Total Pageviews

Saturday 18 August 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२३
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड
भाग ३
मोमीनखान हा १७४३ त (फेब्रुवारी) मेला. तो जिवंत होता तोपर्यंत दमाजीनें गुजराथेंतील व काठेवाडांतील आपले सर्व हक्क बिनहरकत वसूल केले. मोमीनच्या मरणानंतर अबदुल अझीझ याची नेमणूक झाली; पण तो औरंगाबादेहून गुजराथेंत येत असतां, मार्गांतच दमाजीनें अंकलेश्वर येथें त्यावर हल्ला करून त्याची सर्व फौज कापून काढली. यानंतर फकीरूद्दौला यास दिल्लीहून गुजराथेंत पाठविण्यांत आलें (१७४४). यावेळीं दमाजी साता-यास गेला होता; तथापि त्याचा सरदार रंगाजी यानें फकीरूद्दौल्यास विरोध करून गुजराथचा कारभार आपल्या हातीं घेऊं दिला नाहीं. दमाजीस खंडेराव नांवाचा एक भाऊ होता. दमाजी गुजराथेंत नसल्यामुळें त्याला कारभारांत ढवळाढवळ करण्यास संधि मिळाली. त्यानें रंगाजीस अहमदाबादेहून काढून तेथें दुस-या माणसाची नेमणूक करून फकीरूद्दौला यासहि कांहीं मदत दिली. परंतु रंगाजीस ही बातमी लागतांच तो लागलीच परत आला; व त्यानें खंडेराव व फकीरूद्दौला यांचा संबंध तोडून खंडेरावास संतुष्ट राखण्यासाठीं, त्यास बुरसत (बोरसादचा) किल्ला व नडियाद जिल्हा दिला व बडोदें येथें त्याला आपला प्रतिनिधि म्हणून नेमलें. १७४४ त दमाजी गायकवाड सात-यास आला होता. या वर्षी रघूजी भोंसलें व बाळाजी बाजीराव यांच्यामध्यें शाहूच्या मध्यस्थीनें जी तडजोड झाली, तींत असें ठरलें होतें कीं, दमाजीनें माळव्यांतून कांहीं दिवसांपूर्वी जी खंडणीची रक्कम वसूल केली, तिचा हिशोब त्यानें पेशव्यांस द्यावा. शाहूनें आपल्या मरणापूर्वी दमाजी गायकवाडास साता-यास हजर होण्याविषयीं हुकूम पाठविला होता; परंतु त्यावेळीं तो गेला नाहीं. (१७४८).
दमाजी हा ताराबाईस पेशव्यांच्याविरूध्द मदत करण्याकरितां १५००० सैन्य घेऊन साता-याकडे आला व त्यानें पेशव्यांच्या पक्षाच्या मंडळीचा नींब येथें पराभव केला (१७५१). परंतु ही बातमी नानासाहेबांनां लागतांच ते मोठमोठ्या मजला करीत दक्षिणेकडून साता-यास आले. पेशव्यांशीं बोलणें लावून तडजोड करून घेण्यासाठीं दमाजीनें खटपट चालविली पण ती सफळ झाली नाहीं. अखेर दमाजीवर पेशव्यांनीं अचानक हल्ला करून त्यास पकडून बंदोबस्तानें पुण्यास आणून ठेविलें व त्याच्या कुटुंबास कैदेंत ठेविलें.
भडोचच्या वसुलचा व जकातीचा हिस्सा गायकवाडास नक्की केंव्हा प्राप्त झाला हें कळत नाहीं. इ. स. १७४७ सालीं सुरतच्या अधिकारासंबंधीं मुसुलमानी निरनिराळ्या पक्षांत तंटे उपस्थित होऊन त्यांपैकीं सय्यद अचीनखानानें दमाजीचा चुलतभाऊ केदारजी यास आपल्या मदतीस बोलावले. याबद्दल तीन लक्ष रूपये केदारजीस देण्याचें ठरलें. परंतु केदारजीच्या मदतीवांचूनच अचीनखानाचें कार्य झाल्यानें तो ती रक्कम देण्यास टाळाटाळ करूं लागला. त्यावर केदारजीनें सुरतच्या आसपास लुटालूट करण्यास आरंभ केला. तेव्हां अचीननें नाइलाज होऊन त्या रकमेची फेड होईपर्यंत सुरतच्या वसुलाचा एकतृतीयांश हिस्सा केदारजीनें घ्यावा असें ठरविलें व तें केदारजीनेंहि दमाजीच्या सल्ल्यानें मान्य केलें. दमाजी पुण्यास पेशव्यांच्या कैदेंत होता त्यावेळीं (इ. स. १७५२-१७५४). पुनः सुरत येथें बरीच बेबंदशाही माजली होती. तिचा फायदा घेतां यावा म्हणून पुढें दिल्याप्रमाणें दमाजीनें पेशव्यांशीं करार करून आपली सुटका करून घेतली (१७५४). यावेळीं असें ठरलें कीं दमाजीनें १५ लक्ष रूपये देऊन मागील बाकीचा फडशा करावा; गायकवाडाकडे गुजराथेंत जो मुलूख आहे त्याचा अर्धा वांटा पेशव्यांस मिळावा व पुढेंहि त्यांनीं नवीन मुलूख जिंकल्यास त्याचाहि अर्धा हिस्सा पेशव्यांस मिळावा. अतःपर स्वार्‍यां-मध्यें जो कांही पैसा मिळेल त्यांतून स्वारीचा खर्च वजा जातां बाकी राहिेलेल्या रकमेचा अर्धा हिस्सा पेशव्यांस देत जावा. दहा हजार फौज चाकरीस ठेवून गरज पडेल तेव्हां पेशव्यांस मदत करावी, दाभाडे सेनापतीचे मुतालिक या नात्यानें गुजराथ प्रांताच्या वसुलांतून दरसाल सवापांच लक्ष रूपये सरकारांत द्यावे आणि छत्रपतींच्या इतमामासाठीं दरवर्षी कांहीं रक्कम पाठवीत जावी वगैरे. कैदेंतून सुटण्यासाठीं दरबारखर्च म्हणून दमाजीनें दहापंधरा लक्ष रूपये खर्च केले. सुटका झाल्यानंतर (१७५४) पावसाळ्याच्या अखेर राघोबादादांच्या गुजराथच्या स्वारींत दमाजी त्यांस येऊन मिळाला व ते दोघे खंडण्या गोळा करीत अहमदाबाद शहरीं (१७५५) आले. त्यांनीं शहरास वेढा देऊन तें हस्तगत केलें. येथील अधिकारी जवानमर्दखान बाबी याची नेमणूक मोमीनखान यांच्या भावानें केली होती. त्यानें कित्येक दिवसपर्यंत शहराचें रक्षण केलें, परंतु शेवटीं पट्टण, बंडनगर, राधनपूर, विजापूर आणि साबरमती व बनास या नद्यांमधील अहमदाबादच्या उत्तरेकडचे गुजराथेंतील कांही जिल्हे स्वतःस जहागीर घेऊन (एप्रिल महिन्यांत) त्यानें तें शहर मराठ्यांच्या स्वाधीन केले. अहमदाबाद हस्तगत झाल्यावर त्याचा वसूल गायकवाड व पेशवे यांनीं अर्धा अर्धा वांटून घ्यावा असें ठरलें. वरील बाबीच्या जहागिरीपैकीं बराचसा मुलूख पुढें १० वर्षांनीं दमाजीनें परत मिळवि

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२२
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड
भाग
पिलाजीच्या मृत्यूमुळें अभयसिंगास कांहीच फायदा झाला नाहीं. कारण पिलाजीचा दोस्त पाद्य्राचा (बडोद्याजवळील एक गांव) देसाई दिल्ला याच्या चिथावणीवरून सर्व देशभर कोळी व भील लोकांनीं बंड केलें. अभयसिंगाचें सैन्य त्यांचें बंड मोडण्यांत गुंतलें आहे असें पाहून पिलाजीचा भाऊ महादजी (हा जंबूसर बळकाऊन बसला होता) यानें बडोद्यावर स्वारी करून तें घेतलें (१७३२). येथपासून बडोदें ही गायकवाडांची राजधानी झाली. पिलाजीचा वडील मुलगा जो दमाजी त्यानेंहि याच सुमारास सोनगडाहून निघून गुजराथेंतील पश्चिमेकडचे बरेच मुख्य मुख्य जिल्हे पादाक्रांत केले. त्याच्या स्वा-या जोधपूरपावेतों जेव्हां जाऊं लागल्या तेव्हां आपल्या दुय्यम अधिका-याच्या स्वाधीन अहमदाबाद करून अभयसिंग हा जोधपूरच्या रक्षणार्थ तिकडे निघून गेला (१७३२).
पुढें दमाजीनें कंठाजी कदम वांडे यास गुजराथेंतून हांकून लावलें (१७३४); म्हणून कंठाजीनें पुढच्या सालीं मल्हारराव होळकरासह गुजराथेंत अकस्मात स्वारी करून बनास नदीपावेतों खंडण्या वसूल केल्या व ईदर, पालनपूर वगैरे कित्येक शहरें लुटलीं. या स्वारीनंतर लवकरच गुजराथच्या सुभेदारीचें काम अभयसिंगाकडून काढून नजीब उद्दौला मोमीनखान याच्याकडे देण्यांत आलें. पण अभयसिंगाच्या वतीनें गुजराथचा कारभार पहाणारा नायब सुभेदार हा अहमदाबाद सोडण्यास तयार नव्हता. तेव्हां मोमीनखानानें त्याला हांकून लावण्याकरितां दमाजीची मदत घेतली (१७३५). व ते दोघे पगडीभाई झाले. याप्रमाणें अहमदाबाद हस्तगत झाल्यावर तेथील सत्ता व वसूल या दोघांनीं वांटून घेतली (१७३७). बाजीराव उत्तरेस गेला आहे असें पाहून दमाजीनें माळव्यांत स्वारी केली (१७४२).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२१
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड
भाग
दमाजी गायकवाड- या गायकवाडांचें मूळ गांव पुणें जिल्ह्यांत धावडी हें होय. या घराण्याचा पूर्वज दमाजी हा खंडेराव दाभाड्याच्या सैन्यांतील एक सरदार होता. इ.स. १७२० मध्यें बाळापूर येथें निजामाशीं झालेल्या लढांईत दमाजीनें विशेष नांवलौकिक मिळविल्यामुळें खंडेरावाच्या शिफारसीवरून शाहू महाराजांनीं त्याला समशेर बहाद्दर असा किताब देऊन त्याची सेनापतीच्या मुतालिकीच्या जागीं नेमणूक केली. दमाजी हा १७२० त मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या (जनकोजीचा पुत्र) पिलाजी याची नेमणूक झाली (१७२१). पिलाजी हा खानदेशांत नवापूर येथें प्रथम रहात होता. परंतु पोवारांनीं हरकत घेतल्यामुळें त्यानें सोनगड येथें किल्ला बांधून तेथें आपलें ठाणें दिलें. हें ठिकाण बरेच दिवस गायकवाडांची राजधानी होतें. पिलाजीनें राजपिंपळ्याच्या राजाच्या मदतीनें १७२० त प्रथम सुरत प्रांतावर स्वारी केली व चौथ मिळविली व अहमदाबाद येथें आपला गुमास्ता ठेवला.

इ. स. १७२४ मध्यें पिलाजीनें गुजराथचा नायब सुभेदार हमीदखान यास सरबुलंदखानाच्या (नवीन सुभेदार) विरूध्द मदत करून, त्याच्याकडून मही नदीच्या पूर्वेकडील मुलखांत चौथ बसविण्याचा हक्क मिळविला. पुढें १७२५ सालीं पिलाजीनें पुन्हां हमीदखानास मदत करून अहमदाबादेजवळ अदालेदजी येथें सरबुलंदचा पराभव केला. तेव्हां पिलाजीशीं सख्य ठेवण्याकरितां सरबुलंदानेंहि गुजराथेंत चौथ बसविण्याचा अधिकार त्यास दिला. कंठाजीकदम बांडे यानेंहि हमीदखानास मदत केली होती. त्यामुळें चौथाईबद्दल त्यालाहि कांही हक्क मिळाले होते. त्या संबंधांत पिलाजी व कंठाजी या दोघांत तंटे माजले. त्याचा निकाल हमीदनें लावला. कंठाजीनें महीच्या पश्चिमेकडील व पिलाजीनें पूर्वेकडील प्रांतांची चौथ गोळा करावी असें ठरलें. नंतर पिलाजी सोनगडास गेला. पुढें सरबुलंद यानें गुजराथची सरदेशमुखी व चौथाई थोरले बाजीरावासच दिली (१७३१). बाजीराव व दाभाडे यांच्यांत डभई येथें युध्द झालें, त्यांत पिलाजी दाभाड्यांकडून लढत होता. या युद्धांत बाजीरावाचा सरदार आवजी कवडे याचा पिलाजीचा मुलगा दमाजी यानें पराभव केला. डभईच्या लढाईंत पिलाजीचा एक मुलगा मारला गेला व पिलाजीहि जखमी झाला. पुढें यशवंतराव दाभाड्यास सेनापतीचीं वस्त्रें मिळालीं, तेव्हां पिलाजीस त्याच्या मुतालकीच्या जागीं कायम करण्यांत येऊन 'समशेरबहाद्दर' या किताबाशिवाय सेनाखासखेल हा नवीन किताब त्यास देण्यांत आला. डभईच्या लढाईच्या वेळीं डभई व बडोदें हीं दोन्हीहि शहरें पिलाजीच्या ताब्यांत होतीं. सरबुलंदखानानें मराठ्यांस चौथाई सरदेशमुखीच्या सनदा करून दिल्यामुळें बादशहाची त्याच्यावर खप्पामर्जी होऊन त्याच्या जागीं जोधपूरचा राजा अभयसिंग याला गुजराथच्या सुभेदारीचें काम देण्यांत आलें. अभयसिंगानें थोड्याच दिवसांत बडोद्याचा किल्ला मराठ्यांकडून काबीज केला. परंतु पिलाजीनें इतरत्र बरेच जय मिळवून कित्येक मुख्य मुख्य ठाणीं बळकाविली होती, म्हणून अभयसिंगानें पिलाजीशीं कायमचे करारमदार करून टाकण्यासाठीं त्याच्याकडे आपले वकील पाठविले व त्यांच्याकरवीं डाकोर येथें त्याचा एके दिवशीं विश्वासघातानें खून केला (१७३२).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२०
दौलतराव शिंदे:
भाग २
नानानें कारस्थान करून रावबाजी व दौलतराव यांनां बाळोबाविरुद्ध आपल्याकडे वळवून घेतलें; दौलतरावास बरीचशी रक्कम कबूल केली व रावबाजीस गादीवर बसविण्याचें ठरविलें. तेव्हां दौलतरावानें बाळोबास कैद केलें. मात्र चिमाजी आप्पा व परशुरामभाऊ हे पळून गेले. पुन्हां रावबाजी गादीवर आला. याच वेळीं नानाला न समजतां रावबाजीनें दौलतरावाशीं एक गुप्त तह केला होता कीं, नानांपासून आमचें रक्षण सतत करावें, त्याबद्दल आम्ही दोन कोट रु. देऊं आणि सर्जेराव घाटग्याची मुलगी (ही दौलतरावाच्या मनांत फार भरली होती) तुम्हांस करून देऊं. त्याप्रमाणें हें लग्न होऊन सर्जेरावास दौलतरावाची दिवाणगिरीहि मिळाली.
या सुमारास् तुकोजी होळकर मेला व त्याच्या मुलांमध्यें सरदारीबद्दल तंटा लागला. तेव्हां शिंद्यानें काशीरावाचा पक्ष घेऊन त्याचा शूर भाऊ मल्हारराव याच्यावर एकाएकीं छापा घालून त्यास ठार मारून त्याच्या अल्पवयस्क मुलास (खंडेराव) आपल्यापाशीं ठेवून त्याच्या नांवें होळकरी संस्थान चालविलें. त्यामुळें त्यांच्यांत व यशवंतरावांत वैर माजलें. आतां शिंदे हा नानांजवळ कबूल केलेली रक्कम व नगरचा किल्ला आणि १० लाखांचा मुलूख मागूं लागला. नानानें बरीच रक्कम भरून उत्तरेकडे कूच केल्यास किल्ला देण्याचें कबूल केलें. कारण क्षणैकबुद्धि रावबाजी त्याच्या साहाय्यानें नानास अपाय करण्यास टपला होता. परंतु शिंदा जाईना. यावेळीं अनेक मसलती झाल्या. अखेर वचन देऊन शिंद्यानें नानांस आपल्या गोटांत आणवून विश्वासघातानें (रावबाजीच्या सांगण्यावरून) त्यानां कैद करून नगरास पाठविलें (३१ डिसेंबर १७९७).
लग्नांत खर्च झाल्यानें व फौजेचा पगार तुंबल्यामुळें आणि कबूल केलेलें काम (नानास कैद) पार पाडल्यामुळें शिंद्यानें पेशव्याजवळ दोन कोट रकमेची मागणी केली. खजिन्यांत इतका पैका नव्हता; व तो कसा वसूल करावा ही नानाची कर्तबगारीहि पेशव्यांत नव्हती. तेव्हां त्यानें सर्जेरावाकडून पुण्याच्या लोकांपासून परभारें पैका वसूल करण्यास शिंद्यास परवानगी दिली. या सर्जेरावानें अत्यंत छळ करून पुणें धुवून काढलें. त्यानें खुद्द शनवारवाडयांतहि धुमाकूळ घातला. हा अति दुष्‍ट मनुष्‍य होता. (ज्ञा. को. वि. १३ घाटगे-सर्जेराव घाटगे-पहा.).
या जुलुमामुळें दौलतरावास कैद करण्याचें पेशव्यानें ठरविलें. परंतु आयत्यावेळीं त्याचा धीर झाला नाहीं. मात्र या दोघांत वांकडें येऊन परक्या राजांकडे दोघांनींहि मदत मागितली होती. शेवटीं पेशव्यास शह देण्यास शिंद्यानें नानास सोडलें.
मध्यंतरीं महादजीच्या स्त्रियांचा व दौलतरावाचा बेबनाव होऊन त्या बायांनीं ५।६ वर्षें फौजेच्या बळावर स्वराज्यांत धुमाकूळ घालून व कोल्हापुरकरांची मदत घेऊन लुटालूट केली. शेवटीं बाळोबानें बायांचा व दौलतरावाचा समेट करून दिला. इंग्रजांनींहि कारस्थानें करून बायांनां चिथावलें. कारण शिंदा हा मराठी राज्यांत फौजबंद सरदार होता व तोच त्यांच्या इच्छेच्या आड येण्यासारखा होता. म्हणून नेहमीं त्याची शक्ति कशी कमी होईल इकडेच त्यांचें लक्ष्य असे व त्यासाठीं ते मुद्दाम भानगडीहि उत्पन्न करीत.
नाना वारल्यावर (१८००) त्यांच्या संपत्तीवर शिंदे व पेशवे दोघांनींहि हात मारला. पुढें पेशव्यांकडून ४७ लाखांच्या वराता उत्तरेकडील सरदारांवर घेऊन एकदांचा शिंदा तिकडे वळला. वाटेंत त्याचा यशवंतराव होळकरानें पराभव केला (१८०१). यावेळेपासून दौलतरावाचें लक्ष्य युद्धशास्त्राकडे जास्त लागलें. तरी पण तो उतावळा असल्यानें उत्तम सेनापति बनला नाहीं, म्हणून अखेर त्याचा इंग्रजांनीं पराभव केला. यावेळीं शिंदे-होळकरांनीं परस्परांच्या राजधान्या जाळल्या; होळकरानें तर पुणेंहि जाळलें. त्यावेळीं रावबाजी पळून इंग्रजाकडे गेला आणि वसईस त्यानें मराठी राज्याच्या बेदाव्याचा तह लिहून दिला (१८०३).
या तहामुळें सर्व मराठयांचे डोळे उघडले. दौलतरावानें होळकरास व भोंसल्यास मिळवून इंग्रजांस हांकलून लावण्याचा प्रयत्‍न चालविला. परंतु एकमेकांचीं मनें शुद्ध नसल्यानें व इंग्रजांची युद्धसामुग्री उत्तम दर्जाची असल्यानें मराठयांचा सर्वत्र पराभव होत गेला. अलीगड, दिल्ली, आसई, आग्रा, लासवाडी व अडगांव येथील लढायांत शिंदा नामोहरम झाला (१८०३). त्याच्या सैन्यावरील अधिकारी इंग्रज व फ्रेंच होते; त्यांनीं आयत्या वेळीं फितुरी केल्यानें अर्थातच दौलतरावाचा नाश झाला. सुर्जी-अंजनगांवचा नामुष्‍कीचा तह होऊन त्यांत त्‍याचा अर्ध्यापेक्षां जास्त मुलुख इंग्रजांनां मिळाला.
इतक्यांत होळकरानें इंग्रजांचा पराभव केल्यानें दौलतराव त्यास जाऊन मिळाला (१८०४); परंतु पुन्हां आपसांतलें जुनें वैर निघून त्यानें होळकरास सोडलें. त्यावेळीं कार्नवालीसनें नवीन तह करून ग्वालेर किल्ला दौलतरावास देऊन त्याला व त्याच्या कुटुंबाला जहागिरी वगैरे दिल्या (१८०५). पुढें बारा वर्षें दौलतरावानें गडबड केली नाहीं. नंतर पेंढार्‍यांनां मिळून पुन्हां इंग्रजांविरुद्ध काहूर उठविण्याची खटपट त्यानें केली, परंतु ती इंग्रजांच्या चातुर्यामुळें साधली नाहीं (१८१७). मात्र यावेळीं झालेल्या तहानें दौलतराव नाखुषीनें इंग्रजांचा मांडलिक बनला. रावबाजीच्या शेवटच्या कारस्थानांतहि दौलतरावानें भाग घेतला होता, पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं (१८१८); उलट त्याचा मुलुख व सत्ता जास्त संपुष्‍टांत आली.
पेशवाई गेल्यावर नऊ वर्षें दौलतराव जिवंत होता. त्या कालांत त्यानें गडबड केली नाहीं. हा त्याच्या सारखा मुत्सद्दी व सेनापति नसल्यानें महादजीचे बेत याच्या हातून सिद्धिस गेले नाहींत. दौलतराव २१ मार्च १८२७ रोजीं मरण पावला. त्यावेळीं त्याचें राज्य दीड कोटीचें होतें. त्याची बायको बायजाबाई; त्याला पुत्र नसल्यानें दत्तक घेऊन बाईनें बरेंच दिवस राज्य चालविलें. [मॅलेसन - नेटिव्ह स्टेटस्; गोडबोले-एतद्देशीय संस्थानें; खरे-भाग ९।१०।११।१२; पेशव्यांची बखर; पेशवाईची अखेर.]

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११९
दौलतराव शिंदे:-
भाग
शिंदे घराण्यांतील एक संस्थानिक. महादजी शिंद्याचा सावत्र भाऊ तुकोजी म्हणून होता, तो पानिपतांत ठार झाला; त्याचा पुत्र आनंदराव, त्याचा दौलतराव. याच्या आईचें नांव मैनाबाई. महादजीस मुलगा न झाल्यानें त्यानें याला दत्तक घेण्याचें ठरविलें; परंतु तो एकाएकीं वारल्यामुळें (१७९४) दत्तविधान झालें नाहीं व त्यामुळें दौलतरावास सरदारीची वस्त्रें पेशव्यांकडून मिळालीं तेव्हां महादजीची बायको लक्ष्मीबाई हिनें हरकत घेतली होती; यावेळीं दौलतराव १४ वर्षांचा होता.
या सुमारास अनेक भानगडीचीं राजकारणें पेशवाईंत उत्पन्न झालीं. दौलतरावास अनुभव व पोक्तविचार नसल्यानें मराठी राज्यांत याच्या वागण्यानें अनेक घोटाळे उत्पन्न झाले. खडर्याच्या लढाईंत दौलतराव हजर होता (१७९५). तिकडून परत आल्यावर तो पुण्याहून उत्तरेकडे निघाला. इतक्यांत सवाईरावसाहेबानीं प्राणत्याग केला. तेव्हां अडचणीचा प्रसंग जाणून नानानें त्याला ताबडतोब परत बोलाविलें; उद्देश हा कीं त्याच्यासारख्या फौजबंद सरदारास आपल्या बाजूस ओढून यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक देऊन राज्य चालवावें. पण या मसलतीस दौलतरावाचा दिवाण बाळोबातात्या प्रतिकूल होता. रावबाजीनें बाळोबास प्रथम फोडून त्याच्या करवीं दौलतरावासहि फोडलें आणि आपल्यास गादीवर बसविल्यास त्याला ४ लाखांचा मुलुख व पुण्यास असेपर्यंतचा सैन्यखर्च देण्याचें कबूल केलें. दौलतराव यावेळीं लहान, बिनअनुभवी व पैशाचा लोभी होता. या लोभीपणानें त्यानें रावबाजीच्या कारकीर्दींत पुष्‍कळ वेळां वचनें मोडून उलटसुलट बाजू घेतल्या होत्या. तसेंच नानानां कैदेंत टाकण्यासहि त्यानें कमी केलें नाहीं आणि होळकराशीं भांडून इंग्रजांस बळावूं दिलें. पुढें त्याला इंग्रजांचा कावा कळला व त्यानें त्यांच्याविरुद्ध चळवळहि केली; परंतु ती फार उशीरा केली गेली.
दौलतराव रावबाजीस गादीवर बसविणार हें कळतांच नानानेंच बाजीरावास पुण्यास आणलें. इतक्यांत दौलतराव पुण्यास आला व बाजीरावानें त्याला नानाला कैद करण्यास सांगितलें. हें समजतांच नाना महाडाकडे निघून गेला. वास्तविक बाळोबाच या कारस्थानाचा कर्ता होता. त्याच्या मनांत नानाचा कारभार आपल्या हातीं घ्यावयाचा होता; बाळोबा शेणवी असल्यानें ब्राह्मणांचा द्वेष करी.
बाजीराव गादीवर आल्यावर तो पुन्हां नानाकडे संधान बांधूं लागला व कबूल केलेला पैसा देईना म्हणून बाळोबानें परशुरामभाऊस नानांच्या विरुद्ध फोडून रावबाजीस कैद करून चिमाजीआप्पास यशोदाबाईस दत्तक देऊन राज्याचा कारभार आपल्या हातीं घेतला (मे १७९६).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११८
विजयाराजे शिंदे ते ज्योतिरादित्य शिंदे :
या नंतर ग्वाल्हेरचे शिंदे राजघराणे
नाममात्र राजेशाहीचे राहिले पण स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या राजकरणात
सक्रिय राहिले. विजयाराजे शिंदे भाजपकडून सक्रिय राहिल्या तर त्यांचे पुत्र
माधवराव शिंदे हे काँग्रेसकडून सक्रिय राहिले. माधवरावांच्या अकाली
मृत्युनंतर त्यांचे पुत्र आताचे काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे
यांच्या हाती शिंदे घराण्याची सूत्रे आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री
वसुंधराराजे ह्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या आणि माधवरावांच्या कनिष्ट
भगिनी अन ज्योतिरादित्य यांच्या आत्या होत. आजच्या घडीलाही शिंदे घराणे
भाजपा आणि काँग्रेस यांच्यात दुभंगलेले पहायला मिळते. काल २५ जानेवारी
२००१ला राजमाता विजयाराजे शिंदे यांचे वार्धक्याने देहावसान झाले होते,
स्वातंत्र्यपूर्व काळातला शिंदे घराण्याचा अखेरचा दुवा निखळला होता.
आपल्या मराठी मातीचा अंश घेऊन उत्तर भारतात पुढे गेलेले, मराठ्यांचे नाव
इतिहासात अजरामर करणारे हे घराणे राजकारणाच्या दलदलीमुळे आज दुभंगलेल्या
अवस्थेत आहे ही क्लेशदायक गोष्ट आहे. कारण शिवछत्रपतींचा वारसा पुढे
चालविणारे महाराष्ट्रातील भोसले घराणे (सातारा - कोल्हापूर) देखील
राजकारणामुळे एकसंध दिसून येत नाही. उर्वरित कुठलेही मातब्बर सरदार घराणे
आज वैभवशाली अवस्थेत दिसून येत नाही. तत्कालीन अनेक मराठा सरदार घराणी आजही
अस्तित्वात आहेत पण त्यांची अवस्था बडा घर अन पोकळ वासा अशी झाली आहे, तर
काहींची नाके गेली पण भोके शिल्लक राहिली अशी गत झाली आहे...त्यातल्या
त्यात ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी आजही आपले वैभव टिकवून ठेवले आहे हीच काय
ती समाधानाची बाब !
- समीर गायकवाड.
संदर्भ : शिंदे घराण्याचा इतिहास - सरंजामे,
मराठी साम्राज्याची छोटी बखर - मोडक जनार्दन बाळाजी,
नाना फडणवीस - मॅकडोनल्ड,
फॉल ऑफ द मुघल एम्पायर - एच जे किन.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११७
जॉर्ज जिवाजीराव शिंदे : १९२५
मध्ये माधवरावांचे एकुलते एक पुत्र जॉर्ज जिवाजीराव (जियाजीराव असाही
उल्लेख आहे ) शिंदे ग्वाल्हेरचे राजे झाले ते भारत स्वतंत्र होईपर्यंत
ग्वाल्हेरचे अखेरचे राजे म्हणून कार्यरत राहिले. देश स्वतंत्र झाल्यानंतर
१५ जून १९४८ मध्ये 'मध्य भारत' हे राज्य अस्तित्वात आले. या राज्यासाठी
राजप्रमुख हे पद निर्माण केले गेले होते. या मध्य भारत राज्यात ग्वाल्हेर
संस्थान विलीन करण्यात आले होते. २८ मे १९४८ रोजी जॉर्ज जिवाजीराव शिंदे
राजप्रमुख या पदी नियुक्त झाले ते ३१ ऑक्टोबर १९५६ पर्यंत मध्य प्रदेशची
निर्मिती होईपर्यंत त्या पदावर राहिले. विजयाराजे शिंदे ह्या जॉर्ज
जिवाजीरावांच्या पत्नी होत्या

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११६
माधवराव शिंदे १ :
यांनतरच्या काळात जयाजीराव शिंद्यांनी आपल्या राज्याच्या विकासाकडे लक्ष
दिले अन इंग्रजासोबत नरमाईची भूमिका ठेवली. १८८६ मध्ये जयाजीराव शिंदे
निवर्तले. त्यांच्यानंतर माधवराव शिंदे वयाच्या १० व्या वर्षी गादीवर
बसले, त्यांचे वय कमी असल्याचे कारण दाखवत इंग्रजांनी त्यांच्यावर नियंत्रण
ठेवण्यासाठी एक अंतर्गत मंत्रीपरिषद नियुक्त केली. पण आपल्या प्रजेचा
विकास करण्यासाठी माधवराव शिंद्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. वयाच्या
२१व्या वर्षी त्यांना उर्वरित अधिकार देण्यात आले होते. १९२५ पर्यंत ते
गादीवर होते. इंग्रजांनी त्यांचा उल्लेख प्रगतीशील राजा असे केले होते

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११५


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११५
बायजाबाई आणि जयाजीराव शिंदे :
बायजाबाईने जमेल तितकी टक्कर दिली पण तिने दत्तक घेतलेल्या जनकोजीने (दुसरा) पार गुडघे टेकले. १८३३ ते १८४३ अशी दहा वर्षे त्याने कारभार केला, १८४३ मध्ये त्याचा मृत्यू झाला अन दुर्दैवाने त्यालाही मुलबाळ नव्हते त्यामुळे त्यांची पत्नी ताराबाई शिंदे हिने हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा भगीरथराव याला दत्तक घेतले. पुढे हाच जयाजीराव शिंदे या नावाने
ओळखला गेला. बायजाबाई या काळातही सक्रीय होत्या अन त्यांचे भाऊ त्यात त्यांना मदत करत होते. जयाजी शिंदे जेंव्हा कारभार पाहू लागले तेंव्हा त्यांना त्यांचे कारभारी असलेले दादा खासगीवाले यांनी बायजाबाईंच्या भावाने जशी अप्रत्यक्ष रित्या सत्ता स्वतःच्या हाती ठेवली होती तसेच काम केले. दिनकर राव शिंदे यांनी काही काळ सूत्रे आपल्या हाती घेतली तेंव्हाच्या कळातच १८५७चे बंड देशात घडले होते. हे जयाजीराव शिंदे गायकीच्या ग्वाल्हेर घराण्यातले एक उत्तम गायकदेखील होते. चंदेर प्रदेश ( आताचा एमपी मधील अशोकनगर जिल्हा ) नंतर ग्वाल्हेरमध्ये सामील करण्यात आला. १७ जून १८५८ रोजी ह्यूज रॉज याने ग्वाल्हेर खरे तर खालसा केले असते पण आणखी बंडाळ्या होऊ नये म्हणून त्यांनी जयाजीरावाला पुन्हा सिंहासनावर बसवले पण सर्वाधिकार कमी करून!

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११४
दौलतराव शिंदे :
दौलतराव हे राणोजी शिंद्यांच्या दुसरया पत्नीचे पुत्र तुकोजी यांचे नातू असल्याने सुरुवातीस पेशव्यांनी त्यांना मान्यता दिली नाही. अखेर ३ मार्च १७९४ रोजी त्यांना नवा राजा म्हणून मान्यता मिळाली. १८२७ पर्यंत दौलतराव शिंदे सत्तेत होते. दौलतरावांनी लॉर्ड कोर्नवॉलिसशी १८१७ मध्ये तह करून पायावर धोंडा पाडून घेतला. तब्बल ३१ वर्षे दुबळा कारभार केलेल्या दौलतरावांचे १८२७ मध्ये निधन झाले, त्यांना मुलबाळ झालेले नव्हते अन त्यांनी कुणाला वारस म्हणून दत्तक घेतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पश्चात १८२७ ते १८३३ असा कार्यभार सांभाळला. बायजाबाईने दत्तक घेतलेल्या शिंदे वंशावळीतील मुकुटराव या मुलाने नंतर जनकोजी द्वितीय म्हणून कारभार पहिला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११३


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११३
महादजी शिंदे : भाग
महादजी शिंदे : भाग २ महादजींनी पानपताचा कलंक धुऊन काढण्यासाठी अवघे जीवन वेचले..ह्या अगोदर सुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानात कित्येकवेळा स्वारी केली होती पण कोणीही महादाजीन्सारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही..महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून जी दूरदृष्टी दाखवली त्याला तुलना नाही… त्यांच्या ह्या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलनाच केली…कारण या महाकाय युद्धातील पराभवानंतर पेशवाईतील मुत्सद्दीच खचून गेले होते. याचे एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते- १७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलात पुण्यास आली तिचा तळ अहमदनगर इथे पडला होता..त्यांची पुणे दरबाराने उत्तम बडदास्त ठेवली.. तिची व्यवस्था अजून चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल ह्यांच्या नावे सनदा काढल्या: - ”गणेश विठ्ठल यांचे नावे सनद कि गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उन्ते व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले आहेत.. त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे !"
महादजींनी पानपताचा कलंक धुऊन काढण्यासाठी अवघे जीवन वेचले..ह्या अगोदर सुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानात कित्येकवेळा स्वारी केली होती पण कोणीही महादाजीन्सारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही..महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून जी दूरदृष्टी दाखवली त्याला तुलना नाही… त्यांच्या ह्या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलनाच केली…कारण या महाकाय युद्धातील पराभवानंतर पेशवाईतील मुत्सद्दीच खचून गेले होते. याचे एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते- १७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलात पुण्यास आली तिचा तळ अहमदनगर इथे पडला होता..त्यांची पुणे दरबाराने उत्तम बडदास्त ठेवली.. तिची व्यवस्था अजून चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल ह्यांच्या नावे सनदा काढल्या: - ”गणेश विठ्ठल यांचे नावे सनद कि गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उन्ते व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले आहेत.. त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे !"
महादजी शिंदे पुण्याजवळील वानवडी येथे १२ फेब्रुवारी १७९४ला वयाच्या ६७व्या वर्षी निधन पावले. महादजींना मुलबाळ नसल्याने त्यांनी आपले सख्खे भाऊ तुकोजी शिंदे यांचे नातू दौलतराव शिंदे यांना दत्तक घेतले आणि आपला वारसदार नियुक्त केले. याच काळात यशवंतराव होळकरांनी आपल्या तलवारीचे पाणी भारतभर तेजाने परजले होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११२
महादजी शिंदे : भाग
पहिल्या इंग्रज-मराठे युध्दांतील महादजींची कामगिरी मुत्सद्देगिरीची होती. सालबाईच्या तहानंतर महादजीनें ज्या रजपूत राजांनीं त्याचा मुलूख बळकविला होता त्यांचा पराभव करून आपला प्रांत परत घेतला. आतांपर्यंत इंग्रजांशीं झालेल्या लढायांत त्यांच्याकडील कवायती पलटणींचा उपयोग पाहून, महादजींनी फ्रेंचांनां चाकरीस ठेऊन तोफा ओतण्याचे व हत्त्यारें तयार करण्याचे कारखाने काढून कवायती पलटणें तयार केलीं व त्यांच्या बळावर गेल्या १० वर्षांत दिल्‍लीच्या बादशाहीवरील जें मराठयांचें वर्चस्व नाहीसें झालें होतें तें पुन्हां प्रस्थापित केलें आणि यापुढें १०।१२ वर्षे सर्व उत्तरहिंदुस्थानचीं सूत्रें आपल्या हातीं खेळविलीं. यावेळी दिल्‍लीच्या बादशाहीला हाताखालीं घालण्याचा उपक्रम शीख, इंग्रज व मराठे हे तिघे करीत होते; परंतु त्यांत अनेक कारणांनीं मराठेच पुढें आले. याच वेळीं महादजींनी पातशहाकडून पेशव्यांस वकील-इ-मुतलकचें पद व स्वतःस त्या पदाची नायबगिरी मिळवून, साऱ्या बादशाहींत गोवधाची मनाई करविली. बादशहास दरमहा ६५ हजारांची नेमणूक करून देऊन महादजींनी सारी पादशाही आपल्या हातांत घेतली (१७८५). यानंतर कांही काळ मोंगली पादशाही लुप्त होऊन साऱ्या हिंदुस्थानभर हिंदुपदपादशाही सुरू झाली.
उत्तरहिंदुस्थानांत महादजींनी कडक अम्मल गाजविला, त्यामुळें बादशाहींतील मुसलमान सरदार व रजपूत राजे यांनीं त्यांच्याविरुद्ध बंडाळी माजविली (१७८६-८७). लालसोटच्या लढाईंत तर बादशहाची सर्व फौजच रजपूत राजांनां मिळाली, त्यामुळें महादजींना हार खावी लागली (१७८७); गुलाम कादरनें दिल्‍ली, अलीगड वगैरे शहरें ताब्यांत घेतल्यानें महादजींना चंबळेअलीकडे यावें लागलें. याप्रमाणें त्यांच्या उत्तरेकडील वर्चस्वास धक्का बसला, परंतु महादजींनी धीर न सोडतां पुन्हां गेलेले प्रांत परत मिळविण्याचा प्रयत्न चालविला; यावेळीं मात्र महादजींनी आपला ताठा व मत्सर सोडून नाना फडणविसाकडे मनांतील किल्मिष काढून टाकून मदतीची मागणी केली. दिल्‍ली हातची जाते हें पाहून नानानींहि अल्‍लीबाहद्दरास त्याच्या मदतीस धाडलें (१७८८). अल्‍लीबहाद्दर व महादजी यांनीं शीख आणि जाट यांनां मदतीस घेऊन गुलाम कादर वगैरे मुसलमान मंडळी आणि उदेपूर, जोधपूर, जयपूर येथील राजे वगैरे रजपूतमंडळ यांचा पराभव करून पुन्हां रजपुताना आणि दिल्‍ली हस्तगत केली (१७८९-१७९०). उदेपूरचा राणा तर महादजींना सामोरा आला होता. हा मान त्या घराण्यानें खुद्द दिल्‍लीच्या बादशहासहि कधींच दिला नव्हता. याच सुमारास गुलाम कादरानें शहाअलमचे डोळे काढून व त्याच्या जनान्याची अब्रू घेऊन दिल्‍लींत प्रळय मांडला होंता; त्यावर महादजींनी गुलामास पकडून त्याला देहांतशासन केलें व पुन्हां शहाअलमास तक्तावर बसवून सर्व पातशाही कारभार आपल्या हातीं घेतला (१७८९).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १११

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १११
महादजी शिंदे : भाग
राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ट पुत्र होते. १८ जानेवारी १७६८ रोजी महादजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते १७९४ पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होतीआणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले..नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेही यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता. रियासतकार सरदेसाईंनी मराठ्यांच्या इतिहासात महादजींची तुलना नेपोलियनशी केली आहे यावरून महादजींच्या शौर्याची कल्पना यावी.
महादजी शिंदे हेही पानिपत मोहिमेच्या वेळी भाऊसाहेबांबरोबर दक्षिणेंतून निघाले होते. पानपतांत युद्धाच्या शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां हेही परत फिरले. परतीच्या वाटेंवर त्यांच्यावर पठाणांच्या एका शस्त्रसज्ज टोळीने हल्ला चढवला, त्यातीलच एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून त्यांचा पाय कायमचा अधू केला होता. राणाखान नांवाच्या एका मराठ्यांच्याच लष्करांतील माणसानें त्याला पुढे निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें. राघोबादादांच्या घालमेलीच्या कारकीर्दीत महादजी हे पटवर्धन, प्रतिनिधीप्रमाणें निजामाकडे जाऊन मिळण्याच्या बेतांत होता. बारभाईच्या कारस्थानांत कोणास जाऊन मिळावें याबद्दल प्रथम महादजीचा निश्र्चय झाला नव्हता; परंतु नाना व बापू यांनीं शेवटीं त्याना मुलूख वगैरे देऊन आपल्या बाजूस घेऊन त्यांच्याकडूनच राघोबाचा बंदोबस्त केला. मात्र या वेळेपासून महादजींच्या मनांत नाना फडणविसाबद्दल असूया उत्पन्न झाली. या सुमारासच भाऊसाहेबांच्या तोतयाच्या प्रकरणांत महादजींनी कारभाऱ्यांस मदत केली व कोल्हापुरकरांचा पराभव केला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११०
जनकोजी शिंदे :
पानिपतच्या मोहिमेत पेशव्यांबरोबर असलेले जनकोजी शिंदे दत्ताजीच्या वीरमरणानंतर माघारी फिरले नाहीत, उलट क्रूरकर्म्या नजीबाविरुद्ध त्यांच्या मनात संतापाचा ज्वालामुखी धगधगत होता. अब्दालीबरोबर कुंजपुरा इथे (ऑगस्ट १७६०) झालेल्या चकमकीत नजिबाचा गुरु कुतुबशहा याचे मुंडके जमदाडाने कापून काढून आपला सुडाग्नी काहीअंशी शांत केला होता. याच कुतुबशहाने प्राण कंठाशी आलेल्या दत्ताजीवर अखेरचा वार केला होता.
पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, . परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी राजगादीवर बसलेल्या जनकोजी शिंद्यांना पानिपतमध्ये (१४ जानेवारी १७६१ ) वयाच्या १६ व्या वर्षी पकडण्यात आले. पानिपतावर जेंव्हा विश्वासराव पडल्याची वार्ता पसरली, सर्व सैन्य घाबरून सैरावैरा पळू लागले तेंव्हा जनकोजी अन त्याचे काका तुकाजी ( महादजी शिद्यांचे सख्खे मोठे तर जयाप्पा - दत्ताजीचे सावत्र लहान भाऊ ) यांनी सदाशिवराव भाऊंच्या गोटाकडे त्यांना बळ देण्यासाठी कूच केले, यावेळी बर्खुरदार खानाने तोफगोळा लागून जायबंदी झालेल्या जनकोजी शिंद्यांना पकडले. काशीराजाने नन्तर त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करून पाहिले, काही आर्थिक आमिषे दाखवली. पण याचा सुगावा नजीबास लागला. नजिबाने आपल्याला मारण्याआधी आपण जनकोजीस मारणे योग्य असा विचार करून बर्खुरदार खानाने जनकोजीस हाल हाल करून ठार मारले. याच दरम्यान ज्योतिबाराव शिंद्यांचे (दत्ताजींचे अखेरचे सख्खे बंधू ) कुंभेर येथे निधन झाले.
जनकोजीच्या नंतर अनेकांनी वारसा हक्काचा दावा केल्याने पेशव्यांनी ३ वर्षे शिंदेशाहीस नव्या राजाची राजमान्यता दिली नाही. २५ नोव्हेबर १७६३ ला कदराजी शिंद्यांना ( तुकाजी शिंद्यांचे पुत्र ) पेशव्यांनी शिंदेशाहीची सूत्रे दिली, पण त्यांनी ती नाकारली अन सरदार म्हणून राहणे पसंत केले. १० जुलै १७६४ ला मानाजीराव शिंद्यांची अखेर तख्तपोशी झाली अन शिंदेशाहीला नवा राजा मिळाला,ते जानेवारी १७६८ पर्यंत सिंहासनावर आरूढ होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०९
जयाप्पा शिंदे :
राणोजी शिंद्यांच्या मृत्यूनंतर जयप्पानी ग्वाल्हेरची गादी सांभाळली. २५ जुलै १७५५ ला जोधपुरच्या महाराजा विजयसिंह राठौर यांच्या वारसदारांशी (बिजसिंह राठौर ) लढताना वयाच्या ३५ व्या वर्षी जयाप्पांना नागौर (राजस्थान) येथे घातपात करून मारण्यात आले. जयाप्पा शिंद्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जनकोजी शिंदे यांनी शिंदेशाहीची सूत्रे आपल्या हाती
घेतली. जयाप्पा शिंदेंनी १७४५ ते १७५५ अशी दहा वर्षे आपली कारकीर्द केली. दत्ताजी शिंदे हे राणोजी शिंद्यांचे द्वितीय पुत्र. जयाप्पाच्या मृत्यूनंतर शिंदेशाहीची सूत्रे जनकोजीस मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. ...या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांतहि मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर अप्तामीनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करुन त्याची डोलाची अंबारी खालीं पाडिली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होते. जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या मोहिमेंत खून झाला, तींतहि दत्ताजी होते ; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेऊन बिजेसिंगाचा मोड केला. पुढें १७५६ मध्ये दत्ताजीनी सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली. नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले. पुढील सालीं पेशव्यांनी अबदालीवर स्वारी करून गेले असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानी दत्ताजीसच धाडण्याबद्दल लेखी दरख्वास्त केली. या दरम्यान १७५८ मध्ये दत्ताजीचा विवाह भागीरथीबाईशी झाला. लग्न उरकून हळद ओल्या अंगाने दत्ताजी उज्जैनला आले. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबानें सांगितलेल्य नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावांनी "नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोतरे बडविण्यास लावितील" असे उद्‍गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें १० जानेवारी १७६० च्या दिवशी दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला. बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणत मृत्यूस कवटाळणारया दत्ताजीचे नाव मराठ्यांच्या इतिहासात अजरामर आहे. जनकोजी शिंद्यांचे वय या वेळी १५ वर्षांचे होते, त्यांनी दत्ताजी शिंद्यांना परत फिरण्याचा मुत्सद्दी सल्ला दिला होता पण भावनेच्या आहारी जाऊन प्रतापराव गुजरांनी जी चूक शिवछत्रपतीच्या काळात केली होती तशीच चूक इथे केली.