Total Pageviews

Monday, 8 August 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १५
शूरवीर मराठा सरदार आनंदराव गोविंदराव गायकवाड_भाग
६ 
आबा शेलूकर नांवाचा इसम गुजराथेंत पेशव्यांतर्फे सुभेदार होता. तो दौलतराव शिंद्याकडे गेला असता तेथें त्यास कैद करण्यांत आलें. हें कृत्य रावबाजीच्या सांगण्यावरून झालें. त्यांत गोविंदरावाचा हात होता. परंतु शेलूकरानें दहा लाख रूपये देण्याचा दौलतरावाशीं करार करून आपली सुटका करून घेतली व परत येऊन तो अहमदाबादचा कारभार पाहूं लागला. शेलूकर हा नाना फडनाविसाच्या पक्षाचा असल्यामुळें बाजीरावानें गुप्तपणें गोविंदरावास त्याच्या विरूध्द पुन्हां उठविलें. याच सुमारास शिंद्यानेंहि रकमेच्या भरपाईचा तगादा लावल्यामुळें शेलूकरानें गायकवाडाच्या कांही गांवांपासून पैसा उकळला. त्यामुळें दोघांमध्यें पुन्हां भांडणें सुरू झाली. इ. स. १७९९ सालीं सुरतचा नबाब मरण पावला. तेव्हां सुरतेच्या चौथाईचा गायकवाडाचा हिस्सा प्राप्त करून घ्यावा असा इंग्रजांनीं मनसबा ठरविला व त्याप्रमाणें त्यांनीं गोविंदरावास विनंति करून तो हक्क तर मिळविलाच; परंतु त्याबरोबर चौ-याशी जिल्हाहि आणखी पदरांत पाडला. वास्तविक १७९३ सालीं पेशव्यांनां जशी या सुरतेच्या हक्काबद्दल इंग्रजानीं हरकत घेतली तशी या वेळेस पेशव्यांनांहि घेतां आली असती. पण पेशवे सध्या निर्बळ झाले होते. या देणगीबद्दल इंग्रजांनां गोविंदरावानें शेलुकराविरूध्द मदत मागितली पण इंग्रजांनीं त्याबद्दल टाळाटाळच केली. तथापि थोडक्याच दिवसांनीं अहमदाबाद गायकवाडच्या हातीं आलें, आबा शेलूकर कैद झाला व पेशव्यांनीं गायकवाडास आपला गुजराथेंतील हिस्सा वार्षिक पांच लाख रूपयांवर पांच वर्षांकरितां इजा-यानें दिला (१८०० ऑक्टोबर). इकडे गोविंदराव सप्टेंबरांतच मरण पावला. त्याच्या मागून त्याचा मुलगा कान्होजी हा मुतालकीचा कारभार पाहूं लागला. परंतु त्याच्या उद्दाम वागणुकीनें थोड्याच दिवसांत आरबसैन्यानें त्याला पदच्युत करून आनंदराव (त्याचा भाऊ) यास कारभारी केलें. त्यामुळें आनंदराव व त्याचा चुलता मल्हारराव यांत वैर माजलें. तेव्हां आनंदरावाचा दिवाण रावजी आप्पाजी यानें इंग्रजांकडे मदत मागितली व ती त्यांनीं दिली. यावेळीं सर्व सत्ता आरबांच्या हाती गेली होती. इंग्रजांच्या मदतीनें आनंदरावानें मल्हाररावाचा पराभव करून त्याला नडियादकडे (कडी प्रांतांत) कांही जहागीर दिली. या सुमारासच गणपतराव व मुरारराव गायकवाड यांनीं बंडाळी माजविली होती. त्यांचा पराभव होऊन ते धार येथें पळून गेले. या दोन तीन प्रसंगी केलेल्या मदतीबद्दल इंग्रजांनीं आपली तैनातीफौज गायकवाडावर रावजीआप्पाजीच्या तर्फे लादली; व तिच्या खर्चासाठीं बराचसा प्रांत घेतला; तसेंच स्वारीखर्चाबद्दलहि भरपूर पैसा मिळविला. लागलीच डंकन (गव्हर्नर) यानें रावजीशीं त्यानें केलेल्या या गोष्टींबद्दल गुप्त तह करून त्याचें व त्याच्या वंशजांचें रक्षण करण्याचें वचन दिलें. पुढें. (१८०२). गायकवाडांचें आरबसैन्य काढून टाकण्याबद्दल इंग्रजांनीं आनंदरावास लकडा लाविला. परंतु आपली बाकी दिल्याशिवाय आरब जाईनात. उलट त्यांनी आनंदरावास कैद केलें. तेव्हां इंग्रजांनीं त्याची सुटका करून आरबांची रक्कम देऊन टाकून टाकून त्यांनां काढून लाविलें. यानंतर कान्होजीनें बंड उभारलें पण तें इंग्रजांनीं मोडलें व तो उज्जनीकडे पळून गेला. इतक्यांत मल्हाररावानें पुन्हां उचल केली. पण विठ्ठलराव नांवाच्या सरदारानें त्याला कैद करून त्याचें बंड मोडलें. रावजी आप्पाजीनें गायकवाडीराज्याची सर्व सत्ता इंग्रजांच्या ताब्यांत दिल्यानें, प्रजा त्याला घरभेद्या म्हणूं लागली. परंतु इंग्रज म्हणतात कीं त्यानें दूरवर दृष्टी देऊन योग्य मार्ग स्वीकारला. यापुढें काठेवाड आपल्या ताब्यांत असावा अशी हांव इंग्राजांस उत्पन्न होऊन त्यांनीं गायकवाडाशीं १८०५ त तशा प्रकारचाएक तहहि केला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४
शूरवीर मराठा सरदार गोविंदराव दमाजी गायकवाड_भाग ५
आपण पेशव्यांचे अंकित आहोंत हें फत्तेसिंग कबूल करी, परंतु त्यांच्या संमतीवांचून आपणांस आपला मुलुख दुस-यास देतां येत नाहीं हें मात्र त्यास मान्य नव्हतें. आपण मुलूख परत द्यावा हें त्याचें देखील इंग्रजांपाशी मागणे होतें. परंतु याचें कारण तो असें सांगे कीं, ज्याकरितां हा मुलूख इंग्रजांस दिला तें कार्य राघोबादादा हे साध्य करूं शकले नाहींत. म्हणून तो प्रांत इंग्रजांनां देण्याचें आतां कांही प्रयोजनच राहिलें नाहीं. पुढें (१७७८) त्यानें पेशव्यांनां मागील सर्व बाकी, साडे दहा लक्ष रूपये खंडणी व ५ लक्ष रूपये नजर देऊन सेनाखासखेलीचीं वस्त्रें मिळविलीं. त्यामुळें गोविंदरावाचा हक्क कायमचा नष्ट झाला.
फत्तेसिंगानें गॉडर्ड याशीं तह करून, पेशव्यांशीं चाललेल्या तत्कालीन युद्धांत त्याच्या मदतीस ३००० फौज देण्याचें कबूल (२६ जाने. १७८०) केलें. तथापि युध्द चाललें असतांहि गायकवाडानें आपली शिरस्त्याची खंडणी
Insert Image
पेशव्यांस देण्याचें बंद करूं नये अशीहि एक अट होती. यावेळीं इंग्रजानें त्याला महीच्या उत्तरेकडील प्रांत देण्याचें कबूल केलें व त्याबद्दल त्यानें इंग्रजांनां सुरत व भडोच प्रांत दिले; आणि वर सांगितल्याप्रमाणें फत्तेसिंग हा इंग्रजांचा हस्तक बनला. पुढें इंग्रजांनीं पेशव्यांशीं तह केला (१७८१), त्यांत फत्तेसिंगाजवळ असलेला मुलुख तसाच असावा, त्यानें पेशव्यांनां नेहमींप्रमाणें खंडणी द्यावी असें ठरलें. यापुढें मरेपर्यंत फत्तेसिंगानें राज्य सुरळीतपणें चालविलें.
शेवटीं (१७८९ डिसेंबर २१) फत्तेसिंग आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरून खाली पडून मरण पावला. मरेपर्यंत फत्तेसिंग हा सायजीचा मुतालिकच होता. त्याच्या मरणाच्या वेळीं त्याचा धाकटा भाऊ मानाजी हा बडोद्यासच होता. त्यानें लागलीच सयाजीस आपल्या ताब्यांत घेऊन जहागिरीचा अधिकार बळकाविला. या वेळीं गोविंदराव हा पुण्याजवळ अज्ञातवासांत रहात होता. त्यानें संस्थानचा अधिकार आपणांस मिळावा अशी नाना फडणविसास विनंति केली. परंतु मानाजीनें पुणें दरबारास ३३,१३,००१ रूपये नजर करून व फत्तेसिंग गायकवाडाकडे राहिलेल्या ३६ लाखांची मागील बाकीची भरपाई करण्याचें अभिवचन देऊन आपला अधिकार कायम करविला. हें पाहून महादजी शिंद्यांनीं गोविंदरावाची बाजू घेऊन मानाजीची नेमणूक पेशव्यांकडून रद्द करविली. तेव्हां मानाजी इंग्रजांकडे गेला व गॉडर्ड व फत्तेसिंग यांच्या तहाच्या आधारावर त्यांनीं आपणांस मदत करावी असें म्हणूं लागला; परंतु सालबाईच्या तहानें मागचा तह रद्द झाला असें सांगून इंग्रजांनीं ह्या वादांत पडण्याचें नाकारलें. नान फडणवीस तडजोड करण्यास तयार होते; पण गोविंदरावाच्या हट्टामुळें तडजोड झाली नाहीं. इतक्यांत एकाएकीं (१ ऑगष्ट १७९३) मानाजीचें देहावसान झालें. मानाजी मेला तरी गोविंदरावास बडोद्यास जाण्याची परवानगी मिळाली नाहीं. पुण्यांतील कारभारीमंडळ गोविंदरावास म्हणूं लागले कीं तुम्ही पूर्वीच्या सर्व अटी कबूल करून शिवाय सन १७८० सालीं इंग्रजांनां देऊं केलेला तापीचा दक्षिणेकडील स्वतःचा प्रदेश व सुरतच्या वसूलांतील आपला वांटा सरकारांत द्या. इंग्रजांनीं यावर हरकत घेतली कीं, सालबाईच्या तहान्वयें गायकवाडाचें कोणतेंहि काम न केल्यामुळें त्यांचा मुलूख घेण्याचा पेशव्यांस अधिकार नाहीं. पुढें गोविंदराव बडोद्यास गेला. तेथें त्याला खंडेरावाचा मुलगा मल्हारराव याच्याशीं लढाई करावी लागली; तींत मल्हारराव पराभव पावला व गोविंदराव सयाजीचा मुतालिक म्हणून राज्यकारभार पाहूं लागला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३
शूरवीर मराठा सरदार गोविंदराव दमाजी गायकवाड_भाग ४
इ. स. १७६० मध्यें भाऊसाहेब हिंदुस्थानांत जावयास निघाले तेव्हां चंबळेच्या अलीकडेच पेशव्यांच्या आज्ञेवरून दमाजी त्यांस जाऊन मिळाला. पानिपतच्या अखरेच्या घनघोर लढाईंत दमाजी व इब्राहिमखान हे दोघेहि बरोबरच रोहिल्यांशीं लढत होते. नंतर मल्हारराव होळकरानें रणभूमीवरून पाय काढल्यावर दमाजीनेंहि त्याचेंच अनुकरण केलें. पुढें (१७६३) निजामाशीं झालेल्या तांदुळज्याच्या लढाईंत (पेशव्यांतर्फे) दमाजी हजर होता. नंतर (स. १७६८) दमाजीनें आपला मुलगा गोविंदराव याजबरोबर फौज देऊन त्याला थोरले माधवराव यांच्याविरूध्द राघोबादादास मदत करण्यास पाठविलें. इ. स. १७६८ च्या सुमारास दमाजी मरण पावला. त्याला सयाजी, गोविंदराव, मानाजी व फत्तेसिंग असे चार मुलगे होते. यांपैकीं सयाजी सर्वांत वडील होता पण तो पहिल्या बायकोचा नव्हता. गोविंदराव पहिल्या बायकोचा होता पण धाकटा होता. दमाजी मेला तेव्हां गोविंदराव हा राघोबादादास मदत केल्यामुळें पुण्यास अटकेंत होता. त्यानें सुटकेसाठीं भूर्दंड व नजर मिळून ५०॥ लक्षांवर रूपये देऊन, ७ लक्ष ७९ हजार रूपये दरसाल खंडणी देण्याचें आणि पुण्यास नेहमीं ३ हजार फौज व लढाईच्या वेळीं ४ हजार फौज ठेवयाचें कबूल करून सेनाखासखेल हें पद मिळविलें. सयाजी स्वतः वेडा होता पण फत्तेसिंगानें त्याचा हक्क पुढें मांडून पेशव्यांकडूनच (१७७१) आपल्या भावासाठीं सेनाखासखेल ही पदवी मिळविली व आपण त्याचा मुतालिक झाला. यामुळें गोविंदराव व फत्तेसिंग यांच्यामध्यें वैमनस्य आलें. तेव्हां गोविंदरावानें बंड केल्यास गुजराथेंत शांताता राखता यावी म्हणून फत्तेसिंगानें पेशव्यांनां दरसाल ६॥ लक्ष खंडणीचा करार करून आपलें सैन्य पुण्याहून काढलें. पुढें दादासाहेबांस पेशवाई मिळाल्यावर त्यांनी गोविंदरावांस पुन्हां 'सेनाखासखेल' केलें. तेव्हां गोविंदरावानें लागलीच गुजराथेंत स्वारी केली. पुढें दादासाहेब हे त्याची मदत घेण्याकरितां बडोद्यास आले (३ जाने. १७७५). तेव्हां त्यानें फत्तेसिंगास (बडोदे येथें) वेढा दिला होता. यावेळीं गोविंदरावाचा चुलता व नडियादचा जहागीरदार खंडेराव हा गोविंदरावाच्या मदतीस आला. परंतु पुण्याच्या कारभार्‍यांनी त्याला आपल्या बाजूस वळवून घेतलें. हरीपंत फडके दादांच्या पाठोपाठ आले. तेव्हां गोविंदराव बडोद्याचा वेढा उठवून दादाबरोबर नदीच्या पलीकडे गेला. तेथें महितीरी वासद खेड्याजवळ हे छावणी देऊन राहिले असतां फत्तेसिंग व हरीपंत यांनी नदी उतरून यांच्यावर अचानक हल्ला केला व यांचा पराभव केला (१७ फेब्रु.) तेव्हां दादा हे इंग्रजांकडे खंबायतेस गेले व गोविंदराव पालनपुराकडे गेला.
पुढें (१९ एप्रिल) राघोबादादा हे कीटिंगसह गोविंदरावाच्या सैन्यास खंबायतच्या ईशान्येस ११ मैलांवर दरमज येथें येऊन मिळाले. गोविंदरावांच्या विनंतीवरून इंग्रजांनीं बडोदें घेण्याचे ठरविलें. तेव्हां फत्तेसिंग इंग्रजांशीं तह करण्यास कबूल झाला. या तहानें इंग्रजांनीं दादासाहेबांमार्फत गोविंदराव व फत्तेसिंग यांचा समेट करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढें गोविंदरावांनें हा तह पाळला नाहीं. फत्तेसिंगानें ३००० स्वारांनिशीं दादांच्या चाकरीस रहावें; थोरले माधवराव पेशवे यांच्याशीं केलेल्या कराराप्रमाणें, गोविंदरावासाठीं गुजराथेंत ३ लक्षांची जहागीर आतां त्यानें राखून ठेवू नये; कारण दादा हे दक्षिणेंत १० लक्षांची जहागीर गोविंदरावास देण्यास कबूल होते. फत्तेसिंगाने दादांनां २६ लक्ष रूपये द्यावे व त्यानें भडोचच्या वसूलावरील आपले हक्क व दुसरी कित्येक खेडीं इंग्रजांस द्यावी असें या तहान्वयें ठरलें. या तहानें इंग्रजांचा पुष्कळ फायदा झाला. पुरंदरच्या तहांत (१७७६) असें एक कलम होतें कीं, पेशव्यांच्या संमतीशिवाय गायकवाडास आपला मुलुख दुस-यास तोडून देतां येत नाहीं; तसें सिध्द झाल्यास, इंग्रजांनीं फत्तेसिंगाचा मुलुख त्यास परत द्यावा.

Sunday, 7 August 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड_भाग ३
मोमीनखान हा १७४३ त (फेब्रुवारी) मेला. तो जिवंत होता तोपर्यंत दमाजीनें गुजराथेंतील व काठेवाडांतील आपले सर्व हक्क बिनहरकत वसूल केले. मोमीनच्या मरणानंतर अबदुल अझीझ याची नेमणूक झाली; पण तो औरंगाबादेहून गुजराथेंत येत असतां, मार्गांतच दमाजीनें अंकलेश्वर येथें त्यावर हल्ला करून त्याची सर्व फौज कापून काढली. यानंतर फकीरूद्दौला यास दिल्लीहून गुजराथेंत पाठविण्यांत आलें (१७४४). यावेळीं दमाजी साता-यास गेला होता; तथापि त्याचा सरदार रंगाजी यानें फकीरूद्दौल्यास विरोध करून गुजराथचा कारभार आपल्या हातीं घेऊं दिला नाहीं. दमाजीस खंडेराव नांवाचा एक भाऊ होता. दमाजी गुजराथेंत नसल्यामुळें त्याला कारभारांत ढवळाढवळ करण्यास संधि मिळाली. त्यानें रंगाजीस अहमदाबादेहून काढून तेथें दुस-या माणसाची नेमणूक करून फकीरूद्दौला यासहि कांहीं मदत दिली. परंतु रंगाजीस ही बातमी लागतांच तो लागलीच परत आला; व त्यानें खंडेराव व फकीरूद्दौला यांचा संबंध तोडून खंडेरावास संतुष्ट राखण्यासाठीं, त्यास बुरसत (बोरसादचा) किल्ला व नडियाद जिल्हा दिला व बडोदें येथें त्याला आपला प्रतिनिधि म्हणून नेमलें. १७४४ त दमाजी गायकवाड सात-यास आला होता. या वर्षी रघूजी भोंसलें व बाळाजी बाजीराव यांच्यामध्यें शाहूच्या मध्यस्थीनें जी तडजोड झाली, तींत असें ठरलें होतें कीं, दमाजीनें माळव्यांतून कांहीं दिवसांपूर्वी जी खंडणीची रक्कम वसूल केली, तिचा हिशोब त्यानें पेशव्यांस द्यावा. शाहूनें आपल्या मरणापूर्वी दमाजी गायकवाडास साता-यास हजर होण्याविषयीं हुकूम पाठविला होता; परंतु त्यावेळीं तो गेला नाहीं. (१७४८).
दमाजी हा ताराबाईस पेशव्यांच्याविरूध्द मदत करण्याकरितां १५००० सैन्य घेऊन साता-याकडे आला व त्यानें पेशव्यांच्या पक्षाच्या मंडळीचा नींब येथें पराभव केला (१७५१). परंतु ही बातमी नानासाहेबांनां लागतांच ते मोठमोठ्या मजला करीत दक्षिणेकडून साता-यास आले. पेशव्यांशीं बोलणें लावून तडजोड करून घेण्यासाठीं दमाजीनें खटपट चालविली पण ती सफळ झाली नाहीं. अखेर दमाजीवर पेशव्यांनीं अचानक हल्ला करून त्यास पकडून बंदोबस्तानें पुण्यास आणून ठेविलें व त्याच्या कुटुंबास कैदेंत ठेविलें.
भडोचच्या वसुलचा व जकातीचा हिस्सा गायकवाडास नक्की केंव्हा प्राप्त झाला हें कळत नाहीं. इ. स. १७४७ सालीं सुरतच्या अधिकारासंबंधीं मुसुलमानी निरनिराळ्या पक्षांत तंटे उपस्थित होऊन त्यांपैकीं सय्यद अचीनखानानें दमाजीचा चुलतभाऊ केदारजी यास आपल्या मदतीस बोलावले. याबद्दल तीन लक्ष रूपये केदारजीस देण्याचें ठरलें. परंतु केदारजीच्या मदतीवांचूनच अचीनखानाचें कार्य झाल्यानें तो ती रक्कम देण्यास टाळाटाळ करूं लागला. त्यावर केदारजीनें सुरतच्या आसपास लुटालूट करण्यास आरंभ केला. तेव्हां अचीननें नाइलाज होऊन त्या रकमेची फेड होईपर्यंत सुरतच्या वसुलाचा एकतृतीयांश हिस्सा केदारजीनें घ्यावा असें ठरविलें व तें केदारजीनेंहि दमाजीच्या सल्ल्यानें मान्य केलें. दमाजी पुण्यास पेशव्यांच्या कैदेंत होता त्यावेळीं (इ. स. १७५२-१७५४). पुनः सुरत येथें बरीच बेबंदशाही माजली होती. तिचा फायदा घेतां यावा म्हणून पुढें दिल्याप्रमाणें दमाजीनें पेशव्यांशीं करार करून आपली सुटका करून घेतली (१७५४). यावेळीं असें ठरलें कीं दमाजीनें १५ लक्ष रूपये देऊन मागील बाकीचा फडशा करावा; गायकवाडाकडे गुजराथेंत जो मुलूख आहे त्याचा अर्धा वांटा पेशव्यांस मिळावा व पुढेंहि त्यांनीं नवीन मुलूख जिंकल्यास त्याचाहि अर्धा हिस्सा पेशव्यांस मिळावा. अतःपर स्वार्‍यां-मध्यें जो कांही पैसा मिळेल त्यांतून स्वारीचा खर्च वजा जातां बाकी राहिेलेल्या रकमेचा अर्धा हिस्सा पेशव्यांस देत जावा. दहा हजार फौज चाकरीस ठेवून गरज पडेल तेव्हां पेशव्यांस मदत करावी, दाभाडे सेनापतीचे मुतालिक या नात्यानें गुजराथ प्रांताच्या वसुलांतून दरसाल सवापांच लक्ष रूपये सरकारांत द्यावे आणि छत्रपतींच्या इतमामासाठीं दरवर्षी कांहीं रक्कम पाठवीत जावी वगैरे. कैदेंतून सुटण्यासाठीं दरबारखर्च म्हणून दमाजीनें दहापंधरा लक्ष रूपये खर्च केले. सुटका झाल्यानंतर (१७५४) पावसाळ्याच्या अखेर राघोबादादांच्या गुजराथच्या स्वारींत दमाजी त्यांस येऊन मिळाला व ते दोघे खंडण्या गोळा करीत अहमदाबाद शहरीं (१७५५) आले. त्यांनीं शहरास वेढा देऊन तें हस्तगत केलें. येथील अधिकारी जवानमर्दखान बाबी याची नेमणूक मोमीनखान यांच्या भावानें केली होती. त्यानें कित्येक दिवसपर्यंत शहराचें रक्षण केलें, परंतु शेवटीं पट्टण, बंडनगर, राधनपूर, विजापूर आणि साबरमती व बनास या नद्यांमधील अहमदाबादच्या उत्तरेकडचे गुजराथेंतील कांही जिल्हे स्वतःस जहागीर घेऊन (एप्रिल महिन्यांत) त्यानें तें शहर मराठ्यांच्या स्वाधीन केले. अहमदाबाद हस्तगत झाल्यावर त्याचा वसूल गायकवाड व पेशवे यांनीं अर्धा अर्धा वांटून घ्यावा असें ठरलें. वरील बाबीच्या जहागिरीपैकीं बराचसा मुलूख पुढें १० वर्षांनीं दमाजीनें परत मिळवि

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड_भाग २
पिलाजीच्या मृत्यूमुळें अभयसिंगास कांहीच फायदा झाला नाहीं. कारण पिलाजीचा दोस्त पाद्य्राचा (बडोद्याजवळील एक गांव) देसाई दिल्ला याच्या चिथावणीवरून सर्व देशभर कोळी व भील लोकांनीं बंड केलें. अभयसिंगाचें सैन्य त्यांचें बंड मोडण्यांत गुंतलें आहे असें पाहून पिलाजीचा भाऊ महादजी (हा जंबूसर बळकाऊन बसला होता) यानें बडोद्यावर स्वारी करून तें घेतलें (१७३२). येथपासून बडोदें ही गायकवाडांची राजधानी झाली. पिलाजीचा वडील मुलगा जो दमाजी त्यानेंहि याच सुमारास सोनगडाहून निघून गुजराथेंतील पश्चिमेकडचे बरेच मुख्य मुख्य जिल्हे पादाक्रांत केले. त्याच्या स्वा-या जोधपूरपावेतों जेव्हां जाऊं लागल्या तेव्हां आपल्या दुय्यम अधिका-याच्या स्वाधीन अहमदाबाद करून अभयसिंग हा जोधपूरच्या रक्षणार्थ तिकडे निघून गेला (१७३२).
पुढें दमाजीनें कंठाजी कदम वांडे यास गुजराथेंतून हांकून लावलें (१७३४); म्हणून कंठाजीनें पुढच्या सालीं मल्हारराव होळकरासह गुजराथेंत अकस्मात स्वारी करून बनास नदीपावेतों खंडण्या वसूल केल्या व ईदर, पालनपूर वगैरे कित्येक शहरें लुटलीं. या स्वारीनंतर लवकरच गुजराथच्या सुभेदारीचें काम अभयसिंगाकडून काढून नजीब उद्दौला मोमीनखान याच्याकडे देण्यांत आलें. पण अभयसिंगाच्या वतीनें गुजराथचा कारभार पहाणारा नायब सुभेदार हा अहमदाबाद सोडण्यास तयार नव्हता. तेव्हां मोमीनखानानें त्याला हांकून लावण्याकरितां दमाजीची मदत घेतली (१७३५). व ते दोघे पगडीभाई झाले. याप्रमाणें अहमदाबाद हस्तगत झाल्यावर तेथील सत्ता व वसूल या दोघांनीं वांटून घेतली (१७३७). बाजीराव उत्तरेस गेला आहे असें पाहून दमाजीनें माळव्यांत स्वारी केली (१७४२).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड _भाग १
दमाजी गायकवाड- या गायकवाडांचें मूळ गांव पुणें जिल्ह्यांत धावडी हें होय. या घराण्याचा पूर्वज दमाजी हा खंडेराव दाभाड्याच्या सैन्यांतील एक सरदार होता. इ.स. १७२० मध्यें बाळापूर येथें निजामाशीं झालेल्या लढांईत दमाजीनें विशेष नांवलौकिक मिळविल्यामुळें खंडेरावाच्या शिफारसीवरून शाहू महाराजांनीं त्याला समशेर बहाद्दर असा किताब देऊन त्याची सेनापतीच्या मुतालिकीच्या जागीं नेमणूक केली. दमाजी हा १७२० त मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या (जनकोजीचा पुत्र) पिलाजी याची नेमणूक झाली (१७२१). पिलाजी हा खानदेशांत नवापूर येथें प्रथम रहात होता. परंतु पोवारांनीं हरकत घेतल्यामुळें त्यानें सोनगड येथें किल्ला बांधून तेथें आपलें ठाणें दिलें. हें ठिकाण बरेच दिवस गायकवाडांची राजधानी होतें. पिलाजीनें राजपिंपळ्याच्या राजाच्या मदतीनें १७२० त प्रथम सुरत प्रांतावर स्वारी केली व चौथ मिळविली व अहमदाबाद येथें आपला गुमास्ता ठेवला.
इ. स. १७२४ मध्यें पिलाजीनें गुजराथचा नायब सुभेदार हमीदखान यास सरबुलंदखानाच्या (नवीन सुभेदार) विरूध्द मदत करून, त्याच्याकडून मही नदीच्या पूर्वेकडील मुलखांत चौथ बसविण्याचा हक्क मिळविला. पुढें १७२५ सालीं पिलाजीनें पुन्हां हमीदखानास मदत करून अहमदाबादेजवळ अदालेदजी येथें सरबुलंदचा पराभव केला. तेव्हां पिलाजीशीं सख्य ठेवण्याकरितां सरबुलंदानेंहि गुजराथेंत चौथ बसविण्याचा अधिकार त्यास दिला. कंठाजीकदम बांडे यानेंहि हमीदखानास मदत केली होती. त्यामुळें चौथाईबद्दल त्यालाहि कांही हक्क मिळाले होते. त्या संबंधांत पिलाजी व कंठाजी या दोघांत तंटे माजले. त्याचा निकाल हमीदनें लावला. कंठाजीनें महीच्या पश्चिमेकडील व पिलाजीनें पूर्वेकडील प्रांतांची चौथ गोळा करावी असें ठरलें. नंतर पिलाजी सोनगडास गेला. पुढें सरबुलंद यानें गुजराथची सरदेशमुखी व चौथाई थोरले बाजीरावासच दिली (१७३१). बाजीराव व दाभाडे यांच्यांत डभई येथें युध्द झालें, त्यांत पिलाजी दाभाड्यांकडून लढत होता. या युद्धांत बाजीरावाचा सरदार आवजी कवडे याचा पिलाजीचा मुलगा दमाजी यानें पराभव केला. डभईच्या लढाईंत पिलाजीचा एक मुलगा मारला गेला व पिलाजीहि जखमी झाला. पुढें यशवंतराव दाभाड्यास सेनापतीचीं वस्त्रें मिळालीं, तेव्हां पिलाजीस त्याच्या मुतालकीच्या जागीं कायम करण्यांत येऊन 'समशेरबहाद्दर' या किताबाशिवाय सेनाखासखेल हा नवीन किताब त्यास देण्यांत आला. डभईच्या लढाईच्या वेळीं डभई व बडोदें हीं दोन्हीहि शहरें पिलाजीच्या ताब्यांत होतीं. सरबुलंदखानानें मराठ्यांस चौथाई सरदेशमुखीच्या सनदा करून दिल्यामुळें बादशहाची त्याच्यावर खप्पामर्जी होऊन त्याच्या जागीं जोधपूरचा राजा अभयसिंग याला गुजराथच्या सुभेदारीचें काम देण्यांत आलें. अभयसिंगानें थोड्याच दिवसांत बडोद्याचा किल्ला मराठ्यांकडून काबीज केला. परंतु पिलाजीनें इतरत्र बरेच जय मिळवून कित्येक मुख्य मुख्य ठाणीं बळकाविली होती, म्हणून अभयसिंगानें पिलाजीशीं कायमचे करारमदार करून टाकण्यासाठीं त्याच्याकडे आपले वकील पाठविले व त्यांच्याकरवीं डाकोर येथें त्याचा एके दिवशीं विश्वासघातानें खून केला (१७३२).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९
फलटण संस्थान
बजाजी निंबाळकर आणि त्याचा वंश
इ.स.१६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हा बजाजी त्याच्याबरोबर होता. इ.स. १६६५ (नोव्हेंबर) त मोंगल व शिवाजी राजे यांचें संयुक्त सैन्य विजापुरच्या मोहिमेवर निघालें. तेव्हां त्यांनीं प्रथम बजाजीपासून फलटण, व ताथवडयाचा किल्ला घेतला. हीं ठाणीं पुढें १० वर्षांनीं बजाजींनें मोंगलांपासून परत घेतलीं. बजाजीची मदत शिवाजी राजास गुप्तपणे असे. बजाजीच्या मुसुलमान बायकोस मूल झाल्याचें दिसत नाहीं. हिंदु स्त्री सावित्रीबाई हिला महादजी, मुधोजी व वणगोजी (तिसरा) अशीं मुलें होतीं. महादजी हा शिवाजी राजांचा जांवई असून त्याचा एक सरदार होता. तो बहुश: कर्नाटकाकडे असे. संभाजी राजांना त्याची चांगली मदत झाली. संभाजी राजांचा वध झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस पकडून ग्वाल्हेरीच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेविलें. शिवाजी राजांनी मोजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली होती. महादजीचा पुत्र बजाजी (दुसरा) हा स. १७७४ पर्यंत हयात होता. महादजीचा धाकटा भाऊ मुधोजी. त्याचा मुलगा बजाजी (तिसरा) यास राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई दिली होती पहिला बजाजी स१६७६ च्या सुमारास वारला त्यावर त्याचा तिसरा पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आला; याची विशेष माहिती आढळत नाहीं. त्याच्यानंतर जानोजीस (१६९३-१७४८) गादी मिळाली. हा पेशव्यांस मिळून मिसळून वागे. त्याचा मुलगा मुधोजी (तिसरा-१७४८-६५) यानें (तिस-या) मालोजांस दत्तक घेतलें. मुधोजीच्या पश्चात दत्तकाबद्दल भांडण होऊन, सखारामबापू यांच्या सल्ल्यानें पेशव्यानीं फलटणास जप्ती पाठविली. त्या वेळीं मुधोजीच्या सगुणाबाई नांवाच्या स्त्रीनें जप्तीवाल्यांशी लढाई केली तेव्हा पेशव्यानीं जहागीर जप्त करून ती मुधोजी बिन बजाजी एका भाऊबंदाकडे चालविली. बाई त्राग्यानें ६ वर्षें बालेघाटी जाऊन राहिली. पुढें जेजुरीस पुन्हां दत्तकाची चौकशी होऊन व पेशव्यानां लाख रुपये नजर देऊन मालोजीनें जहागिरीचा ताबा मिळविला (१७७४). मालोजी हा पेशव्यांबरोबर चाकरीस असे व जहागिरीचा कारभार सगुणाबाई करीत असें. या घराण्यांत ही बाई फार प्रख्यात झाली. मालोजी हा कर्नाटकांत हरिपंततात्याच्याबरोबर असतां वाख्यानें मेला (१७७७). त्यानें जानराव यास दत्तक घेतलें होतें. जानराव हा बापाप्रमाणेंच पेशव्यांच्या सैन्यांत असे व सगुणाबाईच जहागिरीचा कारभार पाही. ती स.१७९१ त वारल्यावर, जानराव स्वत: कारभार पाहूं लागला. तो स. १८२५त वारला. त्यावर त्याची बायको साहेबजीबाई हिनें स.१८५३ पर्यंत कारभार केला. तिनें मुधोजीराव बापूसाहेब यांनां १८४० त दत्तक घेतलें. त्यानां स. १८६० त संस्थानचा अधिकार मिळाला. त्यानीं पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यानीं संस्थानांत ब-याच सुधारणा केल्या. फलटणास पाणीपुरवठयाची योजना केली, मोफत शिक्षण सुरू केलें. हल्ली (१९२५ नोव्हेंबर) त्यांचे दत्तक चिरंजीव श्री मालोजीराव नानासाहेब हे गादीवर आहेत. (इसं; फलटणची हकीकत; वाड-कैफियती; डफ; म. रि. म. वि. २)