Total Pageviews

Friday, 6 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३८


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३८

राहुजी सोमनाथ स्वराज्याचा एक विश्वासू सेवक.
महाराजांनी आग्र्यास निघण्या आधी स्वराज्याचा चोख बंदोबस्थ केला होता. खुद्द राजधानीत आऊसाहेबांन बरोबर मोरोपंत आणि प्रतापराव गुजर होते. स्वराज्यात नुकताच दाखल केलेला तळकोकण मुलुख अजून सुद्धा अस्थिरच होता, त्याची जबाबदारी महाराजांनी राहुजी सोमनाथांवर सोपविली होती.

महाराज आग्र्यात अडकले असताना तळकोकणातल्या फोंडा किल्ल्याचा अपवाद वगळता एक सुद्धा ठाणे आदिलशह जिंकू शकला नाही, कारण या प्रांतावर राहुजींची पकड मजबूत बसली होती. राहुजी अनेक वेळा आक्रमक भूमिका सुद्धा घेत, याचे उदहरण त्यांनी तळकोकणातला रांगणा किल्ला काबीज करून दिले आहे. महाराज आग्र्यात बंधिस्त असताना असे धाडस करणे म्हणजे कमालच.

महाराज आग्र्याहून निसटून स्वराज्यात सुखरूप पोचले. लवकरच औरंगजेबाशी महाराजांनी तह केला आणि तहाच्या कलमानुसार शंभूराजांना मुघली मनसबदार करण्यात आले. शंभूराजांना औरंगाबादला पाठविले तेव्हा त्यांना सोबत करणार होते प्रतापराव आणि राहुजी. बादशाहने शंभूराजांना वर्हाडातील जहागीर बहाल केली, या जहागिरीच्या बंदोबस्तासाठी महाराजांनी राहुजी सोमनाथांच्या हाताखाली थोडे मराठी सैन्य ठेवले. पुढे महाराज आणि औरंगजेबाचा तह मोडला आणि एकच संघर्ष सुरु झाला. या संघर्षाची सुरुवात सुद्धा केली ती राहुजी सोमनाथांनी. राहुजींनी वर्हाडातील अनेक गावे लुटली आणि मुघली सैन्याच्या मनात एकच धडकी भरविली.

दक्षिण दिग्विजयासाठी निघण्या अगोदर रायगड राजधानीचा कारभार महाराजांनी सोयराबाई किंवा युवराजांवर न सोपवता तो राहुजींच्या हाती दिला.

संदर्भ: शि.प. सं, जेधे शक, सभा

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३७

कावजी कोंढाळकर एक योद्ध

१६६१ च्या जानेवारी महिन्यात, महाराजांनी कोकणात उतरू पाहणार्या कारतलबखान या मोगली सरदाराचा धुव्वा उडविला आणि दक्षिण कोकणात मुसंडी मारली. ही कोकण मोहीम स्वराजासाठी फारच यशस्वी ठरली, पण जवळजवळ पाच महिने मराठी सैन्य या मुलुखात अडकून राहिले. या संधीचा फायदा उठवत शाइस्तेखानाने १६६१ च्या मे महिन्यात कल्याण काबीज केले आणि नंतर देइरीगडास वेढा घातला. या वेढ्याची जबाबदारी शाइस्तेखानाने सरदार बुलाखीवर सोपविली होती.

महाराजांनी हा वेढा उठविण्यासाठी कावजी कोंढाळकरची रवानगी केली. कावजी कोंढाळकरांच्या मराठी सैन्याने मुघलांचे तब्बल चारशे सैनिक मारीत देइरीगडाचा वेढा उधळून लावला.

याचा संदर्भ आपल्याला शि.प.सं मध्ये सापडतो.

आता प्रश्न राहतो तो म्हणजे, हा कावजी कोंढाळकर कोण?

हा संभाजी कावजी कोंढाळकर असेल (अफझलखान युद्धाच्या वेळेस मर्दुमकी गाजविणारा) का? तर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे, कारण संभाजी कावजी या दरम्यान शाइस्तेखानास मिळाला होता.

हा कावजी मल्हार (शिरवळचे ठाणे काबीज करणारा) असेल का? याचे उत्तर सुद्धा नाही कारण कावजी मल्हार यांचे पूर्ण नाव कावजी मल्हार खासनीस असे होते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३६

शहाजीराजांचा अंगरक्षक खंडोजी पाटील

महाराजांना रोखण्यासाठी आदिलशाहने एक कापती डाव टाकला, त्याने मुस्तफाखानला शहाजीराजांचा काटा काढण्यासाठी रवाना केले. पण हे काम तितकेसे सोपे नव्हते, कारण दक्षिणेतल्या पाळेगार, नायकांचा पूर्ण पाठींबा शहाजीराजांना होता आणि खुद्द शहाजीराजांचा दक्षिणेत इतका दबदबा होता की आदिलशाह सुद्धा त्यांना दचकून रहात असे. शहाजीराजांना कैद करण्यासाठी मुस्तफाखानने एक कट रचला आणि त्याने शहाजीराजांना जिंजीच्या वेढ्यात सामील होण्यासाठी आज्ञा केली. शहाजीराजे सावध होते आणि त्यांनी वेढ्यात सामील होण्यास नाकारले. तेव्हा मुस्तफाखान दुसरा डाव खेळला, वरकरणी नरमाईचे धोरण स्वीकारून त्याने राजांना गाफील ठेवले. काही दिवसांनी शहाजीराजांना सुद्धा मुस्तफाखानाचा भरोसा वाटू लागला आणि ते बेसावध राहू लागले.

एक रात्री शहाजीराजे गाफील होते, गाढ झोपले होते आणि हीच संधी साधून मुस्तफाखानाने शहाजीरांच्या छावणीला चहूबाजूने घेरले. राजांनी आधीच आपले मुख्य सैन्य बंगळूरला पाठविले होते आणि आता त्यांच्या बरोबर काही निवडक सैनिकच होते. मुस्तफाखानाने बरोबर बहलोलखान, मसूदखान, बाळाजी हैबतराव, मंबाजी पवार, मंबाजी भोसले, बाजी घोरपडे आणि त्यांचे चार बंधू असे नामवंत सरदार आणले होते आणि दिमतीला प्रचंड फौजतर होतीच.

आपण घेरले गेल्याचे लक्षात येताच, शहाजीराजांनी बरोबर असलेल्या सैन्याला सज्ज होण्याचा हुकुम सोडला. एकच रणकंदन सुरु झाले. खासा बाजी घोरपडे राजांवर चालून आलेला पाहताच, शहाजीराजांचा स्वामिनिष्ठ सेवक खंडोजी पाटील त्याचावर तुटून पडला. खंडोजी पाटील आणि बाजीचे घनघोर युद्ध झाले. खंडोजी पाटलाने केलेला वार बाजीच्या छातीवर लागला आणि बाजी कोसळला. पण थोड्याच वेळात बाजी परत आला आणि या वेळेस त्याने जोरदार प्रतिकार केला. अखेरीस बाजीने खंडोजीस ठार केले. अखेर शहाजीराजे कैद झाले पण त्यांच्या अंगरक्षकाने दिलेले बलिदान सुद्धा मोलाचे होते.

संदर्भ: शिवभारत

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३५

काळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड.

ओक्टोबर १७३३ किल्ले बाणकोट, गोवेले, विन्हेरे, पाचड मारित सिद्दी अफ्वानी रायगडाच्या पायथ्यास पोचला. गडास त्याने वेढा घातला. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे रायगड मोहिमेवर निघाले. जानेवारी १७३४ महिन्यात काळ नदीच्या खोर्यात पेशव्यांचे आणि सिद्दयाचे मोठे युद्ध झाले. गडावरच्या मराठ्यांनाही चेव चडला.

तटसरनौबत जावजी लाड याने महादरवाजा उतरून थेट सिद्दीच्या छावणीवरच हल्ला चडविला. मराठ्यांचा तो आवेश पाहून सिद्दयाचे सैन्य सैरावैरा पळू लागले. त्यांनी काळकाई खिंडी मार्गे पळण्याचे ठरविले पण जावजी लाड आणि त्यांच्या सैनिकाने सिद्द्यांचा पाठलाग केला. शत्रु सैन्यास जावजीने काळकाई खिंडित गाठले पण तेथे सिद्यांची चौकी होती. या चौकीतील सैन्याचे बळ मिळाल्या मुले सिद्द्याच्या पळणाऱ्या सैनिकांने उलटून मराठ्यांना तोंड दिले. आता मात्र जावजी लाड आणि त्यांचे वीर घेरले गेले. अखेर घनघोर युद्ध झाले आणि त्यात अनेक जखमा शरीरावर सोसत जावजी लाड धारातीर्थ पडले.

रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर एक वीर स्मारक दिसते ते जावजी लाड यांचे आहे असे आप्पा परब सांगतात. जावजी लाड यांचा उल्लेख पेशवा दफ्तरात सुद्धा मिळतो.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३४

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३४

राजगड लढ़वीणारे संताजी सिलिम्ब्कर

१७०३ चा पावसाळा संपला आणि पुण्यास छावणीकरुन राहणारा बादशाह राजगडाच्या रोखाने निघाला. राजगडाचा रास्ता तयार करण्यासाठी हजारो कामगार सतत दोन महीने झटत होते. बादशाह राजगडांस येउन वेढा घालून बसला. हमिद्दुधीन खान आणि तरबियत खान यांच्यावर किल्ला काबिज करण्याची जबाबदारी बादशाहने सोपविली होती. मोगली फौजेने दमदमे उभारून गडावर तोफांचा मारा सुरु केला. खुद्द औरंगजेबाची छावणी सुवेळा माची समोर होती. गडाच्या शिबंदिवर संताजी सिलिम्ब्कर होते. राजगड परक्रमाने लढ़वित असताना संताजी स्वामीकार्यावर ठार झाले. आज सुवेळा माचीच्या तटातिल गणेश शिल्पा समोरील वीरगळ ही संताजी सिलिम्ब्कर यांची असावी.

संताजी सिलिम्ब्कर यांचा पराक्रमाची साक्ष देणारे ताराराणी यांचे एक पत्र आहे. या व्यतिरिक्त राजवाड़े यांनी सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाची साधने यात संताजिंच्या पराक्रमाचा दाखला दिला आहे

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३३

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३३

शंकरजी नारायण

शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. [१]

१७ व्या शतकाच्या अखेरच्या आणि १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा [२], सिंहगड [३], राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.

सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे मराठा वीर.
मोगलांनी सिंहगड काबिज केला होता, तो पुन्हा स्वराज्यात सामिल करण्याची जबाबदारी ताराराणी यांनी शंकराजी नारायण यांच्यावर सोपविली होती. शंकराजी नारायण यांच्या हाताखालच्या रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव, व पंताजी शिवदेव या शूर मराठ्यांनी रात्री माळा लावून सिंहगडात प्रवेश केला. अचानक हल्ला करुन तेथील मोगली शिबंदी कापून काढली. सिंहगडाचा राजपूत किल्लेदार देवीसिंह कैद झाला आणि अश्या प्रकारे सिंहगडावर पुन्हा भगवा फडकला. पण दुर्दैवाने आज आपण या विरांच्या शौर्याला विसरतो.

याचा संदर्भ महाराणी ताराबाई कालीन कागदपत्र आणि शिवचरित्र प्रदीप यात मिळतो.


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३२


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३२

पैलवान जिवाजी महाले
उमरठ हे गाव तसं ३५० वर्षापूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तान्हाजीरावांचा.

आज गावाची यात्रा भरली होती.गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.

राजांची आणि तान्हाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची.मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.

आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची ,त्यांचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.

आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे..हा हिरडस मावळातला ..वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.

वास्तविक सर्वजन शिवाजी राजाना पाहायला जमणार होते, आणि का नाही जमणार.??
लेकीसुना, संत सज्जन ,गाइवसरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे .स्वराज्य आणले होते ..!

मैदान खचाखच भरले होते.लहान मोठ्या कुस्त्याला प्रारंभ झाला. आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयानी पांढरा अंगरखा घातला होता.. कृष्णा घोडीवर स्वार होते,आणि कमरेला भवानी तलवार बांधली होती..जणू शिवशंकर महादेव भासत होते,सह्याद्रीचे महादेव.

राजे खाली उतरले ..

तान्हाजीराव आपल्या फौजेसह राजाना भेटायला वाटेतच थांबले होते.रजानी तान्हाजीरावना मिठी मारली.

तितक्यात खबर आली कि ,बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता .त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .

वाघाने त्यांच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने .

हे ऐकून मैदान शांत झाले.खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन मैल आले होते.

आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते

'' मंडळी,लखू बेराडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.म्हणून तो आज लढू शकत नाही. या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल.असेल तर समोर या.''

हि घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चीमेकडे कुजबुज सुरु झाली.

एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता.सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.

तितक्यात कोणतरी किंचाळला

''आरं आला रं जीवा महाला आला ''
राजांनी चौकशी केली तान्हाजीरावान्पाशी ..
तान्हाजी म्हणाल..''राज ,ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय,कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा.दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होत..

निजामशाहीचा दंगा झाला तव ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय."" राजांच्या चेहर्य्यावर एक तेज आले होते.

कुस्तीची सलामी झडली . भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जीवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता.डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.

भिकाजी ने उसन्या अवसानान पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जीवा ने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.

सगळ प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले.जीवाला अक्षरश डोक्यावर घेवून नाचू लागले
तितक्यात शिंगे -करणे गरजू लागली ..खुद्द राजे येत होते,

पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयानी हासत हासत जीवाला मिठीच मारली..मनात काय राजकारण होते माहित नव्हते मात्र राजे जाम खुश झाले होते..
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जीवाला बक्षीस दिले..आणि विचारले..

जीव काय करतोस ??
जीव उद्गारला ,'' काय नाय वरातीत पट्टा फिरवतो..दंगलीत कुस्त्या खेळतो''

राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ...!!
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमान्च्यासोबत..!!
आहे कबुल ..??

जीवा हासला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.

आणि हाच तो जीवाजीराजे महाले ज्याने अफजलखानाच्या अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.