Total Pageviews

Monday 9 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४६१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४६१
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १४
पालखेडची मोहीम म्हणजे बाजीरावाच्या कारकिर्दीतील व आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. या स्वारीनंतर त्याचा आपल्या लष्करी नेतृत्वक्षमतेवरील विश्वास वाढीस लागला आणि या मोहिमेनंतर त्याने मागे वळून कधी पाहिले नाही. हे जरी खरे असले तरी पालखेडच्या विजयाचे सर्व श्रेय एकट्या बाजीरावास देणे अयोग्य ठरेल. त्याला चिमाजी आपाची जशी बहुमुल्य साथ लाभली. त्याचप्रमाणे शिंदे, होळकर, जाधव, पवार इ. सरदारांनीही बरीच मदत घेतली. याबाबतीत पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे हे बाजीरावाचे गुरुचं समजले पाहिजेत. या सर्व अनुभवी योद्ध्यांमुळेचं २७ - २८ वर्षीय बाजीरावास हे यश प्राप्त झाले.
पालखेड येथे बाजीरावाने निजामाला शरण येण्यास भाग पाडले, त्याचवर्षी होळकर, उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे इ. च्या साथीने चिमाजी आपाने दयाबहादूर व गिरिधर बहादूर या दोन बलवान मोगल सुभेदारांना युद्धात ठार करून माळवा प्रांत एकदाचा ताब्यात घेतला. चिमाजीच्या विजयाची बातमी मिळतांच स्वतः बाजीराव बुंदेलखंडात छत्रसाल राजाच्या मदतीस धावून गेला. महंमदखान बंगशच्या विरोधात बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याने बाजीरावाची मदत मागितली होती. त्यावेळी चिमाजी माळव्याच्या प्रकरणात अडकल्याने बाजीरावास तातडीने बुंदेलखंडात जाता आले नाही. परंतु दया बहादूर व गिरिधर बहादूरचा बंदोबस्त होताच बाजीरावाने बुंदेलखंड प्रकरण हाती घेतले. यावेळी चिमाजी उज्जैनला वेढा घालून बसला होता व त्याची बातमी महंमदखान बंगशला होती. पण देवगडावरून गढामंडळमार्गे बाजीराव येत असल्याची कल्पना बंगशला नव्हती. परिणामी जैतपुरावर महंमदखान बंगश मराठी व बुंदेल्यांच्या फौजांच्या चिमट्यात कोंडला गेला. त्याने दिल्लीहून कुमक मागवली. मुलगा काईमखान यांस तातडीने मदतीस बोलावले. बापाच्या मदतीला मुलगा धावला खरा पण जैतपूरच्या अलीकडे सुपे येथे मराठी सैन्याने गाठून लुटून घेतले. केवळ १०० स्वारांनिशी काईमखान जीव घेऊन पळत सुटला. सुटकेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे पाहून स. १७२९ च्या मे महिन्यात बंगश शरण आला. पावसाळा तोंडावर आल्याने बाजीरावास परत फिरणे भाग होते. तेव्हा त्यानेही फारसे ताणून न धरता बंगशला सोडून दिले. छत्रसालने बाजीरावास या मदतीच्या बदल्यात पाच लाखांची जहागीर नेमून दिली. या जहागिरीच्या मोबदल्यात मोगलांच्या आक्रमणापासून छत्रसालच्या राज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी बाजीरावाने उचलली. अशा प्रकारे माळवा - बुंदेलखंडातील विजय संपादून चिमाजी - बाजीराव पुण्यास परतले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४६०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४६०
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १३
माळव्याप्रमाणे कर्नाटकातही बाजीरावाने हात - पाय मारून पाहिले. स. १७२५ - २६ व स. १७२६ - २७ अशा लागोपाठ दोन मोहिमा त्याने शाहूच्या आज्ञेने दक्षिणेत काढल्या. परंतु, स्वतंत्र वृत्तीने काम करण्याची सवय असलेल्या बाजीरावास ' बारभाई ' पद्धतीचा कारभार पसंत नव्हता. कर्नाटक मोहिमेत प्रतिनिधी व सेनापती हि बडी धेंडं त्याच्या सोबत असून त्यांचा दर्जा बाजीरावाच्या बरोबरीचा असल्याने त्यांच्यावर बाजीरावाची हुकुमत नव्हती. सबब, या स्वाऱ्या निष्फळ ठरल्या.
परंतु, बाजीरावाच्या भाग्योदयाची वेळ आता नजीक आली होती. बाजीराव कर्नाटक स्वारीत गुंतलेला असताना स. १७२७ मध्ये निजाम - संभाजी यांनी एकत्रितपणे शाहूवर स्वारी केल्याने शाहूने बाजीरावासह आपल्या सर्व प्रमुख सरदारांना कर्नाटक मोहिमेतून मागे बोलावले. आपले लष्करी नेतृत्व व सामर्थ्य आजमवण्याची हि एक संधी चालून आली असून या संधीचे कोणत्याही परिस्थितीत सोनं केलचं पाहिजे या ईर्ष्येने बाजीरावाने निजामावरील मोहीम हाती घेतली. याकामी त्याला आपल्या भावाची - चिमाजीआपाची - बहुमोल मदत झाली. आपल्या सैन्याचे दोन भाग करून चिमाजीवर त्याने नाशिक ते सातारा - मिरजपर्यंतच्या प्रदेशचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली व स्वतः बाजीराव आपल्या वेगवान घोडदळासह निजामाच्या प्रदेशांत शिरला. बाजीरावाचे युद्धविषयक धोरण स्पष्ट होते. आपल्याकडे तोफखाना नाही तर निजामाचा तोफखाना जय्यत तयारीत आहे. अशा स्थितीत निजामासोबत लढाई करायची तर त्याच्या तोफखान्याचा सामना करणे टाळले पाहिजे. याची पक्की खूणगाठ बाजीरावाने मनाशी बांधली. त्यानुसार निजामाच्या प्रदेशांत जाळपोळ, लुटालूट करीत बाजीराव गुजरातकडे निघून गेला. पाठोपाठ त्याचा संहार करण्यासाठी निजामही चवताळून त्याच्यामागे धावला. बाजीरावाचा पाठलाग करताना जड तोफांचा अडथळा होतो म्हणून बव्हंशी तोफखाना मागे ठेऊन निवडक तोफांसह तो बाजीरावाच्या पाठीवर जाऊ लागला. अखेर पालखेडजवळ निजामाला त्याच्या मुख्य तोफखान्यापासून वेगळे करण्यात बाजीरावास यश मिळाले व त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. निजामाच्या फौजेभोवती त्याने आपल्या धावत्या तुकड्यांच्या चौक्या नेमल्या. पालखेडनजीक निजामाचा मुक्काम पडला तेव्हा याच धावत्या तुकड्यांनी निजामाची रसद पूर्णतः तोडून टाकली. त्यामुळे घाबरून जाउन निजाम तहास राजी झाला. तेव्हा ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगांव येथे उभयतांमध्ये तह घडून आला. या तहानुसार दक्षिणच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या शाहूच्या हक्कांना निजामाने मान्यता दिली.

 

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५९

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५९
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १२
बाजीरावाच्या कारकिर्दीचे सामान्यतः दोन भाग पडतात. स. १७२० ते २७ व स. १७२८ ते ४०. पैकी पहिल्या सात - आठ वर्षांचा काळ हा तसा चाचपडण्यातचं गेला. स. १७१९ मध्ये प्राप्त झालेल्या स्वराज्याच्या सनदांच्या आधारे प्रांतात आपला अंमल बसवण्याचे कार्य स. १७२० ते २७ पर्यंत बाजीरावाने केले. त्याशिवाय माळव्याच्या स्वारीचा पाया देखील त्याच सनदांनी घातलेला असल्याने अधूनमधून त्याने माळव्याकडेही काही फेऱ्या मारल्या. परंतु, आरंभी तरी त्यास म्हणावे तसे यश काही लाभले नाही. माळव्यात शिरण्यास त्यास मोठा अडथळा मल्हारराव होळकराचा झाला.
बढवाणीचा संस्थानिक पेशव्याला अनुकूल नसल्याने त्याचा बंदोबस्त केल्याखेरीज बाजीरावास पुढे जाता येईना व बढवाणीच्या बचावासाठी मल्हारराव होळकर उभा होते . वास्तविक, मल्हारराव हे तसे एकांडा शिलेदार असून स्वतंत्र वृत्तीने मोहिम करणारा सरदार होते . बाळाजी विश्वनाथच्या दिल्ली स्वारीत देखील तो सहभागी असून त्या मोहिमेच्या दरम्यान बाजीरावाशी त्याचा खटका उडून त्याने पेशव्याच्या मुलाला ढेकळं फेकून मारली होती. अशा या बाणेदार गृहस्थासोबत तंटा वाढवण्यापेक्षा त्यास आपल्या लगामी लावून माळव्याचे कार्य त्याच्याचं मार्फत उरकून घेण्याचे बाजीरावाने ठरवले व त्याने होळकराशी समेट केला. ( स. १७२१ ) यानंतर बाजीरावाच्या प्रत्येक स्वारीत होळकर सहभागी होऊ लागले . माळव्यावर अल्पावधीत ताबा बसवणे, होळकरामुळेच पेशव्यांना शक्य झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५८
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग ११
छ. शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापक म्हटले जाते तर या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करण्याचे श्रेय विसाजीपंतास (बाजीराव ) दिले जाते. कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण जातीतील भट घराण्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी जन्मलेल्या विसाजी उर्फ बाजीरावाने आपल्या उण्यापुऱ्या ३९ - ४० वर्षांच्या हयातीमधील १८ - २० वर्षांच्या कारकिर्दीत जी काही कर्तबगारी दाखवली, त्यामुळे भट घराणे विख्यात होऊन सातारकर छत्रपतींची पेशवाई कायमस्वरूपी त्या घराण्यास मिळाली. बाजीरावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पेशवा म्हणून कार्यरत असताना देखील त्याची वृत्ती ' विसाजीपंताची ' न राहता ' बाजीराव ' थाटाची राहिली.
ता. २ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथाचे निधन झाल्याने रिक्त झालेले पेशवेपद छ. शाहूने बाळाजीच्या मोठ्या मुलास, बाजीरावास दिले. यावेळी बाजीराव केवळ १८ - १९ वर्षांचा असून त्याचा स्वभाव देखील वयाला साजेसा असा उद्दाम आणि बंडखोर प्रवृत्तीचा होता. लहानपणापासून बापासोबत स्वाऱ्या - शिकाऱ्यांमध्ये सहभाग घेतल्याने त्याचा कल फडावरील बैठ्या राजकारणापेक्षा शिपाईगिरीकडे अधिक होता. पुढे जसजसे वय आणि अनुभव वाढत गेले तसतसे त्याचे उद्दाम वर्तन मावळत गेले. लहानपणापासून लष्करी मोहिमांमध्ये व विविध राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेतल्याने बाजीरावाची आपल्या बापापेक्षाही वेगळी अशी विशिष्ट विचारसरणी बनली होती. त्याच्या वंशजांनी आपल्या पराक्रमी पूर्वजाची विचारपरंपरा जशीच्या तशी न स्वीकारता आपापल्या स्वभाव मर्यादांनुसार त्यावर संस्कार करून राबवण्याचा प्रयत्न केला. परिणामी ज्या वेगाने मराठी राज्य साम्राज्यावस्थेपर्यंत पोहोचले त्याच वेगाने त्याचा ऱ्हास घडून आला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५७
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १०
बाजीरावाच्या आयुष्यातील ठळक घटना.
१७०० ऑगस्ट १८ - (भाद्र. शु. १५) बाजीरावाचा जन्म.
१७१८ जुलै १ - बाळाजी विश्वनाथाबरोबर दिल्लीस निघाला.
१७१९ फेब्रु २८ - दिल्लीस मुक्काम.
१७२० मार्च २० - कोल्हापूर युद्ध.
एप्रिल २ - बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू.
एप्रिल १७ - मसूर येथे बाजीरावास पेशवे पदाची वस्त्रे मिळाली.
१७२१ जानेवारी ४ - चिखलठाण येथे निजामाची भेट.
मार्च ७ - सुरतेवर स्वारी.
१७२२ डिसेंबर ५ - ऐवजखानाची भेट.
१७२३ फेब्रु. १३ - बदकशा येथे निजाम भेट.
मार्च - भोपाळच्या दोस्त महमदाचा पराभव. त्याचा हत्ती घेतला.
१७२४ मार्च १४ - लांबकानीचे युद्ध.
१७२४ ऑक्टोबर - साखरखेडल्याचे युद्ध.
१७२८ फेब्रु. २५ - पालखेडच्या युद्धात निजामाचा पराभव.
मार्च ३१ - स्वारीहून परत.
१७२९ मार्च १३ - धामोरा येथे छत्रसालाची भेट.
एप्रिल - बंगषाला वेढा आणि पराभव.
एप्रिल २८ - सुपे (बुंदेलखंड येथे कायमखानाचे लष्कर लुटले.
१७३१ एप्रिल १ - डभई (गुजरात) त्रिंबकराव दाभाडय़ास मारले.
एप्रिल - बाजीरावाच्या सैन्याशी निजामाची चकमक.
१७३२ फेब्रु. १२ - सेखोजी आंग्रे भेट.
१७३३ एप्रिल ६ - जंजिऱ्यावर स्वारी.
मे २५ - मंडणगड किल्ला घेतला.
१७३४ मे - खानदेशकडील स्वारी.
१७३५ फेब्रु ४ - मानाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी कुलाब्यास प्रयाण.
जुलै ६ - मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले तेव्हा बाजीराव घोरपडीपावेतो सामोरा गेला.
१७३६ फेब्रु ४ - उदेपूर येथील जलमंदिरास भेट.
फेब्रु. १५ - किशनगड नजीक सवाई जयसिंगाची भेट.
१७३७ मार्च २९ - दिल्लीचा पुरा जाळला.
१७३८ जाने. - भोपाळचे युद्ध व तह.
१७३९ फेब्रु. ११ - नादिरशहाच्या वर्तमानावरून पुण्याहून उत्तरेकडे स्वारी.
मे २२ - जेनाबाद येथे नादिरशहा परतल्याची बातमी कळली.
सप्टें. ३ - चिमाजी वसई घेऊन पुण्यास आला तेव्हा बाजीराव औंधापावेतो सामोरा गेला.
नोव्हें. १ - नासिरजंगाच्या स्वारीस प्रयाण.
१७४० मार्च ३ - नासिरजंगाची भेट व तह.
मार्च ७ - उत्तरेकडे प्रयाण.
एप्रिल ५ - रावेर प्रांत खरगोण येथे मुक्काम.
एप्रिल २८ - मृत्यू.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५६

 
















हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५६
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग
रावेरखेडीस जायचं कसं?
रावेरखेडी येथील बाजीराव समाधीस्थळी जायचं असल्यास विविध मार्ग आहे. खांडवा-इंदौर या रेल्वे मार्गावर सनावद नावाचे रेल्वेस्टेशन आहे. येथे उतरल्यावर वाहन घेऊन खरगोण मार्गावर बेडिया नावाचे गाव लागते. बेडिया येथून भोगावाँ येथे उजव्या हाताने जावे. तेथून उजव्या हाताला एक कच्चा रस्ता रावेरखेडीला जातो. रावेरखेडी गावाच्या पुढे नदीतटावर बाजीराव समाधीस्थळ आहे.
जर स्वत:च्या वाहनाने महाराष्ट्रातून जायचे असल्यास धुळ्याहून इंदौरकडे जाऊन सैंधवाच्या पुढे जुलवानियाँनंतर उजवीकडे जाणारा खरगोण रस्ता पकडता येतो. खरगोणच्या पुढे सनावद मार्गावर बेडिया येते.
हा रस्ता थोडा लांबचा वाटल्यास धुळ्याहून भुसावळ रस्ता पकडावा. हा रस्ता मोठा आहे. भुसावळच्या आधी डावीकडे रावेरसाठी (महाराष्ट्रातील) रस्ता जातो. रावेर, बऱ्हाणपूर ते सनावद सरळ मोठा रस्ता आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५५
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग
बाजीरावकालीन दौडीचा वेग
बाजीरावाचे प्रमुख बलस्थान होते त्याचे घोडदळ. त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. मात्र बाजीरावाने आपल्या घोडदळाचा वेग विक्रमी ठेवला होता.
चिमाजी आप्पा १७३३ मध्ये ग्वाल्हेरच्या स्वारीहून परत आला तेव्हा बुंदेलखंडातील राजगडापासून पुण्यापर्यंतचे मुक्काम, रोज किती कोस चालत याच्या आकडय़ासह पेशवे दप्तरात पृ. १२२५-६ वर दिलेले आहेत. त्यावरून (कोस म्हणजे २ मैल धरून) राजगड (सिप्री नजीक) पासून बऱ्हाणपुरापर्यंत ३३४ मैलांचा प्रवास चिमाजीच्या सैन्याने २४ दिवसांत केला. याचा अर्थ एक दिवसांत सरासरी १४ मैलांची मजर हे सैन्य मारत असे. पुढे बऱ्हाणपुरापासून पुण्यापर्यंतचा ३०६ मैलांचा प्रवास त्याच सैन्याने २१ दिवसात केला. म्हणजे सरासरी दिवसास १५ मैल हे मान पडते. या ४५ दिवसात कमीतकमी प्रवास एखाद्या दिवशी ४ मैल तर एखाद्या दिवशी जास्तीत जास्त २० मैल असा केलेला आढळतो.
बाजीरावाचे वडील बाळाजी विश्वनाथ यांच्या सैन्याने ११ मैलाने प्रवास केल्याची नोंद आहे. मात्र १७३८मध्ये बाजीरावाने आगऱ्यापासून दिल्लीपर्यंतचा १२५ मैलांचा प्रवास शत्रूस चाहूल लागू न देता आडवाटेने अवघ्या १० दिवसात केला होता. म्हणजे दिवसाला १२ मैलाहूनही अधिक वेगाने. मात्र दिल्लीहून जयपुरापर्यंत शत्रूच्या तावडीतून निसटण्यासाठी तो झपाटय़ाने प्रवास करत होता. तेव्हा १८० मैल ८ दिवसात म्हणजे दिवसाला २५ मैल हा बाजीरावाचा वेग होता. तो त्या काळातला जास्तीत जास्त होता.
आणिक कोन्ही दिसत नाही. - जयसिंगाचा वकिल दीपसिंगाचा अभिप्राय
मग.. (नवाब निजाम-उल-मुल्क) घडी घडी पुसो लागले की सातारा महाराजापासी मातबर, मनसुबेबाज, राजा ज्यास मानीतो यैसा तुमचे नजरेस कोण आला?
त्यांनी (दीपसिंगांनी) जाब दिल्हा की महाराजा जैसिंगजींनी (जयपूरपाले) मजला याच कामाबद्दल बहुतकरून पाठविले जे, बाजीराअु पंडीत प्रधान याचे नाव मुलकात मरदुमीचे फार आहे. परंतु गिरंदारी व मुतसतगिरी व मान आदर राज्यांत व बोलोन चालोन पोख्त कारबारी मनास आणून येणें म्हणोन पाठविले होते, ते आपण मनास आणिले.
मग नबाब पुसो लागले की कोन्हास तुम्ही मातबर व पोख्तकार व साहेबतरतुद व राजामेहेरबान गिरंदार कोन्हांस वलखिले?
दीपसिंगजींनी अुत्तर दिल्हे जे सिवाये बाजीराअूजी आणिक कोन्ही सत्यवचनी अगर प्रामाणिक अगर पोख्तकारी अगर चलनसाहेबफौज दुसरा दिसत नाही.
- पेशवे दप्तर, भाग १० ले. ६६.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५४

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५४
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग
सर रिचर्ड टेंपल यांनी वर्णन केल्याप्रमाणे बाजीरावाकडे कुशल संघटनकौशल्य होते. तो सुंदर भाषण करायचा. समरागंणावरील विजयानंतर तो आपल्या सैनिकांना उद्देशून असे काही भाषण करी की आणखी विजय मिळवण्यास त्यांचा हुरूप वाढत असे.
खरं तर आजच्या तरुण पिढीला बाजीरावाच्या तोडीचं एखादं नेतृत्त्वं आज हवं आहे. मात्र बाजीरावच उपेक्षेच्या अंधारात आज हरवला आहे. उत्तर पेशवाईतल्या रंगढंगामुळे बाजीरावाबद्दल बहुजनांना ममत्व नाही.
मांस भक्षण करणारा, मद्य प्राशन करणारा आणि मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाडय़ात आणणारा म्हणून उच्च जातीतील लोकांनी या वृत्तीनं शिपाई असलेल्या पेशव्याला उपेक्षित केलं.
तसाही पुतळे बांधून वारसा जपला जातोच असं नाही. जातीच्या नाही तर प्रांताच्या संकुचित कुंपणात इतिहासातले सुपरहीरो अडकवले जातात. पण रावेरखेडीस चिरविश्रांती घेणारा राऊ या सगळ्या पलिकडचा होता. तो रणबाँकुरा होता, मुत्सद्दी होता, तडफदार होता, काळजानं हळवा होता. म्हणून पाबळला मस्तानीस कैदेस ठेवल्याच्या बातमीने तो धास्तावला होता.
बाजी रावेरखेडीस दहा दिवस मुक्कामास होता. इतके दिवस रावबाजी एकाच ठिकाणी कधीच स्थिर नव्हता. इराणचा बादशहा नादिरशहास धाक घालणारा राऊ घरच्या भेदामुळे खचला. त्यातच त्याला वैशाखातला ऊष्मा भोवला. आणि त्याने नर्मदातीरावर वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी देह ठेवला. राऊ अधिक जगता तर आज इतिहास वेगळा असता.
पण या झाल्या जर तरच्या गोष्टी. आजही बाजीरावाची समाधी मराठी मनांना आणि मनगटांना स्फूर्ती देते. मराठय़ांच्या इतिहासाच्या खुणा तशाही लोप पावत चालल्यात. त्यात आता बाजीरावाची समाधीही जलसमाधी घेते आहे. ज्या छत्रसालाने शिवाजी महाराजांच्या वचनाचा हवाला देत ‘जो गति ग्राह गजेंद्र की, सो गति भई है आज, बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज’ अशी हाक दिली होती आणि बाजीने त्या बुंदेलाची लाज राखली होती.
आज माळव्यातल्या आपल्या बाजीचीच लाज राखण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्यानं कधी पराभव पाहिला नाही, ज्यानं आपल्या मनगटानं दिल्ली काबीज केली आणि इराणपर्यंतच्या पातशाह्या हलवल्या त्या जगातल्या एकमेव अजेय, अपराजित योद्धय़ाची समाधी बुडिताखाली जातेय आणि आपण सारे या इतिहासाचा आणि परंपरेचा वारसा सांगणारे इथे मनगटं चावत बसलोय.
नाही चिरा, नाही पणती या अवस्थेत आणखी एक पराक्रमाचा वारसा अंधाराचा आसरा घेईल, आणि प्राणांची बाजी लावणाऱ्या एका कणखर देशाचं इमान मातीमोल ठरेल.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५३

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५३
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग
डेनिस किंकेड या लेखकाने आपल्या ‘हिस्ट्री ऑफ मराठा पीपल’ या पुस्तकात म्हटलंय - ‘ब्रेव्हेस्ट ऑफ द ब्रेव्ह, फेअरेस्ट ऑफ फेअर, बाजीराव डाइड लाइक द मोस्ट फॅसिनेटिंग फिगर इन अ रोमान्स ऑफ लव्ह.’
ग्रॅण्ट डफने ‘हिस्ट्री ऑफ मराठाज’मध्ये म्हटलंय - ही हॅड बोथ द हेड टू प्लॅन अॅण्ड द हॅण्ड टू एक्झेक्यूट.
मिर्झा मोहम्मद नावाच्या एका इतिहासकाराने आपल्या ‘तारीखे मुहम्मदी’ या ग्रंथात बाजीरावाच्या निधनाबद्दल म्हटलंय- साहिबी फुतुहाते उज्जाम. अर्थात प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव मृत्यूला बिलगला.’’
जगभरातल्या इतक्या इतिहासकारांनी आणि बखरकारांनी ज्याला नावाजलं त्या पंडित प्रधान श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशवे यांची महती निनाद बेडेकरांनी थोडक्यात वर्णन केली.
खरं तर मराठय़ांच्या इतिहासात आपल्या उंबऱ्याबाहेर जाऊन मुलुखगिरी करण्याचं स्वप्नं सर्वप्रथम बाजीरावानेच दाखवलं. आज आपण परप्रांतीयांच्या घुसखोरी विरोधात आपलाच बचाव करण्यात शक्ती खर्च करतोय. पण बाजीरावाने मराठी साम्राज्यवादाचं स्वप्न तीनशे वर्षांपूर्वी जोपासलं होतं. त्यासाठी त्याने क्षत्रियत्व स्वीकारलं आणि ते ग्रेसफुली पेललं.
घोडदळ हा त्याकाळातल्या लढाईचा आत्मा. मंगोलियन योद्धे घोडय़ावर मोठे होतात असं म्हटलं जायचं. तसाच बाजीराव घोडय़ावर मोठा झाला. तो त्याच्या काळातला सर्वोत्तम घोडेस्वार होता. त्याच्या शिपायांसोबत तो घोडय़ावर सर्वात पुढे असायचा. घोडय़ावरच पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खातखात दौड करीत फाके मारत बाजीराव सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५२

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५२
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग
बाजीराव प्रचंड महत्त्वाकांक्षी होता. त्याकाळात व्यापक पातळीवर दृष्टिकोन ठेवण्याची त्याची पात्रता होती. म्हणूनच छत्रसालाच्या मदतीला तो धावून गेला. त्याने २५ हजारांची फौज घेऊन मुहम्मद खान बंगश याला जैतपूरच्या लढाईत मात दिली. पण तो मुत्सद्दी म्हणूनही हुशार होता. म्हणूनच इलाहाबादच्या या सुभेदाराला त्याने आपल्या मातोश्री राधाबाई यांच्या काशीयात्रेची जबाबदारी घ्यायला लावली. ही स्ट्रॅटेजिक मूव्ह म्हणून खूप मोठी गोष्ट होती. त्या काळात काशी यात्रा करणं खूपच जिकिरीचं होतं. काशी यात्रेला गेलेला माणूस जिवंत परत येईलच याची अजिबात खात्री नसायची. पेशव्याच्या मातोश्रींच्या काशीयात्रेची जबाबदारी बंगशाला घ्यायला लावून त्याकाळात बाजीरावाने एका दगडात अनेक पक्षी मारले होते.
बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होताच शिवाय त्याचं चारित्र्यही चांगलं होतं. मस्तानीशी जोडलं गेलेलं नाव हा बाजीरावाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. मात्र मस्तानीसही त्याने सहकारिणीचा दर्जा देऊ केला. त्या काळात ते मोठंच धारिष्टय़ होतं. अर्थात या चारित्र्य संपन्नतेमुळेच तो सर्व मराठा सरदारांना एकत्र करू शकला, आणि त्याने शाहूचाही विश्वास संपादन केला.
बाजीरावाची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. बाजीराव निघालाय या एवढय़ा बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परत निघाला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५१

 




हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५१
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग
बाजीरावाचं उमदेपण सांगताना तसंच बाजीरावाच्या युद्धकौशल्याचे दाखले देताना इतिहासाचे गाढे अभ्यासक निनाद बेडेकर सांगतात , ‘बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजामाविरुद्ध १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला कसं घुमवलं आणि त्याचा पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा स्ट्रॅटेजिक वॉरफेअरच्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं.
बाजीराव खूप मोठा युद्धनीतीज्ञ होता. म्हणूनच तो अजेय राहिला. त्याच्या कारकीर्दीतली एकही लढाई तो हरला नाही. म्हणून त्याची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते.
फील्डमार्शल मॉण्टगोमेरी यांचं युद्धशास्त्रावर आधारित ‘अ कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर’ नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात त्यांनी बाजीरावाच्या पालखेडच्या लढाईबाबत म्हटलंय की १७२७-२८ची बाजारावाची निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची चढाई हा ‘मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी’ होता. बाजीराव आपल्या शत्रूला इप्सित स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर बाजीराव वाट पाहायचा. एखाद्या कसलेल्या शिकाऱ्याप्रमाणे तो पेशन्स ठेवायचा. घोडदळ हे बाजीरावाचं सर्वात मोठं बलस्थान होतं. दिवसाला ४० मैलाचा टप्पा त्याचं सैन्य गाठायचं. तो त्याच्या काळातला अत्युत्तम वेग होता. त्यामुळे शत्रूला सुगावा लागायच्या आतच बाजीरावाचा हल्ला झालेला असायचा.
बाजीरावाची गुप्तचर व्यवस्था ही त्याची दुसरी मोठी शक्ती होती. अक्षरश: क्षणा-क्षणांची माहिती त्याला मिळायची. मार्गात येणाऱ्या नद्या, उतार-चढाव, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती बाजीरावाकडे असायची.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५०

 




हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५०
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग 3
बाजीरावाच्या राज्यविस्ताराच्या मोहिमेचा पुढच्या इतिहासावर असा सुयोग्य परिणाम झाला, याचं आकलन आज आपल्याला होऊ शकतं. पण सर्वसामान्य लोकांपर्यंत ते कधी पोहोचलंच नाही. मराठय़ांच्या इतिहासातला हा रांगडा पंडितप्रधान उपेक्षित राहिला.
वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदाची वस्त्रं ल्यायलेल्या बाजीरावाला आयुष्य मिळालं केवळ ४० वर्षांचं. अवघ्या वीस वर्षांच्या त्याच्या कारकीर्दीत तो मुलुखगिरीसाठी अधिककाळ बाहेर राहिला. त्याचा अंतही माळव्यातल्या नर्मदातटावरच्या रावेरखेडीला झाला. त्यामुळे मराठी मनाने या योद्धय़ाचं अपेक्षित ऋण मान्य करताना बराचसा कद्रुपणा दाखवला. बाजीरावाचा संदर्भ आता अचानक येण्याचं कारण या उपेक्षेचंच. २८ एप्रिल १७४० रोजी (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) रावेरखेडीजवळ उष्माघाताने बाजीरावाचं निधन झालं. बाजीरावाच्या विरहाने त्याच्यासोबत एका हत्तीने आणि घोडय़ानेही अन्नपाणी वज्र्य करत प्राण सोडला. बाजीरावासह प्राण सोडलेल्या हत्तीची आणि घोडय़ाची थडगीही नर्मदेच्या पात्रात आहेत. जिथे बाजीरावाला अखेरचा निरोप दिला गेला तिथे नर्मदातटावर नानासाहेबाने ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावाची वृंदावन स्वरूपातील एक समाधी बांधली. बाजीरावाच्या अस्थि या समाधीस्थळी असल्याचं बोललं जातं.
ज्या बुंदेलखंडाची लाज वाचवायला बाजी धावून गेला, त्या बाजीचीच लाज राखण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्यानं कधी पराभव पाहिला नाही, ज्यानं आपल्या मनगटानं दिल्ली काबीज केली आणि इराणपर्यंतच्या पातशाह्या हलवल्या, त्या जगातल्या एकमेव अजेय, अपराजित योद्धय़ाची समाधी बुडिताखाली जातेय आणि आपण सारे या इतिहासाचा आणि परंपरेचा वारसा सांगणारे इथे मनगटं चावत बसलोय.

Friday 6 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४९

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग २

इतिहासकारांच्या दृष्टिने बाजीरावाचं मूल्यमापन प्रचंड मोठं आहे. मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच धुरंधर. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच रणसेनानी. बाजीराव हा जगाच्या इतिहासातला संभाजी महाराज यांच्या नंतरचा एकमेव अजेय योद्धा मानला जातो. अ मॅन हू नेव्हर लॉस्ट अ बॅटल, असं त्याचं वर्णन केलं जातं. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावाने ३५ महत्त्वाच्या लढाया केल्या आणि सर्व लढायांमध्ये तो जिंकला. त्याला हरवणं त्याच्या काळातल्या मातब्बर शत्रूंनाही जमलं नाही. पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला.

बाजीराव जर उत्तरेत घुसला नसता आणि त्याने गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व मार्ग आपल्या कब्जात घेतले नसते तर पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी, अकबर किंवा औरंगजेबासारखा उत्तरेतला शासक प्रचंड सेना घेऊन दक्षिणेत उतरला असता आणि संभाजी राजाच्या हत्येची किंवा राजारामाच्या पळापळीची दुसरी आवृत्ती निघाली असती. बाजीरावाने आपल्या पराक्रमाने ही आपत्ती कायमची दूर केली. बाजीरावाने भीमथडीची तट्टे नर्मदापार नेल्यापासून उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत यायचे कायमचे बंद झाले. बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार, खेर हे मराठा सरदार वसवले आणि त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं उदयास आली.


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४८

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १

शिवरायांचा काल संपला होतो .संभाजी महाराजांचाही काल संपला होता .संताजी आणि धनाजी यांच्यासारखे मावळे काळाआड गेले होते .मुगल साम्राज्य खिळखिळे झाले होते
निजामशाही वेगाने पुढे येत होती .महाराष्ट्राला गरज होती शिवरायान्सारखे आणि शंभू राजान्सारखे सामर्थ्य असणाऱ्या मर्द मराठाची
आणि असा एक पेशवा महाराष्ट्रात जन्माला आला त्याने मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखविली शहाजी राजांनी आणि जिजाबाई यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न ,शिवरायांचे स्थापन केलेले स्वराज्य .शंभू राजांनी साम्भालेले स्वराज्य ,शाहू महाराज्यांच्या काळात स्वराज्याचे रुपांतर मराठेशाहीत झाले ,त्या मराठेशाहीला संपूर्ण भारतात वेगाने पुढे नेले त्या श्रीमंत बाजीराव पेशवा आणि त्याच्या मराठा सरदाराची हि कहाणी

पराक्रमाच्या बाबतीत शिवाजी राजा आणि संभाजी राजे यांच्या बरोबरीने असूनही मराठय़ांच्या इतिहासात थोरला बाजीराव पेशवा हा तसा ‘अनसन्ग हीरो’च म्हणावा लागेल. सध्याच्या मनोरंजनाच्या युगात तर बाजीराव-मस्तानी ही हिंदू पाश्र्वभूमीवरची लव्हस्टोरी म्हणून सादर केली जात आहे. त्यामुळे थोरल्या बाजीरावाच्या ऐतिहासिक पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान झालं. बाजीरावातला योद्धा झाकोळला गेला आणि एक प्रेमज्वरग्रस्त पेशवा तेवढाच सामोरा आला. मस्तानी हे बाजीरावाच्या आयुष्यातलं रोमॅण्टिक पर्व जरूर असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी चौकटीत बसवणं अन्यायकारक होईल

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४७


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४७

सूर्याजी काकडे म्हणजे महाभारतातला जणू कर्णच
साल्हेरचा किल्ला मराठ्यांनी घेतला पण तो पुन्हा जिंकण्यासाठी बहादूरखान, दिलेरखान, इखलासखान साल्हेरवर चालून आले. इखलासखानाने किल्ल्याला वेढा घातला तर बहादूरखान आणि दिलेरखान महाराजांचा मुलुख मारण्यासाठी मोहिमेवर गेले.

जवळजवळ वीस हजार मुघली सैन्याचा वेढा किल्ल्याभोवती पडला होता. महाराजांनी तडक आपल्या हेरां मार्फत ही बातमी सेनापती प्रतापराव यांस कळविली. १६७२ च्या आरंभिस प्रतापराव आणि मोरोपंत यांच्या संयुक्त फौजा साल्हेरच्या आसमंतात दाखल झाल्या.

पहाटेच्या वेळेस सेनापतीच्या फौजेने पहाटेच्या साखर झोपेत असणाऱ्या मुघली छावणीवर असा काही हल्ला चढविला की, अनेक मुघल सैनिकांना शस्त्रे उचलायला उसंतच मिळाली नाही आणि ते कापले गेले. थोडावेळ खडाजंगी झाली आणि अचानक मराठ्यांनी माघारीची शिंगे फुंकली. विजय जवळच असणाऱ्या मराठ्यांनी अशी माघार का घेतली हे मुघलांना कळलेच नाही. पाळणारे मराठे बघून मुघलांना जोर आला आणि ते मराठ्यांचा पाठलाग करू लागले. छावणी पासून दूर आल्यावर पाळणारे मराठे पुन्हा उलटे फिरले आणि त्यांनी मुघलांचा सामना केला, तर मुघलांच्या मागेच ताज्या दमाची मराठ्यांची फौज येऊन थडकली आणि आशयाच प्रकारे त्यांच्या परतीची वाट बंद करून टाकली.

छावणीतल्या मुघली सैन्याला पाठलागावर गेलेल्या आपल्या सैन्याची काही बातमी मिळतच नव्हती आणि त्यातच त्यांच्यावर मोरोपंतांची राखीव फौज येऊन आधळली. मराठ्यांचा हा हल्ला सुद्धा इतका भयानक होता की, मुघलांना हत्ती आणि बैल गाड्यांच्या मागे लपून बसण्या शिवाय पर्याय नव्हता.

अखेर मुघल हरले. अमरसिंह, मोहकमसिंह आणि असे त्यांचे अनेक सरदार मारले गेले तर अनेक सरदार कैद झाले. खुद्द इखलासखान जखमी होऊन पकडला गेला. दहा ते बारा हजार मुघल सैनिक मारले गेले. त्यांचे अनेक हत्ती, उंट, घोडे, बैल, तोफा, शस्त्रे, जडजवाहीर, उंची कापडे, आणि तंबू मराठ्यांचा हाती लागले. या युद्धात मराठ्यांचे सुद्धा बरेच नुकसान झाले. चार ते पाच हजार मराठी सैनिक मारले गेले.

सभासद लिहितो की, "या युद्धात रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लागले, असा कर्दम जाहला. प्रतापराव सरनौबत व आनंदराव व व्यंकोजी दत्तो व रुपजी भोसले व सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मुकुंद बल्लाळ व मोरो नागनाथ उमराव असे यांणी कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनौबत या उभयतांनी आंगीजणी केली आणि युद्ध करिता सूर्यराव काकडे पंचहजारी जांबुरीयाचा गोळा लागून पडले ".

सूर्याजी काकडेना महाभारतातल्या शूर कर्णाची उपमा दिली आहे.

संदर्भ: डॉ.शिवदे आणि सभासद बखर...

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४६

गुणाजी सावंतांनी काबीज केला सिद्धगड
शंभू राजांच्या हत्ये नंतर मुघल जास्तच आक्रमक बनले आणि त्यांनी भेदरलेल्या मराठ्यांचे किल्ले घेण्यास सुरुवात केली. शंभू राजे गेले आणि काही महिन्यात रायगड सुद्धा मुघलांनी सर केला. रायगड पडला आणि शंभू राजांचा कुटुंब कबिला जुल्फिकार खानच्या कैदेत सापडला. राजाराम आधीच निसटल्यामुळे बचावले पण त्यांच्यावर सुद्धा देश सोडून दक्षिणेत जाण्याची पाळी आली. एक राजा मारला गेला त्याचा वारस कैद झाला, दुसरा राजा देशोधडीला लागला त्याकारणाने आपल्याला कोणी वाली राहिला नाही असा समज करून घेऊन अनेक किल्लेदारांनी न झुंजता किल्ले मुघली सैन्याच्या हवाली केले. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात १७व्या शतकाच्या शेवटास होती.

राजाराम राजे सुखरूप जिंजींस पोचले त्यांनी तेथून राज्यकारभार चालविण्यास प्रारंभ केला. जिंजी ही मराठ्यांची नवीन राजधानी बनली तेथे त्यांच्या छत्रपतींनी स्वताचे नवीन अष्ट मंडळ निर्माण केले. दख्खनेत आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांच्या बरोबर संताजी आणि धनाजी या वीरांना ठेवले. या सर्वांनी मोहिमा काढून गेलेले किल्ले, मुलुख जिंकण्यास सुरुवात केली.

आपसूक मिळालेले किल्ले सुद्धा मुघलांना धड सांभाळता येईनात आणि मराठ्यांच्या गनिमी काव्य समोर तर त्यांचा निभाव लागणे कठीण होऊन बसले. असाच एक किल्ला सिद्धगड जो उत्तर कोकणात आहे तो शंकराजी नारायण यांचा विश्वासू हस्तक गुणाजी सावंत याने अचानक छापा मारून घेतला. या युद्धात गुणाजी सावंतांनी फारच मोलाची कामगिरी करून मुघल किल्लेदाराला आणि अनेक मुघली सैन्याला कापून काढले आणि अवघ्या काही घटकात किल्ला काबीज केला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४५


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४५

संभाजी कावजी

आता विषय संभाजी कावजीचा -

प्रतापगड चे युद्ध हे शिवाजी राजांच्या जीवनातला पहिले मोठा युद्ध . पहिला मोठा विजय नव्हे तो तर दिग्विजय एवेध्या मोठ्या सेनापतीला मारणे आणि त्याच्या सैन्याची लांडगेतोड करणे हे तर खरा कौशल्याचे काम . पण माझ्या मते इतिहास करांनी याच्या युद्ध्या विषयक बाजू तेवढ्या तपासल्या नाहीत . ह्या सगळ्या प्रकरणाचा फार बारकाई ने अभ्यास करण्याची गरज आहे. त्या statergy चा अभ्यास करैइला हवा .

प्रताप गड च्या युद्धाकर्ता खालील साधने वापरावी लागतात
१== > शिव भारत , सभासद बखर ,जेधे शकावली आणि जेधे करीना हि सर्व विश्वसनीय साधने आहेत .
२==> आणि चिटणीस , शिवदिग्विजय , ९१ कलमी बखर हि काहीशी अविश्वसनीय साधने आहेत . ह्या साधनांचा वापर दुय्यम किवा तिय्यम साधने म्हणून करतात
३==> तसेच english ,duch कागद पत्र पण आहेत पण ती विश्वसनीय नाहीत . ती तिय्यम साधने आहेत .

आता विषय प्रताप गडच्या युद्धाचा -

शिवाजी राजांनी अफझलखानाला मारले हे सगळ्यांनाच माहित आहे . पण त्याचे १००% खरा वर्णन मिळणे मुश्कील आहे. पण त्या मध्ये सगळ्यात विश्वसनीय
१ >शिवभारत - शिवभारत सांगते कि शिवाजी राजांनी अफझल खानाला मारले . आणि कावूक (संभाजी कावजी ), जीवा महाला ऐतर लोकांनी अफझलखानाच्या लोकांवर हल्ला चढवला (आध्याय २१ , श्लोक ७०-८० ).
२> जेधे शकावली - शिवाजी राजांनी अफझल खानाला मारले . आणि संभाजी कावजी , जीवा महाला ऐतर लोकांनी अफझलखानाच्या लोकांवर हल्ला चढवला .(पृष्ठ -३३ )
३ > सभासद बखर -
शिवाजी राजांनी अफझल खानाला घ्यायाल केले आणि मग संभाजी कावजी महालदार याने भोयांच्या पाय कापले आणि खानाचे डोके कापले . (पृष्ठ - २२ )
४>जेधे करीना - शिवाजी राजांनी अफझल खानाला घ्यायाल केले आणि मग जीव महाला आणि सर्जाराव आणि ऐतर लोक येऊन पाय कापले आणि अफझल खानाचे डोके कापले .
पण या सगळ्या प्रथम दर्जाच्या पुराव्या मध्ये एक वाक्यात्या नाही . त्या मुले काही सांगणे शक्य नाही आहे .

संभाजी कावजी हा शिवाजी राजांचा अंगरक्षक आणि भालदार होता . हनमंत राव मोरे कडे राजांनी त्याला पाठवला आणि संभाजी नि हनमंत राव ला मारला (सन १५५६ ). पुढे अफझलखानाच्या वेळेस तो अंगरक्षक होता .त्याचा उल्लेख वर आलाच आहे .संभाजी चा मित्र बाबाजी राम शायीस्तेखानाला मिल्यावर(साधारण १६६०-61) शिवाजी राजांनी त्याला बोल लावले ,म्हणून तो चिडून शायीश्तेखानास मिळाला त्याचे शौर्य पाहून खानांनी त्याला सालाबत खान दखनी याकडे ५०० स्वरान सहा ठेवले . पुढे शिवाजी राजांनी प्रताप राव गुजर यांना पाठून १६६१ मध्ये संभाजी कावजी ला मारले .

संधर्भ :-
१> ९१ कलमी बखर , कलम ४३ , पृष्ठ ३१-३२ .
२> सभासद बखर , र .वि . हेर्वाद्कर . टीप पृष्ठ ९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४४


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४४

संताजी पुत्र राणोजी घोरपडे.
मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे त तब्बल ९ वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने आपले एका हून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत.

किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत. गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे. धनाजी जाधवांच्या आणि हिंदुराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते.

पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे. या युद्धात राणोजी घोरपडेनवर जबाबदारी होती ती मुघली रसद मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली. राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात. १७०२ च्या सुमारास मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे धारातीर्थी पडले.

ताराराणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजीच्या पराक्रमाची याद ठेवून कापशी सुभा इनाम म्हणून दिला.

संदर्भ: डॉ. जयसिंग पवार

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४३


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४३

नारोजी त्रिंबक यांची शौर्यगाथा
औरंगजेबाने सह्याद्रीला धडक दिली आणि सह्याद्रीच्या पाठीवर असलेले गडकोट जिंकण्यासाठी मोघली सरदारांना आज्ञा दिली. ताज्या दमाच्या मुघली सैन्याने मराठ्यांच्या किल्ल्यांना वेढे घातले आणि दमदमे रचून तटाबुरुजांवर तोफगोळ्याचा मारा करू लागले. पण मुघली बादशाह आणि त्याच्या सरदारांचा लवकरच भ्रमनिरास झाला. मराठ्यांनी असा काही प्रतिकार केला की सर्वच आघाड्यांवर मुघल पाठ दाखवून पळून गेले.

साधारण १६८४ च्या शेवटास पेठचा किल्ला घेण्यासाठी मुघली सरदार अब्दुलकादर प्रचंड दारूगोळ्या सहित येऊन वेढा घालून बसला होता, त्याला माणकोजी पांढरे या फितुराची सुद्धा साथ मिळाली. अब्दुलकादरला जुन्नरहून अब्दुलखान दारुगोळा आणि रसद पुरवीत असे. ही माहिती जेव्हा मराठ्यांना मिळाली तेव्हा नारोजी त्रिंबक या शूर मराठा सरदाराने आपल्या तुकडीसह त्याची वाट अडवून धरली. गनिमी काव्याचा उपयोग करून नारोजी त्रिंबकने अब्दुल्खानला हैराण करून सोडले. पण मराठ्यांच्या दुर्दैवाने एका लढाईत नारोजी त्रिंबक आणि त्यांचे अनेक मराठे धारातीर्थी पडले. अब्दुलखानाने नारोजीचे शिर कापून आसपासच्या गावात फिरविले आणि या शूर मराठ्याची विटंबना केली.

अखेर अब्दुलकादरने किल्ल्यावर जोरदार हल्ला चढविला पण त्याचा हा हल्ला मराठ्यांनी परतवून लाविला आणि त्याला त्याच्या छावणीत पिटाळून लाविला. पण या धावपळीचा फायदा उठवीत माणकोजी पांढरेच्या सैन्यातील काही मावळे किल्ल्यात घुसले आणि त्यांनी लगेच कापाकापी करण्यास सुरुवात केली. मोघली सैनिकांनी अखेरीस पेठचा किल्ला काबीज केला

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४२


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४२

स्वराज्याशी एकनिष्ठ राहिलेले साठम घराणे.
औरंगजेब दक्षिणेत चालून आला पण काही महिन्यातच त्याला उमगले की महाराजांच्या मृत्युनंतर सुद्धा सह्याद्री तितकाच किंबुहाना थोडा अधिकच अभेद्य आणि आक्रमक होता. औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही अवघ्या काही महिन्यातच फस्त केल्या आणि मग पुन्हा नव्या जोमाने तो स्वराज्यावर चालून आला. या वेळेस त्याला नशिबाची आणि काही गद्दारांची साथ लाभली. १६८९ हे वर्ष त्याला लाभदायक ठरले, या वर्षात त्याने मराठ्यांच्या राजाचा खुन केला, मराठ्यांची राजधानी जिंकली, आणि राज परिवार कैद केला. पण मराठ्यांचा एक राजा निसटला होता, त्याने पलायन करून थेट जिंजी गाठली. जिंजीतून तो राज्य कारभार करू लागला.

या महाराष्ट्रातील अनेक सरदार घराणी औरंगजेबाच्या पायावर लोटांगण घालीत होते पण अशी सुद्धा काही घराणी होती जे महाराजांच्या स्वराज्यावर निष्ठा ठेवून होते. संकटाच्या समयी त्यांची निष्ठा किंचित सुद्धा ढळली नाही. असेच एक घराणे होते साठम घराणे.

साठम घराण्याचा पराक्रम ताराराणी यांच्या एका पत्रातून वाचायला मिळतो. औरंगजेब पन्हाळ्याला वेढा घालून बसला असता एसोजी साठम आणि सूर्याजी साठम (पाच हजारी) या दोन शूरांनी मर्दुमगीची शर्थ केली.
साठम घराण्यातील माणकोजी, हिरोजी, बापूजी, प्रतापजी या शूरांनी पावनगड आणि पन्हाळगडावर अतिशय मोलाची कामगिरी केली होती.

संदर्भ: डॉ. सदाशिव शिवदे

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४१
भाऊंचा जिवलग बळवंतराव मेहेंदळे
भाऊ कुंजपुरा जिंकून पुढे कुरुक्षेत्री गेले पण तोपर्यंत अब्दाली यमुना पार होऊन दिल्ली आणि भाऊच्या मध्येच येऊन ठेपला. अब्दालीचा हा धाडसी निर्णय युद्ध त्याच्या बाजूने झुकण्यास फायद्याचा ठरला.
मराठे सुद्धा पानिपत येथे अब्दाली पासून अवघ्या ७-८ मैलावर येऊन थांबले. दोन्ही बाजूंच्या सैन्याने तोफा आपल्या छावणी बाहेर आणून ठेवल्या. अब्दाली आणि भाऊ दोघेहि एकमेकांची ताकद आजमावण्यासाठी छोट्या चकमकी घडवीत होते. तारीख ७ डिसेंबर, कार्तिक वद्य अमावस्या, नजिबखानच्या भावाने मराठ्यांच्या छावणीवर हल्ला चढविला. सुलतानखान ८-९ हजार रोहील्यांच्या फौजेसह मराठ्यांनवर येऊन थडकला. शत्रू जवळ आलेला पाहून मराठे संतापले आणि त्यांनी सुद्धा हर हर महादेवची सिंह गर्जना करीत त्वेषाने रोहील्यानवर हल्ला चढविला. बळवंतराव मेहेंदळे सुद्धा आपल्या तुकडीसह नागवी समशेर फिरवीत युद्ध मैदानावर आले. मेहेंदळे यांचा जोम पाहून मराठ्यांना जोर आला आणि त्यांनी रोहिल्यांना कापायला सुरुवात केले. लढाई चांगलीच रंगली. मराठी तोफखान्याच्या टप्प्यात असल्यामुळे अनेक रोहिले मारले गेले. या चकमकीत मराठ्यांची सरशी झाली होती पण त्याला बळवंतराव मेहेंदळेच्या मृत्यूचे गालबोट लागले. युद्ध मैदानात बेफाम होऊन लढणार्या मेहेंदळेनच्या छातीत गोळी लागली आणि ते घोडयाखाली पडले. काही रोहिले त्यांचे हिर कापण्यास पुढे सरसावले पण खंडेराव निंबाळकर आणि त्यांच्या काही सैनिकांनी मेहेंदळे यांचे मृत शरीर छावणीत आणले.
मेहेंदळे यांच्या मृत्यूमुळे युद्ध जिंकले तरी मराठ्यांचे मनोधैर्य पार खच्ची झाले होते.
संदर्भ: शेजवलकर

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४०

गोपाळराव बर्वेंची पानिपतवर अडकलेल्या भाऊला मदत
१७६० च्या अखेरीस गोविंदपंत बुंदेला, अब्दालीची रसद मारण्यासाठी रोहिलाखंडात शिरले. पानिपत येथे मराठी सैन्याची अन्नपाण्यावाचून वाताहात झाली होती. अन्न विकत घेण्यासाठी हातात पैसा सुद्धा नव्हता, भाऊ सतत मामलेदरांकडे पैश्यासाठी तगादा लावत होते.

३० डिसेंबर १७६० रोजी उत्तरेतला अजून एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे, दहा हजाराचे अनअनुभवी सैन्य घेऊन शूजाच्या मुलुखात घुसला. गोपाळरावांच्या मराठी शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या आश्रयास गेले. मराठ्यांनी आता या गढीला वेध घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पूर्ण बिमोड झाला, त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्ध बंदी झाले. मराठ्यांनी शूजाच्या मुलुखाची वाताहात केली आणि ते तसेच पुढे अलाहाबाद प्रांतात सरकले. अलाहाबाद जवळ असलेल्या नबाबगंज या समृद्ध पेठेवर मराठ्यांनी हल्ला केला आणि ही पेठ लुटून फस्त केली. मराठे तसेच फुलपुर्यास गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केला. गंगेच्या तीरावर मराठ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हे करण्या मागे त्यांचे मुख्य उधिष्ठ म्हणजे, शुजा ने अद्बली आणि नजीबची साथ सोडून पुन्हा आपल्या प्रांतात यावे. पण हे सगळे करायला फार उशीर झाला होता कारण पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला होता आणि हे जेव्हा गोपाळरावांस समजले तेव्हा त्यांनी ही मोहीम सोडून सैन्यासह सुखरूप कुडाजहानबादेस परत आले.

खरे म्हणजे पानिपतावर मराठ्यांची वाताहत होत असताना गोपाळरावांन सारख्या एका सामान्य मामलेदाराने असा पराक्रम करणे म्हणजे भूषणास्पद गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आज या गोपाळरावांचे साधे नाव सुद्धा कुणास माहित नाही, पण पानिपतच्या पराभवाचे खापर मात्र अनेक इतिहासकार आणि कादंबरीकार मामलेदारांवर फोडतात.

संदर्भ: त्र्यंबक शेजवलकरांनी मात्र गोपाळरावांची ही शौर्यगाथा "पानिपत १७६१" या त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केली आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३९


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३९

गोविंदपंत बुंदेले यांची कामगिरी
पानिपतच्या प्रांतात दोन्ही फौजा आमने सामने उभ्या ठाकल्या होत्या. ते एकमेकांची ताकद आजमावून पहात होते. दिवसा दोन्हीकडच्या फौजा आमनेसामने येत आणि कधी छोट्या तर कधी भीषण चकमकी करून पुन्हा संध्याकाळी आपल्या आपल्या छावणीत परतीत. असेच काही दिवस गेले, पहिले काही दिवस मराठ्यांची बाजू वरचड होती, झाडलेल्या चकमकीत त्यांचेच वर्चस्व दिसून येत होते पण नंतर परिस्थितीत झपाट्याने बदल होत गेले. मराठ्यांनकडचा अन्नसाठा संपत आला त्यांचा रसद पुरवठा बंद पाडण्यात आला, छावणीत खायला अन्न महाग झाले. अब्दालीने मराठी फौजेला पाणी पुरविणारे कालवे सुद्धा बंद पाडले. डिसेंबर महिन्यात मराठ्यांचे हाल कोल्ही-कुत्र्यांना सुद्धा नको झाले. याच्या विपरीत परिस्थिती अब्दालीच्या फौजेत दिसू लागली. जी फौज काही महिन्यापूर्वी हताश झाली होती त्यात एकदम नवा जोम दिसू लागला. ताज्या दमाचे सैनिक काबुलहून येऊन त्यांना मिळाले, गील्च्यांना नजीब आणि शूजच्या प्रदेशातून व्यवस्थित रसद पुरविली जाऊ लागली.
अखेर ही रसद थांबविण्याशिवाय दुसरा पर्याय भाऊ समोर राहिला नाही. पण जनकोजी किंवा दत्ताजी शिंदे सारखा तडफदार सरदार अंतर्वेदित नव्हता. तिथे मराठ्यांच्या बाजूचा जर कोणी होता तर तो म्हणजे गोविंदपंत बुंदेला. पण गोविंदपंत हा एक मामलेदार होता कोणी शिपाईगडी नाही, त्याचे निम्मे आयुष पालखीत बसण्यात गेले असावे आणि आता त्याला घोड्यावर बसून शत्रूच्या मुलुखात धुडगूस घालणे कर्मकठीण होते. बरे त्याच्या हाताखाली सुद्धा खडी फौज नव्हती त्याला उत्तरेतल्या जाठ, गोसावी, आणि मुसलमानी लोकांचीच मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. इतके असून सुद्धा केवळ भाऊची आज्ञा मानून त्याने अब्दालीची रसद मारण्याचे काम अंगावर घेतले होते.
गोविंदपंत यमुना पार होऊन मेरठकडे सरकला व त्याने मुलुख लुटून अब्दालीची रसद तोडण्याचा सपाटाच लावला. जवळजवळ आठ दिवस असेच चालू राहिले आणि अब्दालीच्या छावणीत सुद्धा अन्नाची चणचण भासू लागली. काबुलहून आलेल्या ताज्या दमाच्या फौजेला अब्दालीने गोविंदपंतांचा समाचार घेण्यास पाठविले. तिथे अंतर्वेदित गुजर नामक एका जमीनदाराने खंडणी देतो असे सांगून गोविंदपंतांना थांबवून घेतले आणि अब्दालीस फौज पाठविण्याचा निरोप पाठविला. निरोप मिळताच आताईखान जलालबादेजवळ पोचला. जेवायला बसलेल्या गोविंदपंतांवर गिलचे येऊन धडकले आणि त्यांचे शिर कापून अब्दालीकडे पाठवून दिले.

अब्दालीने हे शिर भाऊकडे त्यांस खिजविण्यासाठी म्हणून पाठवून दिले.

ही घटना साधारण २० डिसेंबर १७६० या दिवशी झाली असावी असे अनेक बखरकार लिहितात. गोविंदपंत मामलेदरांवर इतिहासकारांनी अनेक आरोप केले आहेत पण त्यांच्या बलिदानामुळे हे सर्व आरोप कसे अयोग्य होते हे कळते.