीतील सर्वाधिक उत्पन्न होय.
राजेवाघ हे घराणे मूळचे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे. राजेवाघ घराण्याचे मुळ पुरुष म्हणजे इतिहासातील प्रसिद्ध योद्धे, महाबालढ्या अश्या होळकरांच्या लष्कराचे सेनापती, होळकरांच्या चपळ घोडदळ आणि सर्वात कडवट अश्या सेनेचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध नाव म्हणजे "#सेनापती_संताजीराजे_वाघ". संताजींचा पराक्रम आणि योगदान पाहून होळकरांनी त्यांना महितपुर, उतरण, बेटमा या प्रदेशाची जहागिरी दिली त्याचे एकूण वार्षिक उत्पन्न ३,००,००० रु. होते जे होळकरशाहीतील इतर घरण्यांन पेक्षा सर्वाधिक होते. महितपुर या जहागिरीच्या प्रदेशात संताजीराजे वाघ यांनी जगप्रसिद्ध अशी तालाकुंजी बारव बांधली. त्यांना होळकरांनी महितपुरचा किल्ल्या ही इनाम म्हणुन भेटला जो होळकरांनी बांधला होता. संताजींना प्रजा नेहमी राजे म्हणूनच ओळखत असे, पुढे वाघच राजेवाघ झालं. पुढे मराठा-अब्दाली यांच्यात पानिपतच युद्ध झालं. या युद्धात संताजीराजे वाघ ही होते. जे युध्दाच्यादिवशी सायंकाळी मल्हारबांच्या आदेशाने भाऊंच्या मदतीला गेले. भाऊंच्या मदतीला गेलेल्या शेवटच्या मराठी पथकाचे सरदार होते. मल्हारबांनी होळकरांची कडवट फौज संतांजींच्या नेतृत्वाखाली भाऊंना पानिपत मधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पाठवली होती. पण दुर्दैवाने त्याला यश आलं नाही आणि संताजीराजे ५५ पेक्षा अधिक जखमा घेऊन धारातीर्थी पडले. संताजींचे प्रेत भाऊंच्या जवळच अढळले. संताजींचे प्रेत पाहून स्वतःह अब्दालीही गहिवरला होता. पानिपतच जे सांकेतिक भाषेत पत्र लिहिलं होतं त्यात जे २ मोती, २८ मोहरा गळल्या त्यातील एक मोहर म्हणजे संताजीराजे वाघ. संताजीराजे यांच्या बलिदानानंतर मल्हारबांनी त्यांच्या मुलीचा प्रिताबाई वाघ यांचा विवाह आपले नातू मालेराव होळकर यांच्या सोबत लावून दिला आणि राजेवाघ आणि होळकर धनगकुळी घराण्याचे सोयरीक संबंध सुरू झाले.
पुढे वाघ घराण्याला होळकरांनी पेशव्यांकडून मौजे काठापुर बुद्रुक, अवसरे प्रांत जुन्नर ची जहागिरदारी मिळवून दिली सोबत पेशवे दरबारात रु. ४८० चे मंदिल, पोशाख देऊन योग्य सन्मान दिला. होळकरांनी पुढे वाघ घरण्यातील #सरदार_तुळसाजी_वाघ (२६६८६७ रु.) आणि #सरदार_मधवराव_वाघ (२९६१६ रु.) असा वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश वाटून दिला. मल्हारबांनंतर तुकोजींच्या नेतृत्वाखाली टिपू सुलतानवर च्या स्वारीतही सरदार वाघ घराणे सामील झाले होते तेव्हा मोहीम यशस्वी झाली म्हणून पेशव्यांनी वाघ घरण्यातील सदस्यांचा सोन्याचे कडे किंमत ३४६-३-० रु. देऊ दरबारात सत्कार केला होता. खरड्याच्या प्रसिद्ध लढाईतही वाघ घराण्याची समशेर ताळपली होती. आजही मध्यप्रदेश मध्ये वाघ घराण्याला राजेवाघ म्हणूनच ओळखले जाते, त्यांचे सध्याचे वंशज बेटमा या जहागिरीच्या प्रदेशास वास्तव्यास आहेत.
महितपुरच्या भव्यदिव्य किल्ल्या सोबत महाराष्ट्रातील जिरे काठापुर येथे ही वाघ घरण्याचा भव्यदिव्य असा वाडा असून सोबत तिथे वाघ घरण्यातील सरदारांच्या समाध्या सुद्धा, छत्री स्मारक आहेत. सध्या वाडा आणि समाधी छत्र्या पूर्णपणे दुसर्लक्षीत आहेत. इतिहासप्रेमींनी या कडे लक्ष देणे जरुरी आहे अन्यथा हे वैभव कालौघात नष्ट होण्याच्या वाटेवर आहे.
ऐतिहासिक पाऊलखुणा हिंदुस्थानभर पसरलेल्या धनगरांच्या पराक्रमाच्या...🗡
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...!!
फोटो साभार :- रामभाऊ लांडे, राहुल वावरे
(महितपुरच १,२,३ & काठापुर चे ४,५,६,७,८)
शब्दांकन संकलन :- अवधूत लाळगे
संदर्भ 📚 :- होळकरशाही भाग १
रुबाबदार सरदार🤺
राजेवाघ 🐅 जहागीरदार
🇮🇩⚔होळकरशाही⚔🇮🇩

Tuesday, 11 April 2023

#जोतिबा_यात्रेचे_शाहूकालीन_व्यवस्थापन व ऐतिहासिक माहीती*.




#जोतिबा_यात्रेचे_शाहूकालीन_व्यवस्थापन
व ऐतिहासिक माहीती*.
दरवर्षी भाविकांच्या अमाप गर्दीत तसेच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे तसेच जोतिबा देवस्थानचे महत्त्व राजर्षी शाहू महाराजांनी जाणलेले होते. इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेतल्यानंतर यात्राकाळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी त्यांनी अनेक विधायक निर्णय घेतले व ते अमलातही आणले.
वाडी रत्नागिरी ऊर्फ जोतिबा देवस्थानला फार प्राचीन व ऐतिहासिक परंपरा लाभलेली
आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारे कोल्हापूरचे आराध्य दैवत देवी श्री अंबाबाई या देवस्थानच्या समकालीन असणारे जोतिबा देवस्थान आहे. कोल्हापूरपासून अवघ्या २० किलोमीटरवर हे देवस्थान वसलेले आहे. शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची नातसून करवीरकर जिजाबाई यांच्या कारकिर्दीत या देवस्थानच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी तळ्याची उभारणी झाल्याचे दिसून येते. जोतिबा डोंगरावरील श्री यमाई मंदिराजवळ हे तळे करवीरकर जिजाबाई यांनी उभारलेले आहे. या तळ्याच्या दक्षिण दरवाजाच्या कमानीवर याबाबतचा शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाचे वर्णन 'करवीर रियासत' या पुस्तकात आढळते. तसेच पन्हाळ्यावरील ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी यांनी १९५७ साली लिहिलेल्या जय केदार अर्थात जोतिबा या पुस्तकातही या शिलालेखाचा उल्लेख आलेला आहे.
जोतिबा देवस्थानकडे एक पोर्तुगीज घंटा आहे. ती शककर्ते शिवाजी महाराजांचे नातू व राष्ट्रवीर छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज (सातारा) यांनी जोतिबा देवस्थानला अर्पण केलेली आहे. या संदर्भातील एक पत्र कोल्हापूर पुरालेखागारातील ऐतिहासिक कागदपत्रांमधील 'निवडी दप्तर' या विभागात आहे. ही घंटा आजही जोतिबा देवस्थान येथील दक्षिण दरवाजाच्या वर असल्याचे दिसून येते. तसेच अंबाबाई मंदिरातील घंटा कालांतराने कोल्हापुरातील टाउन हॉल येथील वस्तुसंग्रहालयात जमा केलेली आहे. वस्तुसंग्रहालयातही या घंटेबाबत कागदपत्रांमध्ये नोंद आहे.
दरवर्षी भाविकांच्या अमाप गर्दीत तसेच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे तसेच या जोतिबा देवस्थानचे महत्त्व राजर्षी शाहू महाराजांनी जाणलेले होते. यात्राकाळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी त्यांनी अनेक विधायक निर्णय घेतले व ते अमलातही आणले. इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी जोतिबा डोंगरावरील दलित समाजाच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी विहीर बांधण्यासाठी १६२ रुपये मंजूर केले होते. कोल्हापूर संस्थानात इ. स. १८९९ मध्ये प्लेगची साथ पसरल्याने संस्थानातील बहुतांश देवस्थानच्या यात्रा व इतर प्रमुख सोहळे शाहू महाराजांनी रद्द केले होते. त्यांनी प्लेगच्या साथीच्या काळात राबविलेल्या अनेक विविध उपाययोजनांमुळे साथ आटोक्यात आणणे शक्य झाले.
या काळात जोतिबा देवस्थानची यात्राही मोठ्या प्रमाणावर भरलेली नव्हती. पण शाहू महाराजांच्या अथक प्रयत्नाने प्लेगची साथ बऱ्याचअंशी आटोक्यात आली. इ. स. १९०० मध्ये जोतिबा देवस्थानची यात्रा अनियंत्रितपणे भरू द्यावी, असा हुकूम शाहू महाराजांनी दिलेला होता. प्लेगच्या साथीच्या काळात प्लेगचा बंदोबस्त व्हावा यासाठी लसीकरण केलेल्या लोकांचे दाखले यात्राकाळात तपासण्यासाठी एक हंगामी कारकून महाराजांनी जोतिबा डोंगरावर नेमलेला होता. त्याच्या भत्त्याची भक्कम एक विशेष बाब समजून त्याला देण्याबाबतही महाराजांनी हुकूम दिलेला होता.
यात्राकाळात येणाऱ्या भाविकांचे सामाजिक प्रबोधन व्हावे यासाठी इ. स. १९०३ मध्ये जोतिबा डोंगर येथे जनावरांचा बाजार व जनावरांचे प्रदर्शन भरविण्याचे मंजूर केलेले होते. जनावरे विक्रीस घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडून तसेच या बाजारात जनावरे विकत घेणाऱ्या व्यक्तीकडून कोणताही कर घेऊ नये असा हुकूम महाराजांनी दिलेला होता. फक्त या व्यक्तींकडे संस्थानचा जनावरे खरेदी- विक्री करण्याचा दाखला असणे जरूरीचे केलेले होते. या बाजारात जनावरे घेणाऱ्या व्यक्तीने प्रथम कर भरावा व नंतर संस्थानचा दाखला दाखवून तो कर परत घ्यावा, याचीही सोय शाहू महाराजांनी केलेली होती.
इ. स. १९०४ मध्ये जोतिबा डोंगर येथे यात्राकाळात भरलेल्या जनावरांच्या प्रदर्शनात उत्तम प्रतीच्या जनावरास बक्षीस देण्यासाठी १२५३ रुपये मंजूर केलेले होते. यात्राकाळात येणाऱ्या यात्रेकरूंच्या तसेच जनावरांच्या बाजारात येणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी जो खर्च होईल तो देवस्थानने करामधील शिल्लक रकमेतून करावा, असा हुकूम दिला होता. यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याची तसेच निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केले होते. १९०३ मध्ये जोतिबा डोंगरावरील चव्हाण तळे, बेडूक बाव, कारदगेकराची विहीर यातील गाळ काढून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी २००-३०० रुपये खर्च करण्याचा आदेशही त्यांनी दिलेला होता.
१९०४ मध्ये जोतिबा डोंगरावरील धर्मशाळेनजीकच्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी १५० रुपये कराच्या रकमेतून खर्च करावेत, असा हुकूमही महाराजांनी दिलेला होता. पुढे याच वर्षी गायमुख तलावातील गाळ काढून तेथे इतर सुधारणा करण्यासाठी तब्बल १३७८ रुपये कराच्या रकमेतून खर्च करावेत असा हुकूम दिला होता. १९०७ मध्ये यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी तसेच मैला निर्गतीसाठी सोय करण्यास ३१८ रुपये देवस्थानच्या शिल्लक रकमेतून खर्च करण्याबाबत आदेश दिलेला होता. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी विविध ठिकाणी महाराजांनी धर्मशाळेची उभारणी केलेली होती. मादळे गावच्या हद्दीत पाण्याच्या झऱ्यानजीक धर्मशाळा उभारण्यास १९०४ मध्ये सुरुवात करून ही धर्मशाळा १९०५ मध्ये पूर्ण झाली. यासाठी ११४४ रुपये सहा आणे खर्च आला होता. तो खर्चही महाराजांनी मंजूर केला. जोतिबा डोंगरावरील दलित लोकांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधण्यासाठी कराच्या रकमेतून ३०० रुपये देण्याचे महाराजांनी मंजूर केलेले होते. मौजे कुशिरे गावच्या हद्दीत धर्मशाळा बांधण्याची जबाबदारी संस्थानचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर दक्षिण भाग विठ्ठल सदाशिव देसाई यांच्याकडे सोपविलेली होती. १९०७ मध्ये वाडी रत्नागिरी डोंगर रस्त्याच्या सातव्या मैलात पाण्याच्या टाकीनजीक दोन धर्मशाळा बांधण्यास दोन हजार रुपयांची मंजुरी दिली होती. तसेच या धर्मशाळेच्या रखवालीस व तेथे लावलेल्या लिंबाच्या रोपांना पाणी घालण्यासाठी एक व्यक्ती दरमहा पाच रुपये पगारावर नेमलेला होता. चैत्र पौर्णिमेची यात्रा ऐन उन्हाळ्यात येत असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या निवाऱ्याच्या सोयीसाठी जोतिबा डोंगरावर इ. स. १९०४ मध्ये झाडे लावण्यासाठी २०७ रुपये दोन आणे मंजूर केलेले होते.
चैत्र पौर्णिमेच्या यात्राकाळात जोतिबा डोंगरावर स्वच्छता राहावी असा शाहू महाराजांचा कटाक्ष होता. यासाठी १९०६ मध्ये यात्राकाळात स्वच्छता ठेवण्यासाठी ३१९ रुपये ६ आणे ६ पैशांची मंजुरी महाराजांनी दिलेली होती. १९०८ मध्ये यात्राकाळात स्वच्छता ठेवण्यासाठी ३०० रुपयांची मंजुरी दिलेली होती. १९१२ मध्ये चैत्र यात्रेत तसेच इतर दिवशीही स्वच्छता ठेवण्यासाठी एक भंगी व डोंगरावर लावलेल्या झाडांच्या रखवालीसाठी एक व्यक्ती नेमून त्याच्या पगारासाठी दरवर्षी १४६ रुपयांच्या खर्चासही हे काम सार्वजनिक व महत्त्वाचे असल्याने शाहू महाराजांनी मंजुरी दिलेली होती. जोतिबा डोंगरावरील हत्तीच्या सोयीसाठी हत्तीमहाल ही इमारत दुमजली करण्यासाठी १८२० रुपये महाराजांनी मंजूर केलेले होते.
महाराजांनी जोतिबा देवस्थानकडे आणखी एक विधायक प्रयोग केलेला होता. त्यांनी गायमुख तलावाजवळ रेशीम तयार करण्याचा कारखाना काढला होता. संस्थानातील लोकांना या उद्योगाचे जास्त ज्ञान नसल्याने त्यासाठी एक माणूस खास जपानवरून मागवलेला होता. त्याचे नाव रिओ झो तोफो असे होते. त्याच्यावर रेशीम कारखान्याची सर्व जबाबदारी सोपवून दरमहा २५ रुपये पगारावर त्याची नेमणूक केली होती. तसेच कारखान्याच्या उत्पन्नाचा (खर्च वजा जाता) तिसरा हिस्सा देऊन भागीदार म्हणून नेमलेले होते. तसेच या कारखान्यासाठी गायमुख तलावाजवळ तुतूच्या झाडांची लागवडही महाराजांनी केलेली होती.