Total Pageviews

Friday 24 March 2023

श्रीमंत महाराजा महादजी शिंदे यांच्या बाबत जगप्रसिद्ध लेखकांनी केलेले मूल्यमापन,


श्रीमंत महाराजा महादजी शिंदे यांच्या बाबत जगप्रसिद्ध लेखकांनी केलेले मूल्यमापन,
रुलर्स ऑफ इंडिया लेखक किनी महादजीं विषयी म्हणतो..
Amongst Asiatic public men no name to match Madhva Sindhia- पान क्रमांक १९१
अर्थ:-तात्काळ भारतात कोणी अशा सेनानीच नाव नाही जो की महादजी शिंदेंची बरोबरी करू शकेल.
तत्कालीन(महादजींच्या समकालीन) जनरल सर जॉन मालकम याने आपल्या Memoirs Of Central India या पुस्तकात केलेला उल्लेख
"Steel under Velvet Gloves"
अर्थ:- मखमली कपडयात लोखंड
"This able chief was the principal oppose of the english...""..This able chief was, throughout his life,consistent in the part he acted" "His actions were suited to the Constitution of the society he was born in which had a just pride in his talent & energy and esteemed him of the ablest as he was the most successful of mahratta leaders ever."He cherished the intention of giving to his vast possession a more compact & permanent From
अर्थ:-"हा सक्षम प्रमुख इंग्रजांचा मुख्य विरोधी होता ..." "... महादजी शिंदे सरकार हे सक्षम प्रमुख होते, संपूर्ण आयुष्यभर, ते ज्या राज्यकारभाराच्या कार्यात त्यांचे कार्य त्यानुसार सुसंगत व समर्थपणे केले" "त्यांचे कार्य त्यांनी जन्म घेतलेल्या मराठा समाजाच्या संविधानासाठी अनुकूल होते. त्याच्या प्रतिभा आणि उर्जेमध्ये अभिमान होता आणि त्यामुळेच दिल्लीचा तख्त राखणारे एकमेव मराठा शासक म्हणून यशस्वी झाले होते. "त्यांच्या विशाल साम्राज्यास अधिक ठोस आणि कायमस्वरूपी बळ देणे हा त्यांचा उद्देश होता.
कर्नल मैलीसन आपल्या The Final french struggle in india पुस्तकात लिहतात
"The great Dream of Madhav was to unite all the native Powers of india in one great Confederacy against the English.In This Respect he was the most far sighted statesman that india has ever produced.-it was a grand idea Capable of relationship by mahadavji,but by him alone,and but for his death,would have been realised"
अर्थ:-महादजी शिंदेच स्वप्न होत परकीय सत्ता ब्रिटीशांच्या विरोधात स्वदेशी सत्तांना एकत्र करून इंग्रजांशी लढा देण्याचा,ही महत्वकांशा फक्त महादजींचं सिद्धीस नेऊ शकले असते जर त्यांचं निधन झाले नसते तर.
प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार लिहतात..
"From such an intimate study the man emerges even greater than we supposed him before. With the habitual meekness of spirit, the respect for venerable persons which this strong and busy man of action displayed even at the height of his earthly glory was to him but a crown of thorns .. He towers over Maratha history in solitary grandeur, a ruler of India without an ally, without a party, without even an able and reliable civil and diplomatic service or strong and honest advisors. If... Nana Fadnis had possessed only half of Machiavelli's patriotism and honesty, or even a wise perception of self-interest and had backed Madhavaji at the out set.... then the whole course of the later Maratha history might have become different.'
अर्थ- सखोल अभ्यासानंतर आपण यापूर्वी समजत होतो त्यापेक्षा ती व्यक्ती(महादजी) अधिक महान असल्याचे कळते. नम्रता किंवा लिनता, हिंमत किंवा धैर्य इत्यादी गुण त्यांच्या ठायी असले तरी जेव्हा तो ऐहिक द्रष्ट्या वैभवाच्या शिखरावर होता तेव्हा त्याच्या डोक्यावर काटेरी मुकूट होता. मराठा इतिहासातील श्रेष्ठ स्थान प्राप्त केले तरी ते वैभव कोणही दोस्त राज्य,श्रेष्ठ विश्वासू विद्वान सल्लागार नसताना एकट्याने मिळविले होते. नाना फडणविसाकडे मँकियावलीच्या निम्मी देशभक्ती आणि प्रामाणिकपणा असता किंवा स्वहिताची समज असती आणि त्याने प्रारंभापासून माधवजींना पाठिंबा दिला असता तर नंतरचा मराठा इतिहास वेगळा घडला असता.
विश्वविख्यात लेखक हर्बट ईस्टविक कॉम्पटन आपल्या "ए पर्टीक्युलर अकाउंट ऑफ दी युरोपियन मिलिटरी ऍडवेनचर्स ऑफ हिंदुस्तान
"As general mahadjee take his stand amongst the greatest india has produced in the times of crisis and sudden danger his presence of mind was incomparable"
अर्थ:-महादजी शिंदे सरकार यांनी भारतावरील त्या काळातील परिस्थिती मध्ये समोर आलेल्या राजकीय परिस्थितीला आणि राज्यावर आलेल्या संकटांना आपल्या राजकीय कौशल्य, दूरदृष्टी कोन, समाजाच्या हित, चाणाक्ष,धोरणी, मातब्बर लढवय्या जे फक्त सिंहासनावर बसून राज्य करणारा राजा नाही तर लढाईत स्वतःह पाय पंगू होण्या पर्यंत च शौर्य दाखवणारे लढवय्या शासक, ज्यांची संकटाच्या वेळी अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत दाखवलेली त्यांच्या मनाची ताकद अतुलनीय होती "
विश्वविख्यात लेखक रोपर लेथब्रिज आपल्या द गोल्डन बुक ऑफ इंडिया या पुस्तकात लिहतो.
"Mahadji Sindhia who was one of the greatest soldiers and cleverest statesman ever produced by india He greatly distinguished himself at the battle of panipat in 1761; and though by that disaster he disciplined and strongly organised his army and in this way,through nominally still a servant of the Maratha Empire he became in1764 really the ruler of hindustan
अर्थ:-महादजी सिंधिया जे भारतातील तयार सर्वात महान सैनिक आणि हुशार राजकारणी होते, त्यांनी 1761 मध्ये पानिपतच्या लढाईत स्वत: ला प्रतिष्ठित केले. आणि त्या लढाईत हानी जरी झाली त्याबरोबर त्यांनी त्यांच्या सैन्याला योग्य शिस्त लावली आणि त्यांच्या सैन्याला जोरदारपणे संघटित केले आणि अशाप्रकारे, मराठा साम्राज्याच्या सरदारा पासून सुरुवात होऊन ते खरोखरच हिंदुस्तानचा जनमान्य शासक बनले ज्यांना दिल्लीचे हिंदुस्थान वर शासन असलेल्या बहादुरशहा जफर यांच्या कडून सरकार ही पदवी बहाल केली.
एवढेच काय स्वतः इंग्रज सुद्धा त्यांचा गौरव द ग्रेट मराठा म्हणून करत

 

Saturday 4 March 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३०
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग १

मराठे हिंदुस्थानचे राज्यकर्ते म्हणून वागत होते. . हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हायचे किंवा राहावयाचे याबद्दल वाद असो, पण राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच राज्यकर्ते राहिले पाहिजेत, या तत्त्वासाठी मराठे पानिपतात लढले.

मराठ्यांनी उत्तरेकडील राजकारण हाती घेतल्यामुळे अफगाणिस्तान-इराणकडून येणाऱ्या धार्मिक, मूलतत्त्ववादी सत्तांच्या संकटातून हिंदुस्थानचा बचाव झाला. या संकटाबरोबरच दुसऱ्याही एका परकीय सत्तेचे सावट तेव्हा या देशावर पडत होते. कलकत्ता येथील इंग्रज दिवसेंदिवस प्रबळ होत होते. आपल्या फ्रेंचादी पाश्चात्त्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून त्यांनी हिंदुस्थानातील आपला पाया बळकट केला होता. बंगालमधील सिराजउद्दौला या मोगल सुभेदाराचा प्लासीच्या लढाईत पराभव करून इंग्रजांनी दिल्लीच्या मोगल बादशहाकडून बंगालची दिवाणी प्राप्त केली होती. या मोबदल्यात त्यांनीही दिल्लीच्या बादशहाच्या रक्षणाची हमी घेतली होती. हा बादशहा ज्याच्या ताब्यात त्याचा हिंदुस्थानवर अंमल, असे समीकरण होते; परंतु या बादशहाला ताब्यात घेण्यात मराठ्यांनी यश संपादन केले व इंग्रजांचा अंमल निदान अर्धे शतक तरी पुढे ढकलला गेला. याचेही श्रेय मराठ्यांनाच द्यायला हवे. थोडक्यात, दोन प्रबळ परकीय सत्तांपासून भारताचे रक्षण करणाऱ्या आणि नंतरही इंग्रजी सत्तेच्या अमलाखाली गेल्यावर भारताला परत स्वतंत्र करण्यात महाराष्ट्र आघाडीवरच होता, एवढे सांगितले म्हणजे पुरे.

पानिपतच्या गर्दीत जीव वाचवून सुखरूप परत आलेल्या मराठ्यांमध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणीस या दोन कर्तबगार पुरुषांचा समावेश होता. मराठी दौलतीचे नंतर जे काही बरेवाईट झाले त्याचे बरेचसे श्रेय या दोघांना द्यावे लागते. तेव्हा परत एकदा पानिपतच्या युद्धाकडे वळावे लागते

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२९
हा मराठा सरदार ठरवायचा दिल्लीचा बादशहा, पानीपतनंतर पुन्हा मिळवून दिली प्रतिष्ठा
भाग ४

1745 ते 1761 दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास 50 लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,1747, मारवाड 1747 व हिम्मत नगर 1747. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता. यातील महादजीची महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज 1746, फतेहाबाद 1746 बडी साद्री 16 जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने 1773 पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजराथ पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला.
महादजीने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून 41,000 रुपये देखिल वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार 18 जानेवारी 1779 रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२८

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२८
हा मराठा सरदार ठरवायचा दिल्लीचा बादशहा, पानीपतनंतर पुन्हा मिळवून दिली प्रतिष्ठा
भाग ३
युद्धातील शौर्याबरोबरच महादजी यांचा अभ्यासही गाढा होता. मराठी, हिंदी, संस्कृत आणि पर्शियन भाषांवर त्यांचे प्रभुत्त्व होते. त्यांना वाचनाची आणि लिखानाचीही प्रचंड आवड होती. त्यांच्या अनेक कविता माधवदासी या ग्रंथात आढळतात.
उत्तरेबरोबरच दक्षिणेच्या राजकारभारातही त्यांनी महत्त्वाची भूमिकाल बजावली. बारभाईच्या राजकारणात नाना फडणवीस यांच्यासह त्यांनी मह्त्त्वाची भूमिका असल्याचे दिसून येते.
माधवराव आणि सवाई माधवराव यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीचा कारभार स्वतःच्या कर्तबगारीवर आपल्या हाती घेतला. त्यानंतर बादशहाचे वजीरपद मिळवत उत्तरेत वर्चस्व प्रस्तापित केले.
लाखेरीच्या युद्धानंतर महादजी क्षीण झाले होते. पुण्याजवळच्या वानवडी येथे तापामुळे 12 फेब्रुवारी 1794 रोजी त्यांचे निधन झाले.
हा मराठा सरदार ठरवायचा दिल्लीचा बादशहा, पानीपतनंतर पुन्हा मिळवून दिली प्रतिष्ठा
1745 ते 1761 दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास 50 लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,1747, मारवाड 1747 व हिम्मत नगर 1747. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता. यातील महादजीची महत्त्वाच्या लढाया

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२७


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२७
हा मराठा सरदार ठरवायचा दिल्लीचा बादशहा, पानीपतनंतर पुन्हा मिळवून दिली प्रतिष्ठा
भाग २

महादजी यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे...
केवळ उत्तरेवर वर्चस्व मिळवून न थांबता महादजी यांनी उत्तरेत तळ ठोकला होता. त्यामुळेच उत्तरेतील मराठी सत्तेचा निर्माता म्हणूनही त्यांन ओळखले जाते. केवळ शूर आणि कर्तृत्त्ववान नव्हे तर तेवढाच मुत्सद्दी सरदार अशीही महादजी शिंदे यांची ओळख होती. त्यामुळेच बादशहा शहाआलम (दुसरा) याने महादजी यांना वकिल-ए-मुतालिक यासह अनेक मानाच्या पदव्या आणि मानाची वस्त्रे बहाल केली होती.
स्वकीय शत्रूबरोबरच परकीय म्हणजेच इंग्रजांबरोबरही त्यांनी योजनाबद्धरित्या लढा दिला होता. इंग्रजांबरोबरच्या युद्धांमध्ये नेहमीच महादजी वरचढ ठरल्याचे दिसून आले. त्यामुळेच महादजी यांनी इंग्रजांना सालबाईचा तह (1782) करण्यास भाग पाडले होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२६
हा मराठा सरदार ठरवायचा दिल्लीचा बादशहा, पानीपतनंतर पुन्हा मिळवून दिली प्रतिष्ठा
भाग १

पानीपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठी साम्राज्याला पुन्हा नव्याने उभारी मिळवून देण्याचे काम करणाऱ्या महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याचे महान सरदार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या करारी बाण्यामुळेच इंग्रजांनी त्यांना द ग्रेट मराठी म्हणून संबोधले होते. मराठी साम्राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या योद्ध्याचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...

पानीपत युद्धानंतर (1761) उत्तरेतील मराठी सत्तेला मोठा हादरा बसला. त्यावेळी अगदी मराठा सत्ता लयाला जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिंदे, होळकर, पवार असे नवे सरदार निर्माण झाले होते. उत्तरेत पुन्हा मराठ्यांची सत्ता स्थापन करण्याचे काम या सरदारांनी केले. या मराठासरदारांपैकी महादजी शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. दिल्लीचा बादशहा कोण असावा याबाबत महादजी निर्णय घेत असे म्हटले जाते. एवढे सामर्थ्य महादजी शिंदे यांच्यात होते.
महादजी सुभेदार राणोजी यांचा अनौरस पुत्र होता. वयाच्या दहाव्या वर्षापासून तो वडिलांबरोबर रणांगणा जात होता. दहाव्या वर्षी वरात येथील युद्धात तोसहभागी झाला होता. राणोजी शिंदे आणि त्यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर पेशवा दरबाराने महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची दखल घेऊन त्यांच्याकडे शिंदे दौलतीचा कारभार सोपवला होता.
शिंदे दौलतीचा कारभार ताब्यात मिळाल्यानंतर महादजी शिंदे यांनी 1769 ते 1792 या कालखंडातच उत्तर भारतात यशस्वी मोहिमांचे आयोजन करून महादजी शिंदे यांनी शिंद्यांचे स्वतंत्र असे अस्तित्त्व निर्माण केले. पानीपतच्या युद्धात गमावलेली मराठ्यांची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून देत महादजी शिंदे यांनी मोघल बादशहास आपल्या वर्चस्वाखाली आणले होते. त्यांच्या कालखंडात उत्तर भारतात पुन्हा
मराठ्यांच्या साम्राज्यास झळाळी मिळाली होती

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२५
अंताजी माणकेश्वर -
भाग ३

हिंगण्याचा बंदोबस्त राघोबानें केला, तसा अंताजी माणकेश्वराचा इ. स. १७५८ त केला. पुढें अंताजीस पकडून दक्षिणेंत पाठविलें कीं काय तें समजत नाहीं. इ. स. १७५९ च्या अखेरीस तो पुण्यांत असून सदाशिवराव त्याचे हिशेब तपासीत होता (३.२३३). मेरट वगैरे महाल अंताजीकडे होते. ते दूर करून सात लक्ष रुपये सरकारांत देण्याच्या करारावर डिसेंबर १७५८ त ते बापूजी महादेवाकडे देण्यांत आले (६.४७१). एकंदरींत अव्यवस्थेची कमाल झाली होती, ती सर्व सदाशिवरावानें तोडिली. त्यानें हिंगणे व अंताजी माणकेश्वर यांच्या प्रकरणांचा तपास करून निकाल लावून दिला (३.२३३) आणि लगेच पुढें स. १७६० च्या आरंभीं अंताजीपंत आपल्या कामावर रुजू झाला. सदाशिवराव दिल्लीस असतां हे सर्व सरदार रेशमासारखे मऊ येऊन त्याच्या केवळ भजनीं होते.

पानपताच्या लढाईनंतर अंताजी माणकेश्वर, बाजी हरि, नाना पुरंदरे व मल्हारराव होळकर असे रात्रौ दिल्लीचे सुमारें चालले असतां दांडग्यांच्या हुल्लडींत फरुखाबादच्या जमीनदाराच्या हातून अंताजी माणकेश्वर व बाजी हरि ठार झाले.

अंताजीच्या मुलाचे नांव बहिरोपंत. अंताजीपंताचे वंशज हल्लीं उत्तरहिंदुस्थानांत भेलशें येथें रहात आहेत. त्यांनीं आपलें आडनांव 'मांडके' असें लाविलें आहे (भा. इ. सं. मं त्रैमासिक वर्ष ३ अंक २-३-४)


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२४

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२४
अंताजी माणकेश्वर -
भाग २

इ. स. १७५५ च्या एप्रिलांत रघुनाथराव हिंदुस्थानांत असतां पेशवा व अंताजी माणकेश्वर यांची भेट नाशिक येथें झाली. त्यावेळीं अंताजीस पेशव्यानें हिंदुस्थानांत रवाना केलें आणि रघुनाथराव सांगेल ती कामगिरी करण्याचा हूकूम केला. त्याप्रमाणें अंताजी तिकडे जात असतां फौज न ठेवतां खोटी गणती दाखवून अंताजी पैसे उपटतो असा संशय येऊन रस्त्यांत पेशव्याचे हुकमानें दोन वेळां फौजेची झडती मुद्दाम खात्रीच्या माणसांकडून करण्यांत आली. ती कमी न भरतां बरोबर सात हजार भरली असें अंताजी लिहितो. रघुनाथराव परत येत असतां माळव्यांत अंताजीची व त्याची भेट झाली. रघुनाथरावानें अंताजीस अंतर्वेदींत गोपाळराव गणेशाच्या मदतीस जाण्याचा हूकूम केला. शिंदे वर्षभर मारवाडांत पेंचांत सांपडले असतां, त्याच्या मदतीस अंताजीस न पाठवितां, आपल्या मेव्हण्याकडे जाण्याचा हूकूम केला. यावरून शिंद्यांचें व रघुनाथरावाचें बरेंच बिनसलें होतें असें दिसतें. जुलै आगस्टांत अंताजीचा मुक्काम काल्पीजवळ यमुनातीरीं होता. त्यापूर्वीच जून महिन्यांत जयाप्पाचा खून झाला होता. सप्टेंबरांत दत्ताजी व जनकोजी यांस पेशव्यांची पत्रें पोंचल्यावर; त्यांनीं अंताजीस पत्र पाठवून मारवाडांत आपल्या मदतीस बोलाविलें. पेशव्यासहि तसें कळविल्याबद्दल त्यांनीं अंताजीस लिहिलें. या पत्रांत मारवाड स्वारीचा साद्यन्त वृत्तान्त शिंद्यांनीं अंताजीस कळविला. तेव्हां रघुनाथरावाचा हूकूम मानावा कीं, शिंद्याचें ऐकावें, असें द्विधाचित अंताजीचें झालें. इतक्यांत मारवाडांत जाण्याविषयीं पेशव्याचा निकडीचा हूकूम अंताजीस आला. 'मातबर सरंजामानिशीं मारवाडांत जाऊन, साम, दाम, दंड, भेद युक्तीस पडेल तसें करून, शिंदे यास काढून घेऊन येणें' तेव्हां गोविंदपंत बुंदेल्याकडून वीस लाख कर्ज घेऊन विजयादशीमीच्या मुहूर्तानें (१४-१०-१७५५) अंताजी फौजेची जमवाजमव करीत मारवाडांत गेला. रस्त्यांत करवली व बुंदीकोटा येथील फौजा राठोडांच्या मदतीस येत होत्या. त्यास पैका भरून अंताजीनें मागें वळविलें. जयनगरचा माधोसिंग, बिजेसिंगाचें साह्य हरप्रकारें करीत होता. सबब अंताजीनें जयपूरचा मुलुख लुटून त्यास तंबी पोंचविली. जयपूरचा अनिरुद्धसिंग याची व शिंद्याच्या फौजेची लढाई होत होती त्यांत ऐन वेळीं अंताजीची मदत आल्यामुळें शिंद्याच्या फौजेस मोठा धीर आला. मोठया शिकस्तीनें लढाई करून, अनिरुद्धसिंगास मराठ्यांनीं अडविलें; तेव्हां माधोसिंगानें घाबरून त्यास परत बोलाविलें. आणि अनिरुद्धसिंग अंताजीच्या छावणींत तहासाठीं गेला. नंतर जयपूरची फौज परत पाठवून अंताजी व अनिरुद्धसिंग शिंद्याच्या भेटीस आले. शेवटी झाल्यावर सर्व फौजांनीं नागोरावर मारा सुरू करतांच बिजेसिंग मोठ्या हिंमतीनें पुन: चालून गेला. त्यांत त्याचा पूर्ण पराभव होऊन त्यानें तहाची बोली लाविली परंतु बिजेसिंगास काढून रामसिंगास संपूर्ण राज्य दिल्याशिवाय दत्ताजी तह करीना. त्याबरोबर, जरब बसून बिजेसिंग मराठे सांगतील त्याप्रमाणें तह करण्यास कबूल झाला. अंताजीपंताच्या मार्फत तह ठरला. फार ओढून धरूं नये असें अंताजीनें दत्ताजीस सुचविलें.


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२३


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२३
अंताजी माणकेश्वर -
भाग १

उत्तर हिंदुस्थानांतील पेशव्यांचा एक सरदार ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. आडनांव गंधे. नगरजिल्ह्यांतील कामरगांवचा जोशीकुळकर्णीं. जावळी प्रकर्णांतील राघोबल्लाळ अत्रे याचा नातु त्रिंबकपंत अत्रे हा अंताजीपंताचा मावसभाऊ असल्यानें त्याच्या आश्रयास अंताजी कर्हेपठारप्रांतीं आला. त्रिंबकपंत वारल्यावर त्याच्या मुलांचा प्रतिपाळ व वतनीगांवचा कारभार अंताजी व त्याचा वडील भाऊ हरि हे करूं लागले. अंताजी हा शाहूच्या पदरीं प्रथम उदयास आला. नंतर तिकडून पेशव्यांकडे बदलला. यानंतर १७५३ पर्यंतची त्याची हकीकत समजत नाहीं. त्यावेळीं त्यानें दिल्लीस बादशहास मदत केली. तिच्या बद्दल त्याल इटावा व फुफुंद हे दोन परगणे जहागीर मिळाले.

अंताजी पेशव्यांच्या तर्फे दिल्लींत फौज घेऊन होता, त्याचें व वकील हिंगणे यांचें पटत नव्हतें. त्याचें बीज असें कीं, अंताजी थोडासा स्वत:ची प्रौढी मिरविणारा असून तो परभारें वजिराशीं वगैरे उलाढाली करूं लागला. हा प्रकार हिंगण्यास सहन झाला नाहीं. इ. स. १७५२-५३ त शिंदे होळकर दक्षिणेंत असल्यामुळें एकटा अंताजी पेशव्यांची पांच हजार फौज घेऊन पातशहाच्या संरक्षणासाठीं दिल्लीस होता. अंताजीनें फौज वाढविली तिला आगाऊ परवानगी घेतलेली नव्हती आणि तिच्या खर्चास पैसा नसून तारांबळ उडाली होतीं. पेशव्यानें अंताजीचा बंदोबस्त २०।१०।१७५३ रोजीं करून दिलां (ना. रो ६९) अंताजी माणकेश्वराच्या कामगिरीचे उल्लेख (रा. खं. ६, १४९. १८९. २०१) वगैरे ध्यानांत ठेवण्याजोगे आहे.

हिंगण्याबरोबरील तंट्यास मूळ कारण अंताजी माणकेश्वर असून, पैशावरून अंताजीशीं हिंगण्यांचा तंटा इ. स. १७५० पासूनच वाढत गेला (६.४७९). कुंभेरीहून दिल्लीवर चाल करण्याच्या प्रसंगी हा तंटा कळसास पोंचला होता. दामोधर महादेव पेशव्यास लिहितो, 'पातशाही तोफखाना (कुंभेरीवर) आणावयाची आज्ञा श्रीमंतीं केली. त्यास येथून तेथें 'लिहावें, अर्ज करावा, तो वकील पदरचा करितात ऐसें अंताजींना सांगावें तेणेंकरून काम होणेस दिरंगाई पडावी. अंताजीपंताचे सांगितल्यावरी हा मजकूर व्हावासा नाहीं. परंतु अंताजीपंत सखारामपंत व्याही; सखारामपंत श्रीमंतांचें दिवाण, श्रीमंत बज्यास्वामीच ! असा प्रकार तेथें दर्शवून अंताजीपंत बोलतील तें आमचें बोलणें समजावें ऐसें सखारामपंतीं त्यांचें निदर्शनास आणून दिल्हें. याजकरितां आतां आम्हांस आज्ञा न करावी. ''सखारामबापू व अंताजीपंत व्याही आणि रघुनाथराव भोळा व सखारामबापूच्या मुठींत, हा प्रकार पुष्कळांस जाचक झाला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२२
मराठ्यांचा दिल्लीतील पहिला राज्यकर्ता नगरचा
नगर- मराठ्यांचा दिल्लीतील पहिला राज्यकर्ता मूळचा नगरचा होता. त्यांचे नाव सरदार अंताजी माणकेश्वर गंधे. दुर्दैवाने त्यांचे उचित स्मारक नगरमध्ये अजून उभे राहू शकले नाही. त्यांच्या वंशजांनी केलेल्या पाठपुराव्याला अद्याप यश आलेले नाही.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे दिल्लीतील मुत्सद्दी, पानिपत युद्धातील पराक्रमी मराठा सरदार अंताजी माणकेश्वर गंधे मूळचे कामरगावचे. थोरले छत्रपती शाहू महाराज हे नगर मुक्कामी औरंगजेब बादशहाच्या कैदेत असताना अंताजी या पोरसवदा मुलाची कर्तबगारी त्यांनी हेरली. कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी अंताजीस साताऱ्यात आपल्या पदरी ठेवून घेतले व त्याच्याकडे कुलकर्णीपद सोपवले. पुढे रोज व प्रत्येक मोहिमेवर निघाना अंताजी थोरल्या छत्रपतींच्या कपाळी गंध लावू लागला आणि छत्रपतींनी त्यांचे नामकरण "गंधे' असे केले.
कऱ्हेपठार प्रांतात वडीलबंधू हरी माणकेश्वर हे वतनदार म्हणून पुढे आले. अंताजी पाच वर्षांचा असतानाच पोरका झाला. दुष्काळामुळे चुलते नसोपंत लिगोजींबरोबर तो उत्तर िहंदुस्थानात उदरनिर्वाहासाठी गेला. तिकडे शास्त्राचे व शस्त्राचे शिक्षण घेऊन तो तरबेज झाला. रामचंद्रपंत भट्टांनी थोरल्या छत्रपती शाहू महाराजांना अंताजीिवषयी सांगितले. १७-१८ व्या वर्षी अंताजी छत्रपतींच्या सेवेत दाखल झाला.
उत्तर हिंदुस्थानची कनौजी भाषा, फारसीवर प्रभुत्व, तलवारबाजीत िनपुणता आणि शत्रूशी बोलण्यातून मात करण्याचे कसब या गुणांमुळे छत्रपतींनी पेशव्यांना हुकूम देऊन अंताजीची नेमणूक मराठ्यांचे दिल्लीतील मुत्सद्दी म्हणून केली. त्यासाठी त्यास सात हजार स्वारांची मनसब दिली. उत्तरेकडील राजकारणात शिंदे - होळकरांप्रमाणे सेनापती म्हणून अंताजीस मोठे महत्त्व प्राप्त झाले.
अंताजी हे व्यक्तिमत्त्व अहंमन्य, धाडसी, पराकोटीचा स्वामीभक्त. छत्रपतींच्या आदेशाशिवाय कुणालाही न जुमानणारा असा. सन १७२९ मधील महंमदखान बंगशाच्या लढाईत अंताजी आपल्या सैन्यासह लढला. बंगशाने फार उच्छाद मांडला होता. बाजीराव पेशवे व त्रिंबकराव दाभाडे यांच्यात त्यावेळी मोठा झगडा सुरू होता. बंगशा मल्हारराव होळकरांवर मंडलेश्वर येथे चालून गेला. मात्र, ते त्याला चुकवून मारवाडात जयपुरास निघून गेले. लढण्याची कामगिरी अंताजीवर अाली. निकाराची झुंज देऊनही त्यास पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्रात उपेक्षा
प्रसिद्ध इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकार यांनी अंताजींच्या पराक्रमाचे, राष्ट्रसेवेचे स्मरण सतत केले पाहिजे, असे नमूद करून त्यांचा गौरव केला आहे. मात्र, मराठी सुपुत्र असूनही महाराष्ट्रात ते उपेक्षित राहिले. महेश सुरेश जोशी, पुणे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२१


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२१
*"बाजी बांदल", "रायाजी बांदल" -
इतिहासातील निसटलेली पाने*
लेखक : Nitinkaka Aashish Bandal
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ?
"सिद्दी जौहर" ने पन्हाळा गडाला घातलेल्या वेढ्यातून निसटून,
१३ जुलै १६६० रोजी "छत्रपती शिवाजी महाराज" हे पन्हाळा गडावरून विशाळगडाकडे निघाले,
तेव्हा वाटेत गजापूरच्या खिंडीत गानिमाने त्यांना गाठले.
महाराज विशाळगडाकडे निघाले आणि खिंडीत गनिमाला रोखून धरण्यासाठी आपले काही मावळे पुढे सरसावले.
त्या मावळ्यांचे नेतृत्व करत होते "कृष्णाजीराजे नाईक-बांदल" यांचे चिरंजीव "बाजी बांदल" व "रायाजी बांदल".
हे दोघेही भोर तालुक्यातील "हिरडस मावळ" मधील "पिसावारे" गावचे.
छत्रपती शिवरायांनी त्यांना त्या भागातील ५३ गावची वतनदारी दिली होती.
या दोघा भावांनी आपल्या तलवारीच्या जोरावर गनिमाला खिंडीत रोखून धरलं.
त्यांच्या सोबतीला होते "बाजी प्रभू देशपांडे" जे "बांदल" यांच्याकडे "चिटणीस / कारकून" म्हणून काम करत होते.
तसेच त्यांच्या बरोबर "गुंजन मावळ, हिरडस मावळ आणि रोहीड खोरे" मधील इतरही काही मावळे होते.
त्यात प्रामुख्याने शिंदे, गव्हाणे, चव्हाण, विचारे, खाटपे, सडे, धुमाळ, जाधव, शेलार, जगदाळे, भेलके, इंगळे, शिरोळे आणि इतर काही मावळ्यांचा समावेश होता.
"बाजी बांदल", "रायाजी बांदल" आणि त्यांच्या साथीदारांनी महाराज विशाळगडावर पोचेपर्यंत खिंड लढवत ठेवली आणि ती पावन केली.
या खिंडीमध्ये "बाजी बांदल", "रायाजी बांदल", "वीर बाजीप्रभू देशपांडे" आणि इतर काही मावळे धारातीर्थी पडले.
बांदल बंधूंच्या या पराक्रमामुळे नंतर शिवाजी महाराजांनी स्वत: "बांदल" यांच्या "पिसर्वे" येथील घरी जाऊन त्यांच्या मातोश्री "श्रीमती दिपाही बांदल" यांचे सांत्वन केले आणि "मानाचं दुसरं पान (तलवार)" त्यांना इनाम म्हणून दिलं.
(मानाचं पाहिलं पान "जेधे" यांना अगोदरच मिळालं होतं)
"बांदल" यांच्या तुकडीमध्ये जे सैन्य होतं त्या तुकडीचा उल्लेख स्वत: छत्रपती शिवरायांनी "बांदल सेना" असा केला असल्याचा पुरावा तत्कालीन पत्रव्यवहारामध्ये आहे.
*राहुल पवार*
*मराठा फोर्टस*
*दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धन,करमाळा*
📞9527729090
9552800893
संदर्भ:-
कु संदिप खाटपे
हिरडस मावळ खोरे
भोर पुणे.

 

Friday 3 March 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२०
पन्हाळगडचा वाघ विररत्न शिवबा काशीद
विररत्न शिवबा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक,
तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवबा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.
वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवबा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवबा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.
दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवबा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसा पाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.
झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्या प्रमाणे हेरलेली पालखी घेऊन १५-२० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.
शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. थोड्याचवेळात त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले की हा तर शिवबा काशिद ( न्हावी )आहे. सिध्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले शिवाजीराजेंसाठी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिध्दीने शिवबा काशिदांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
आता पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला, नुसताच मनस्ताप, पश्चात्ताप आणि चिडचिड, घोड्याला टाच मारून अवघे एल्गारत निघाले वाटेतील गुढगा गुढगा चिख्खल तुडवीत.
इतिहास शिवबा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरु शकणार नाही, कारण शिवबा काशिद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.
स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवबा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे, शौर्य स्मारकांत वीररत्न शिवबा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत. पहिल्या म्यूरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीररत्न शिवबा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडीमार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीररत्न शिवबा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे. बारा बाय दहा फूट आकारातील हे म्यूरल्स आहेत.म्हणुन धन्य धन्य शिवबाराजे अाणि धन्य धन्य शिवबा काशिद यांना .....!!!! पन्हाळगडाचा वाघ विररत्न शिवबा काशिद
Post By...
गाथा इतिहासाच्या भगव्याचि

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१९
शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव
लखोजीराव जाधव आणि त्यांच्या मुलांचा निजामशाहने दगा करून खून केला त्यावेळी त्यांचे सुपुत्र अचलोजी हे हि हा हल्ल्यात मृत्यू पावले होते. त्यानंतर अचलोजी यांचे सुपुत्र संताजी जाधव यांचे संगोपन माँसाहेब जिजाऊ यांनी पुणे येथे केले. संताजी जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच मोठे झाले. त्यांचा जन्म साधारण १६४० सालचा असावा. शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव यांचा पहिला उल्लेख येतो तो १६५९ यासाली अफजलखान वधाच्या प्रसंगी जे दहा लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत होते त्यामध्ये शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव हे एक होते. पन्हाळगडाला जेंव्हा सिद्दीजोहरने वेढा घातला होता त्यावेळी देखील शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव हे देखील या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अडकले होते. रात्री किल्ल्यातून छत्रपती महाराजांबरोबर शंभूसिंग जाधव हे देखील वेढ्यातून बाहेर पडले. पुढे सिद्दी जोहर आणि फाजलखानच्या सैन्य तुकड़ी यांच्याविरुद्ध जे युद्ध झाले यातच शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव हे धारातीर्थी पडले. हे शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव म्हणजे मोगलांना पळताभुई करून सोडणाऱ्या मराठा साम्राज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे वडील होत ..
स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वामिनिष्ठ शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव यांना मानाचा मुजरा !!
पोस्ट -राज जाधव

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१७
शिवराज्यातले 'बारा महाल' आणि 'अठरा कारखाने' ... !
भाग 2
अठरा कारखाने
१) खजिना (कोशागारं खजाना स्यात)
२) जव्हाहिरखाना (रत्नशाळा)
३) अंबरखाना (धान्यशाळा)
४) आबदारखाना (जलस्थानम)
५) नगारखाना (आनकस्तु नगारास्यात)
६) तालीमखाना (बलशिक्षा तु तालीमं)
७) जामदारखाना (वनसागर)
८) जिरातेखाना (शस्त्रागार)
९) मुदबखखाना (पाकालयम)
१०) शरबतखाना (पानकादिस्थानम)
११) शिकारखाना (पक्षिशाळा)
१२) दारूखाना (अग्न्यस्त्र संग्रह)
१३) शहतखाना (आरोग्यगृह)
१४) पीलखाना (हत्तीगृह)
१५) फरासखाना (अस्तरणागार)
१६) उश्टरखाना (उंटशाळा)
१७) तोपखाना (यंत्रशाळा)
१८) दप्तरखाना (लेखनशाळा)
बारा महाल आणि अठरा कारखाने यांच्या मधल्या प्रत्येकावर एक अधिकारी नेमलेला होता आणि त्याने 'खाजगीच्या इतल्यात' म्हणजे 'Under Information' राहावे असे स्पष्ट नियम होते. महत्वाचे म्हणजे जर आपण कंसातील म्हणजे राज्यव्यवहारकोशामधील नावे नीट वाचली तर आपल्या लक्ष्यात येइल की ती संस्कृत व मराठी मध्ये आहेत. थोडक्यात शिवरायांनी फारसी नावे असलेल्या ह्या सर्व खात्यांना राजाभिषेका नंतर संस्कृत व मराठी नावे दिली होती.
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१६

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१६
शिवराज्यातले 'बारा महाल' आणि 'अठरा कारखाने' ... !
भाग १
छत्रपति शिवरायांच्या काळात राज्य शासनाच्या महत्वाच्या कामासाठी विविध विभाग पाडण्यात आले होते. यात 'कारखाने' आणि 'महाल' असे २ प्रमुख भाग होते. कारखाने म्हणजे 'कार्यस्थाने' तर महाल म्हणजे 'विविध भांडारे'. सभासद बखरीत एकुण बारा महाल आणि अठरा कारखाने यांचे उल्लेख आले आहेत. ह्यात बरीच खाती समाविष्ट नाहीत. अर्थात जी अधिक महत्वाची ती स्वतंत्रपणे नोंदली गेली असतील.
बारा महाल आणि अठरा कारखाने खालीलप्रमाणे ... (कंसातील नावे 'राजव्यवहारकोश' यामधून घेतली आहेत)
• बारा महाल
१) पोते (कोशागार)
२) थट्टी (गोशाळा)
३) शेरी (आरामशाळा)
४) वहिली (रथशाळा)
५) कोठी (धान्यागार)
६) सौदागीर
७) टकसाल (मुद्राशाळा)
८) दरुनी (अंत:पुर)
९) पागा (अश्वशाळा)
१०) ईमारत (शिल्पशाळा)
११) पालखी (शिबिका)
१२) छबिना (रात्रिरक्षणं)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१५
छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
भाग ७
आपण बघू शकतो की पहिली ८ कलमे अष्टप्रधान यांच्या कामाबद्दल निगडित आहेत. ८ पैकी ६ प्रधानांना युद्ध - युद्धादि प्रसंगाला गरजेनुसार जाणे हे त्याच्या पदाच्या जबाबदारीमध्ये समाविष्ट होते. त्यातून फ़क्त पंडितराव आणि न्यायाधीश यांना वगळण्यात आले होते. ९ वे कलम पूर्णपणे 'चिटणीशी'बद्दल आहे. चिटणीस म्हणजे आजचा 'कैबिनेट सेक्रेटरी'. हे महत्वाचे पद राजाभिषेकानंतर 'बाळाजी आवजी' यांच्याकडे सोपवले गेले होते. फौजेचे इतर अधिकारी आणि बारा महालाचे अधिकारी यांनी करावयाची कामे सुद्धा पूर्णपणे स्पष्ट केली गेली होती हे सुद्धा इतर कलमांवरुन समजते.
यात १२ वे कलम सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. 'हुजुरात' म्हणजे खुद्द छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत येणारया खात्याचे उल्लेख ह्यात केले गेले आहेत. किले-कोट, ठाणे आणि जंजिरे याबद्दल अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम त्यांनी बनवले होते. ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१४

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१४
छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
भाग ६
१६. दरुणी महालांचे काम दिवाण नेमून दिल्हे यांणी सर्व पाहून करावें. चिटणीस, फडणीस यांणी आपलाले दरखाचे कागदपत्र ल्याहावें. त्यावर निशान, चिन्ह दिवाणानी करून वाडयास समजाउन मोर्तब साक्ष करावें.
येणेप्रमाणे कलम १.
१७. पोतनीस यांणी पोत जमाखर्च लिहिणे करावें. नजर पेश कशी जमा करावी. पोतदार यांनी पारख करावी.
येणेप्रमाणे कलम १.
१८. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जावयास दखरदार सर्व हुजुरचे जावे. त्याचे दाखल्यानी व्यवहार करावा. स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिल्हे त्यांणी सेवा-व्यापार चालवावा. हुजुर रहावें.
येणेप्रमाणे कलम १.
१९. आबदारखाना चिटणीस याजकडे सराफखानासुधा अधिकार सांगितला. मजालसी, अत्तर-गुलाब, व हार-तुरे व फळफळावळ खुशवाई खरी जमाखर्च यांणी करून हिशेब दप्तरी गुजरावा.
येणेप्रमाणे कलम १.
२०. पागा जुमलेदार यांणी कैद करून दिल्ही त्याप्रमाणें चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमें कामकाजें करावीं.
येणेप्रमाणे कलम १.
येकूण कलमें वीस मोर्तब.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१३

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१३
छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
भाग ५
११. सेनाधुरंधर यांणी बिनी करावी. आघाडीस जावें, उतरावें. फडफर्मास जमा करावीं. लुट करणें मना करणें. चोकसी-ताकीद यांजकडे, पुढे असोन सेना रक्षण करावी.
येणेप्रमाणे कलम १.
१२. किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें.
येणेप्रमाणे कलम १.
१३. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिलें. त्यांणी सेवा व्यापार चालवावा. हुजुर रहावें.
येणेप्रमाणे कलम १.
१४. सुभे, मामले, तालुकादार यांस ज्याच्याकडे जें नेमलें त्यांणी जाबतेप्रमाणें चालवावे. हुजुरचे दरखदार, चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांचे इतल्याने चालून हिशोब गुजरावें.
येणेप्रमाणे कलम १.
१५. बारा महालांचे अधिकारी यांणी आपलाले काम दुरुस्त राखुनु हिसेब आकारून दप्तरांत गुजरावें.
येणेप्रमाणे कलम १.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१२
छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
भाग ४
६. पंडितराव यांणी सर्व धर्माधिकार, धर्म, अधर्म पाहून विचिक्षा करावीं. शिश्टांचे सत्कार करावे. आचार, व्यवहार, प्रायश्चितपत्र होतील त्यावर संमत चिन्ह करावें. दान-प्रसंग, शांती अनुष्ठान तत्काळी करावें.
येणेप्रमाणे कलम १.
७. न्यायाधीश यांणी सर्व राज्यातील न्याय-अन्याय मनास आणून बहुत धर्में करून न्याय करावें. न्यायाची निवडपत्रे यांजवर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.
८. सुमंत यांणी परराज्यातील विचार करावा. ज्यांचे वकील येतील त्यांचे सत्कार करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.
९. चिटणीस यांणी सर्व राज्यातील राजपत्रे ल्याहावीं. राजकारण-पत्रें, उत्तरें ल्याहावीं. सनदी , दान पत्रें वगैरे महालीं, हुकुमी यांचा जाबता, फडणीशी, चिटणीशी अलाहिदा त्याप्रमाणें ल्याहावें. हातरोखा, नाजुक पत्रें, यांजवर मोर्तब अथवा ख़ास दस्तक. मात्र वरकड़चा दाखला, चिन्ह नाहीं, चिटणीसांनीच करावें.
येणेप्रमाणे कलम १.
१०. फौजेचे सबनीस, बक्शी यांणी सर्व फौजेची हाजरी चौकसी करावी. यादी करून समजावावें. रोज्मरा वाटणें, सत्कार करावा. युद्धादि प्रसंग करावा.
येणेप्रमाणे कलम १.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २११

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २११
छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
भाग ३
कानून जाबता : प्रधान मंडळ
क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपति
राजाभिषेक शके १, आनंदनाम संवत्सरे,
ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, भोमवासर-
१. मुख्य प्रधान यांणी सर्व राजकार्य करावे; राजपत्रावरी शिक्का करावा; सेना घेउन युद्धप्रसंग स्वारी करावी, तालुका ताबिनात स्वाधीन होइल त्यास रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावें व सर्व सरदार, सेना यांजबरोबर जावें आणि सर्वसंमत चालावें.
येणेप्रमाणे कलम १.
२. अमात्य यांणी सर्व राज्यांतील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार, फडणीस यांचे स्वाधीन असावें; लिहिनें चौकशीनें आकारावें; फडणीशी, चिटणीशी पत्रांवर चिन्ह संमत करावे; युद्धप्रसंग करावें. तालुका जतन करून आज्ञेतं चालावें.
येणेप्रमाणे कलम १.
३. सचिव यांणी राजपत्र शोध करून अधिक-उणे मजकूर शुद्ध करावी. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होइल तो रक्षून आज्ञेतं वर्तावें. राजपत्रावर चिन्ह संमत करावें.
येणेप्रमाणे कलम १.
४. मंत्री यांणी सर्व मंत्रविचार राजकारण यांतील सावधतेनें आमंत्रण, निमंत्रण, वाकनिशी यांचे स्वाधीन. तालुका जतन करून युद्धादि प्रसंग करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.
५. सेनापती यांणी सैन्य रक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होइल तो रक्षून हिशोब रुजू करून आज्ञेतं वर्तावें व फौजेचे लोकांचे बोलणे बोलावें. सर्व फौजेचे सरदार यांणी त्याजबरोबर चालावें.
येणेप्रमाणे कलम १.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१०
• छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
भाग २
जाहीर झालेले ४ कानून जाबते खालीलप्रमाणे -
१) जाबता चिटणीसी लिहीण्याचा - एकूण कलमे १२
२) जाबता लष्कर सरनौबत - एकूण कलमे ८
३) जाबता कारखानीशी आणि सबनीशी लिहीण्याचा - एकूण कलमे २२ (कारखानीशी १४ आणि सबनीशी ८ कलमे)
४) प्रधानमंडळ - एकूण कलमे २०
आपण 'प्रधानमंडळ' ह्या जाबत्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. छत्रपति शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांची कार्ये व जबाबदाऱ्या थोडक्यात खालीलप्रमाणे होते -
१) मोरोपंत पिंगळे (पंतप्रधान / पेशवा) : सर्व राजकार्य, राजपत्रावर शिक्का, ताब्यात असलेल्या प्रदेशचे रक्षण व व्यवस्था, युद्ध.
२) रामचंद्र निळकंठ (अमात्य / मुजुमदार) : जमाखर्च, दप्तरदार व फडणीस यांवर देखरेख, खात्याशी संबंधित असलेल्या कागदांवर शिक्का, युद्ध.
३) अण्णाजी दत्तो (सचिव / सुरनीस) : राजकार्यविषयक सर्व जबाबदारी, युद्ध.
४) रामचंद्र त्रिंबक (सुमंत / डबीर) : परराज्यविषयक कार्याचा विचार, युद्ध.
५) हंबीरराव मोहिते (सेनापती / सरनौबत) : सैन्यविषयक जबाबदारी, युद्ध.
६) दत्ताजी त्रिंबक (मंत्री / वाकनीस) : अंतर्गत राजकारणाचा विचार, हेर खाते, युद्ध.
७) रघुनाथराव (पंडितराव) : धर्मा-धर्म विचार.
८) रावजी निराजी (न्यायाधीश) : तंटे, न्याय-निवाडा.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०९

छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
भाग १

ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी 'महाराजांनी शिरी छत्र धरले. राजे चक्रवर्ती सम्राट झाले. मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य नाही जाहली.' राजाभिषेकानंतर ३ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस' श्री शिवछत्रपति महाराजांनी ३ जाहीरनामे प्रसिद्द केले. तर चौथा जाहिरनामा राजाभिषेकानंतर १५ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस' घोषीत झाला. हे सर्व जाहीरनामे 'कानून जाबता' म्हणुन ओळखले जातात. थोडक्यात राजाभिषेकानंतर २ आठवडयामध्ये राज्यव्यवहार पद्धती कशी असेल ते छत्रपति शिवरायांनी पूर्णपणे स्पष्ट केले होते. अर्थात आधी सुद्धा हीच राज्यव्यवहार पद्धत अमलात असली पाहिजे; राजाभिषेक हे जाहीर करायला एक निमित्त ठरले असावे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०८
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १३
रयतेचा राजा
छत्रपती शिवरायांनी सतराव्या शतकात मुघली सत्तेला आव्हान देत एक स्वतंत्र राज्य घडविले.शिवरायांमुळे त्या काळातील हिंदूस्थानातील जनतेत स्वातंत्र्याची लाट आली.छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्माचे,संस्कृतीचे रक्षण केले पण त्यांनी इतर धर्माचा पण तेवढाच आदर केला.छत्रपतींच्या आरमारात इब्राहिमखान,दौलतखान हे सर्वोच्य पदावर होते.सिद्दी हिलालने आपल्या पाच पुत्रासह पन्हाळगडाच्या लढाईत मोठा पराक्रम गाजविला.सिद्दी इब्राहिम हा अफजलखान भेटीच्या वेळी छत्रपतींच्या अंगरक्षकापैकी एक होता.काझी हैदर हा शिवाजीराजांचा खास सचिव व वकील होता.मदारी मेहतर हा शिवरायांचा विश्वासू नोकर होता.दर्यासारंग हा छत्रपतींच्या आरमाराचा पहिला सुभेदार होता.शिवरायांच्या तोफखान्यातील जवळपास सर्व गोलंदाज(तोफची)मुसलमान असत.त्यामुळे छत्रपती शिवराय हे केवळ हिंदूचे राजे नव्हते तर ते सर्व रयतेचे राजे होते हे सिध्द होते.छत्रपती शिवरायांनी इस्लामी राजसत्तेशी संघर्ष केला पण इस्लामी प्रजा तसेच इतर धर्मीयांशी ते आपूलकीने वागले,या महान राष्ट्रपुरूषाला आज आपण धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवणे कीतपत योग्य आहे ?,याचा खरोखर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले.अशा वेळी शोकमग्न न होता छत्रपतींनी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या. कर्नाटकची प्रसिध्द मोहिम ही त्यापैकी एक होय.
कर्नाटकच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर छत्रपतीं आजारी पडले व शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले.सभासद च्या बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.ते दिवशी पृथ्वीकंप जाहला.गगनी घूमकेतू उदेला.उल्कापात आकाशाहून जाला.रात्री जोड-इंद्रधनुष्ये निघाली.अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या.श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.पाण्यातील मत्स्य बाहेर पडून अमासवणी उदक जाहाले.ऐशी अरिष्टें जाहाली.मग राजियाचे कलेवर चंदनकाष्टें व बेलकाष्टें आणून दग्ध केलें
छत्रपतींच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगावर हजारो पाने अपुरी पडतील,पुढील कालात मी सविस्तरपणे याबद्दल लिहिणार आहे.
।। प्रौढप्रतापपुरंदर कुळवाडीभुषण,बहुजनप्रतिपालक,
क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजा
शिवछत्रपती की जय।।
छत्रपति शिवरायांची रायगडावरील समाधी
सांभार; ;http://www.marathidesha.com/

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०७
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १२
छत्रपतींचा राज्याभिषेक
सर्वसामान्य रयतेला न्याय देण्याकरिता सर्वोच्य सत्ताकेंद्र निर्माण करणे आवश्यक होते.तसेच राज्याभिषेक करून त्यांना स्वतंत्र राज्याची स्थापना करावयाची होती.राज्याभिषेकाची तयारी कित्येक महिने रायगडावर चालू होती.राज्याभिषेक सोहळ्यावेळी काही तथाकथित अतिविद्वान धर्मपंडितांनी आणि महाराजांच्या अष्टप्रधान मंडळीतील काही लोकांनी महाराजांच्या क्षत्रियपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले.शेवटी बाळाजी आवजी यांनी राजस्थानातील उदयपूरला जाऊन,महाराज हे सिसोदिया राजपूत वंशाचे आहेत हे सिध्द केल्यानंतर अष्टप्रधान मंडळीचा विरोध मावळला.नोकर राजांच्या क्षत्रियपणाबद्दल प्रश्न उपस्थित करतो यापेक्षा मराठेशाहीचे दुर्दैव ते कोणते? असाच प्रकार कोल्हापूरच्या राजर्षि शाहू महाराजां संदर्भात झालेला आहे,त्याचे सविस्तर वर्णन राजर्षि शाहूंच्या लेखात आहे.
सन २९ मे १६७४ पासून राज्याभिषेकासाठी विविध धार्मिक कार्यक्रम होऊ लागले.मुख्य राज्याभिषेकाचा सोहळा ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर)रोजी रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'
श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.
छत्रपति शिवरायांचे रायगडावरील शिल्प
सांभार ;http://www.marathidesha.com/

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०६
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ११
सांभार :www.marathidesha.com
किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला.किल्ल्यावर मोठी हातघाईची लढाई झाली.किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली.लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलेले.
शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले.तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला,याचवेळी सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी मुख्य दरवाज्यातून प्रवेश करून निकराची लढाई करून किल्ला काबीज केला.रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला.कोंढाणा इ.स.४फेब्रुवारी,१६७०रोजी मध्यरात्री मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाण्याचे संपूर्ण युध्द हे रात्री झाले.
सभासदाच्या बखरीत या युध्दाचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता.त्याने कबूल केले की,'कोंडाणा आपण घेतो',असे कबूल करुन वस्त्रे,विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला.आणि दोघे मावळे बरे,मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले.गडावर उदेभान रजपूत होता.त्यास कळले की,गनिमाचे लोक आले.ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन,हाती तोहा बार घेऊन,हिलाल (मशाल),चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज,बरचीवाले,चालोन आले.तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले.मोठे युद्ध एक प्रहर झाले.पाचशे रजपूत ठार जाले.उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली.दोघे मोठे योध्दे,महाशूर,एक एकावर पडले.तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली.दुसरी ढाल समयास आली नाही.मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन,दोघे महारागास पेटले.मोठे युध्द झाले,एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारें पडले.दोघे ठार झाले.
मग सुर्याजी मालूसरा(तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून,कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले.किल्ला काबीज केला.आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली,त्याचा उजेड राजियांनी राजगडाहून पाहिला आणि बोलले की,'गड घेतला,फत्ते जाली'!असे जाहालें.तों जासूद दूसरे दिवशीं वर्तमान घेऊन आला कीं,'तानाजी मालसुरा यांनी मोठे युध्द केलें.उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालसुरा पडला.'असें सांगितलें.गड फत्ते केला असें सांगताच राजें म्हणूं लागले की,'एक गड घेतला,परंतू एक गड गेला!'असे तानाजीसाठीं बहूत कष्टी जाहाले.
कोंढाणा किल्ला जिंकल्याची बातमी छत्रपतींना समजल्यानंतर अत्यंत दु:खी झालेल्या राजांनी"गड आला पण सिंह गेला"असे उद् गार काढले.त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव उमरठ या तानाजींच्या गावी पाठविले,ज्या मार्गावरून तानाजींचे शव गेले,तो मार्ग 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो.आपल्या धन्याच्या वचनाला जागून किल्ला ताब्यात घेणारा तानाजी खरोखरच सिंह होता.
सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांचे स्मारक